Sunday, 27 November 2022
ऑनलाईन मैत्री
Wednesday, 1 June 2022
बायको
Wednesday, 25 May 2022
दोष कोणाचा?...
Sunday, 22 May 2022
बाग
Saturday, 21 May 2022
प्रेम की आकर्षण?
Friday, 6 May 2022
प्रेम
पहिल्या प्रेमावर करण्यास भाष्य
नाही मी इतकी महान
प्रेम मग ते कोणाचे,
कोणावर जडलेले असो
असते मात्र छान .....
काय माराव्या इथे प्रेमाच्या गप्पा !
तो तर हृदयातील एक अनमोल कप्पा
कुपीत हृदयाच्या असे तो जतन
न फुललेल्या प्रेमाचा, असे तो एक टप्पा ....
पहिलं अन् दुसरं असं असतं का प्रेम?
माहित नाही मला तरी !
प्रेम हे प्रेमच असतं,
हीच आहे भावना खरी .....💞💞💞
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 2 May 2022
कदर असेल तिथेच व्यक्त व्हा
Thursday, 28 April 2022
माझ्यातील मी
गझल १७, लेक
Tuesday, 26 April 2022
अलंकार
Friday, 22 April 2022
आतुरता
Thursday, 21 April 2022
जाणीव सत्याची
Wednesday, 20 April 2022
नव्याने भेटले मला
Tuesday, 19 April 2022
भविष्य आपुले..
केली जरी पृष्ठांवर उत्तरे चिन्हांकित
त्यासाठी करावे लागते अध्ययन स्वयंप्रेरीत
अन् असले जरी भविष्य आपुले अधोरेखीत
परी स्वकष्टाने भविष्य घडविणे,
हेच खरे आहे आपुले संचित
का अवलंबून राहावे भविष्यावर ?
असेल जर प्रेम आपुले जीवनावर
तर ठेवावा विश्वास स्वतःवर ,
अन् जगावे स्वबळावर
करावे कर्म नेकीने, अन् लढावे जिद्दीने
नसावे मिंधे कधीही, जगावे स्वाभिमानाने
हुरळून जाऊ नये यशाने
अन् खचून जाऊ नये अपयशाने
दिले जरी संकेत भविष्याने असावे निडर मनाने
आहे आपुल्याच हातात आपुले भविष्य घडविणे......
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 18 April 2022
एकतर्फी प्रेम
Friday, 15 April 2022
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
मनातील डायरीचे पान🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :-
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
'प्रवृत्ती' म्हणजे स्वभाव, माणसाच्या वागण्याच्या तऱ्हा. जन्मास येणारा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचे काही ना काही वेगळेपण, वैशिष्ट्य असते. त्याच्या त्या स्वभावाने तर त्याच्या व्यक्तिमत्वाची चांगली किंवा वाईट छाप पडत असते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादी घटना घडलेली पाहून तिथे असणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या घटने संदर्भात निरनिराळे तर्क वितर्क लावते. एखादा त्या घटनेविषयी हळहळ व्यक्त करील, तर एखादा त्याकडे दुर्लक्ष करील, तर एखादा त्या घटनेची खोलात जाऊन चौकशी करील, तर एखादा ती घटना पाहून घाबरून जाईल. असे माणसाचे स्वभाव असतात, वागण्याच्या तऱ्हा ह्या
तो त्याच्या सोयीनुसार बदलत असतो, जरी मूळ स्वभाव कसाही असला तरी.
एखादी व्यक्ती ही अतिशय बडबडी असते, तर एखादी एकदम अबोल,भिडस्त स्वभावाची असते. एखादा चटकन राग व्यक्त करतो तर एखादा माणूस तो मनातच ठेवतो.काहींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो तर काही व्यक्ती ह्या सतत नकारात्मकच विचार करत राहतात. काही व्यक्तींना बिनधास्त आयुष्य जगणे पसंद असते, तर काही व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरत असते. अशी एकंदर भिन्न स्वभावाची माणसे आपल्या अवतभोवती सतत असतात. त्यांच्याशी आपल्याला
जुळवून घेता आले पाहिजे. भिन्न स्वभाव असेल तर आपसांत खटके उडू शकतात पण जर नाते टिकवायचे असेल तर स्वतःच्या अहंभावास बाजूला सारून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले, त्याच्या विचारांना समजून घेतले तर नाते टिकू शकते.
माणसाचा स्थायी स्वभाव हा कधी बदलत नाही परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वात प्रयत्न केले तर नक्कीच बदल घडू शकतात. एखाद्या व्यक्तीस लहानपणापासून जर चोरी करायची सवय असेल पण त्याने मनाचा निग्रह केला, चांगले विचार जर सतत त्याच्या मनावर बिंबवले गेले तर त्या माणसाची सवय ही नक्कीच जाऊ शकते.
कधी कधी माणसे मुखवटे धारण करून जगात वावरत असतात. त्या मुखवट्यामागील खरा चेहरा ओळखायचा असेल तर त्या माणसाशी आपणास जमवून घेतले पाहिजे, त्याच्या अंतरंगात डोकावता आले पाहिजे. तर खरा माणूस काय आहे ते आपणास समजून जाईल.
माणसाचा स्वभाव हा काहीवेळेस तात्काळ समजून जातो तर कधी कधी माणसाच्या स्वभावाचा थांगही लागत नाही कारण माणूस हा त्याचे वागणे हे परिस्थितीनुरूप बदलत असतो. हे जरी खरे असले तरी मूळ स्वभाव हा मात्र तसाच खोलवर रुजलेला असतो.
'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
माणसाच्या स्थायी किती
जुळवूनी घेतले जर परस्परांशी
चिरंतन राहतील ती नाती' .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Tuesday, 12 April 2022
गझल :-१८
ती कळी...
मोजताना फुले बागेतली
एक कळी खुदकन हसली
देखुनी त्या कळीस,
मनात अलवार भावना जागली
मोहक तिचे रूप ,
साठवले मी डोळ्यांत
केव्हा खुलेल कळी ती फुलात ?
उमटले सहज भाव ते अंतरंगात ....
दडली होती जरी ती पानाआड
न होऊ दिले तिस मी नजरेआड
आला हळुवार एक कवडसा किरणाचा
स्पर्शून त्या कळीस, केले प्रेम जीवापाड
अन् झाले कळीचे फूल क्षणात
पाहुनी त्या आविष्कारासी,
भिणला आनंद रोमारोमात ....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 11 April 2022
सोबती
Saturday, 9 April 2022
बापाच्या मनाची व्यथा..
मनातील डायरीचे पान 🌿🌿:- अंतर्गत विषय:-
बापाच्या मनाची व्यथा :-
आई म्हटले की एक वात्सल्य मूर्ती समोर येते कारण घराला घरपण तिच्यामुळे येते आणि वडील म्हटले की एक शिस्तप्रिय, कठोर व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते. जणू आपण ते गृहितच धरलेले असते. पण एका बापालाही तितकेच हळवे मन असू शकते जितके एखाद्या स्त्रीचे असते. पुरुषांनी रडलेले हे मात्र फारसे कुणाला रुचत नाही. जर त्याच्याकडून तसे झाले तर त्याला नावं ठेवली जातात. का, त्याला रडण्याचा हक्क नाही का ? कितीही आघात झाले तरी त्याने ते आतल्या आत सहन करणे योग्य आहे का ? साऱ्यांना खंबीरपणे साथ देणे
एवढेच त्याचे कर्तव्य आहे का ? त्यालाही त्याच्या आवडी निवडी प्रमाणे हवे ते घेण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा अवधी नको का? हे प्रश्न खरोखर एकदा जाणून
घेतले तर पुरुषांच्या मनाची व्यथा सहज लक्षात येईल.
एक स्त्री घरासाठी जितकी राबते, तितकेच एक पुरुष बाहेरील सर्व जबाबदारी नेटाने पेलतो. आयुष्यभर घरासाठी झटत असतो. बाहेर जाऊन, पडेल ते काम करून, प्रसंगी वरिष्ठांकडून होणारा अपमान सहन करून तो पैसे मिळवतो आणि घरातील सर्वांच्या गरजा भागवत असतो. तो कमावून आणून देतो म्हणून घरातील स्त्री सगळ्यांसाठी खाण्यास बनवू शकते. त्याला होणारा त्रास तो कधी दाखवत नाही .खरे तर जास्त मानसिक त्रास हा
पुरुषच सहन करत असतो. स्त्री रडून, दुसऱ्याशी बोलून स्वतःचे दुःख हलके करते पण पुरुष मात्र रात्री झोपताना छताकडे पाहून, कधी शून्यात नजर लावून बसलेला बऱ्याच जणांनी पाहिले असेल. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्याची घडी कशी नीट बसेल, महिना संपत आला की, खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न, हे सारे प्रश्न उभे ठाकलेले असतात. तो कधी ते बोलून दाखवत नाही.
एक वडील म्हणून ते मुलांना चांगल्या शाळेत घालतात भले त्यांची ऐपत नसेल तरीही आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेतले पाहिजे याकरिता ते कर्ज काढून, मोठ्या कष्टाने मुलांना शिकण्यास प्रोत्साहन देत असतात. त्यांना हवे ते खाणे, पिणे, कपडालत्ता, सर्वांच्या सुखाचा एक वडील आधी विचार करतात. बायको, मुलांसाठी हवं ते खरेदी करतील पण स्वतः मात्र कधी काही घेत नाही. मुलांना महागडे मोबाईल खरेदी करून देतील, त्यांना हवे तेव्हा पैसे देतील , स्वतः मात्र काटकसर करून जगतील. बहुतेक असेच चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. आपण मदर्स डे जितका दणक्यात साजरा करतो तितका फादर्स डे साजरा करत नाही. हेही तितकेच खरे आहे. आईच्या वात्सल्याचे नेहमीच कौतुक होत असते पण वडीलही आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमाविषयी मात्र एवढे एवढे बोलले जात नाही. वडील हे कायम दुर्लक्षित राहतात.
मोठ्या मोठ्या संकटांना धीराने पेलणारा, दीपस्तंभासम असतो एक बाप. त्याच्या मनाची व्यथा जर समजून घेतली तर आणखी दहा हत्तीचे बळ त्याच्यात संचारेल व कोणतेही संकट तो सहज पार करील.
मी माझ्या वडिलांवर एक कविता लिहिली आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यांच्या प्रेमाला कसलीच तोड नाही.
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
लावला जीव अपार आम्हां लेकरांवरी
पाहत आले मी बालपणापासुनी
सांभाळले आम्हांस तळ हाताच्या फोडापरी.....
नसे कसलेच व्यसन अन् सवयी
असे त्यांची साधी अन् सरळ राहणी
आहेत ते प्रेमळ अन् सुंदर विचारांचे धनी
हीच दिली आम्हा मुलांना शिकवणी.....
येता अनंत अडचणी,
जाणवू न दिल्या आम्हाला कधी
पेलत राहिले एकटेच आपल्या बाहुवरी
पाहिले साऱ्यांचे सुख आधी .....
सर्वांचे सर्व केले, ज्याला त्याला मार्गी लावले
परिस्थितीशी दोन हात त्यांनीच केले
नाही ठेवली अपेक्षा कोणाकडूनही,
न जगता स्वतःसाठी, आम्हा मुलांसाठी झिजले ......
पोहोचू दिली नाही कधीच आम्हास झळ
होते जणू अंगात त्यांच्या,
दहा हत्तींचे बळ
ओढत राहिले संसाराचा गाडा
सोसूनी अंतरी वेदनेची कळ ....
अजूनही माहेरी गेल्यावरी,
हवे काय, काय नको मज पाहतात सर्वतोपरी
भासू न देती यत्किंचतही उणीव मातेची
जणू घेतलाय जन्म लेकरांसाठीच त्यांनी भूवरी .....
सदैव काळजी असते आम्हा लेकरांची
बसवण्यास घडी प्रपंचाची,
परिश्रमासवे असते जोड त्यांच्या आर्थिक धोरणांची
कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल सावली जणू आभाळाची.....
थकले असती आता जरी
सळसळते चैतन्य असे तरुणापरी
त्यांच्या आचार-विचारांची,
जपली आहे शिदोरी अंतरी.....
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
सदैव राहिल ऋणी त्यांची मी
करते मी ईश्वरचरणी विनवणी,
लाभो मज हेच पिता जन्मोजन्मी...... 💐💐🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Thursday, 7 April 2022
अंतर्मन (आत्मपरीक्षण)
मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿:- अंतर्गत विषय
अंतर्मन ( आत्मपरीक्षण )
'पाहिलं जर अंतर्मनात डोकावून,
खूपकाही जाल सहज उमजून
प्राप्त करण्यास आत्मसुख,
ओळखावे स्वतःस आत्मचिंतनातून'....
जीवन जगत असताना, माणूस स्वतःच्या 'मी'पणात इतका गुरफटलेला असतो की तो कधी स्वतःचं आत्मपरीक्षण करतच नाही. खरे तर बाह्यमन आणि अंतर्मन ही मनाचीच रूपे आहेत. आपण जे विचार सतत करत असतो तेच कुठेतरी अंतर्मनात खोलवर रुजतात आणि नंतर ते स्वीकारून बाह्य मनाद्वारे बाहेर पडतात.
जर आपले विचार हे सकारात्मक, विनयशील असतील तर जीवनात आपल्याला ऊर्जा, यश हे हमखास मिळते. पण आपण अंतर्मनात सतत नकारात्मक, आत्मघातकी, वाईट विचार करत राहिलो तर मग जीवनात तसेच घडत जाते, अपयश पदरी पडते. जीवन नैराश्याने ग्रासले जाते.
म्हणून स्वतःचे अंतर्मन हे सदैव निकोप ठेवा कारण अंतर्मन हे वाईट, चांगले दोन्हीही स्वीकारत असते, तेव्हा अंतर्मनावर जेवढे चांगले विचार बिंबवता येतील तितके बिंबवा.
माणूस दुसऱ्यांचे दोष काढण्यात कायम तत्पर असतो. 'हम करे सो कायदा' अशीच त्याची वृत्ती असते. त्याला स्वतःचेच म्हणणे खरे करायचे असते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून, समजून घेण्याची त्याची वृत्तीच नसते. कधी
कधी समोरच्या व्यक्तीचेही बरोबर असू शकते. ही गोष्ट कधी आपल्या लक्षातच येत नाही. दुसऱ्यांच्या मतासही तितकेच महत्त्व द्या जितकं तुमच्या मतास इतरांनी
द्यावे, असे आपणास वाटत असते.
स्वतःच स्वतःला आधी ओळखण्यास शिकले पाहिजे. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असू शकत नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्यास शिका. स्वतःमधील
राग, मत्सर हे दूर सारून जर आत्मचिंतन केले तर मनास एक वेगळेच समाधान प्राप्त होऊ शकते. कारण जर आपण आपल्या आत डोकावून पाहिले तर तिथे सर्वात
जास्त दुसऱ्या विषयी असूया, तिरस्कारच आपल्याला आढळून येईल. ही मनात साठलेली जळमटे फेकून देऊन मन हे सद्विचाराने भरले पाहिजे. आत्मपरीक्षणाणे माणूस स्वतःची चूक मान्य करू शकतो, दुसरे जर चुकले असतील तर त्यांस मोठ्या मनाने माफ करू शकतो.
आणि ह्यामुळे परस्परांची नातीही दृढ होण्यासाठी मदत होते. नात्यात कोणताही दुरावा निर्माण होऊ शकत नाही.
आत्मपरीक्षण करण्याने माणसाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते. स्वतःतील गुण, दोष सहज लक्षात येतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासास आत्मपरीक्षण हे मोलाचे काम करते. स्वतःस कशाची आवड आहे, कोणती गोष्ट आपण सहज करू शकतो, हे जर ओळखता आले तर जीवनात माणसाला यश हे नक्कीच मिळू शकते. करिअर घडविण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण हे करताच आले पाहिजे. इतर सांगतात म्हणून आपण त्याच वाटेने जाणे हे कितपत योग्य आहे? त्यापेक्षा स्वतःतील गुण शोधा, कोणते काम तुम्ही जास्त आवडीने आणि योग्य रित्या करू शकता, कोणत्या गोष्टीत आपली रुची आहे , हे जर माणसाने जाणले तर त्यास यश हे हमखास मिळणार, यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे दुसऱ्यास काय वाटेल ? याची चिंता करत बसू नका, तुमचे मन काय सांगते , त्याचा आधी विचार करा. कधी कधी नाही म्हणण्यास शिका कारण लोक गैरफायदा घेण्यास टपूनच बसलेले असतात.
माझ्या बुद्धीला जे उमगले ते विचार इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास
क्षमस्व.🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 4 April 2022
रहस्यमय जीवन
Friday, 1 April 2022
गझल:- २०
ध्येयासक्त..
Wednesday, 30 March 2022
स्वरामृत
Tuesday, 29 March 2022
एक अविश्वसनीय सत्य
मनातील डायरीचे पान 🌿🌿: पुरुषांचे वर्चस्व आणि स्त्री
कितीही होऊ दे समाजात परिवर्तन,
तरीही खरेच मिळते का स्त्रीस समर्थन?
शिकून सवरून होऊ दे कितीही मोठी,
थोपवले जाते जबाबदारीचे ओझे तिच्याच पाठी.....
वर्चस्व असते कायम पुरुषांचेच समाजात,
असाच तर पडलाय खरा प्रघात
स्त्रीला दिले जाते नावापुरते वरचे स्थान,
केले जातात वारंवार तिच्यावरी आघात.....
नाही म्हणत सगळेच पुरुष असतात तसे,
पण तरीही स्त्री समाजात दुय्यमच असे
महत्वाचे निर्णय घेणे, हे जणू पुरुषांचे काम
स्त्रीच्या पाचवीला मात्र पुजलेले असते घरकाम.....
कोणी ठेवा अगर नका ठेऊ विश्वास,
हेच खरे आहे अविश्वसनीय सत्य
दिले असले समाजाने स्त्रीस हक्क,
तरीही पुरुषाच्याच हाती असते घराचे सारथ्य .....
✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 28 March 2022
मी पणा
अविश्वसनीय सत्य हेच आहे,
स्वतःवरील प्रेमात नेहमीच
असतो माणूस मग्न,
देतो तो आधी स्वतःस प्राधान्य,
स्वतःपुढे इतर, त्याच्या तुलनेत नगण्य.....
माझे, मला ,मी , माझ्याकरिता,
ह्यातच गुरफटलेला असतो माणूस
स्वतःचाच अहंभाव मिरवताना
घेत नाही जाणून, कोणाच्याच भावनांचा मागमूस ....
करतही नाही स्वीकार तो सत्य,
असले कितीही जरी त्यात तथ्य
यावे मीपणातून बाहेर आपण,
अन् जगावे दुजांकरिताही
वाटत नाही मनास त्याच्या,
कितीही बजावले जरी त्यास नित्य.....
घेत नाही ध्यानात कधीच,
मृत्यू हेच सत्य अंतिम
देऊ पाहतो हुलकावणी त्यास,
झटत असतो जगण्याकरिताच रात्रंदिन .....
💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥
सौ. राजश्री सुहास जाधव.
Saturday, 26 March 2022
वेदना त्या....
खोटे ते हसणे,
जणू अवसान ते उसणे
बनविशी मूढ लोकांस
परी अंतरीच्या वेदनांची,
द्यावी कोणास बरी दुषणे? ....
खोट्या त्या हास्यावरी
भाळती सारे जण,
जाणीव नसे तयांना काही
सदैव असे विषण्ण ते मन ....
विषण्ण त्या मनास
ठेवावे कसे सचेतन ?
लेऊनी मुखवटा हास्याचा
रिझविती लोकांचे मन ....
अंतरीच्या वेदना त्या
शमतील केव्हातरी,
ठेऊनी आस मनी
उमटवते हास्य अधरांवरी ....
🌟🌟🌟🌟🌟🌟🌟
सौ. राजश्री सुहास जाधव.
Friday, 25 March 2022
तिची घुसमट
मनातील डायरीचे पान : 🌿🌿
होणार आहे का,
विचारांचा तुमच्या कायापालट ?
आहे एक विधवा म्हणून,
किती व्हावी तिची फरफट ! ....
विधवा होणे हा काही तिचा गुन्हा नाही,
पण समजेल का कधी समाजाला?
बांधले जाते नित्य तिलाच दावणीला
म्हणे, तयार राहा भोग भोगायला .....
तिला ही आहे ना हो मन अन् भावना,
तरी का यावी तिच्याच वाट्यास अवहेलना ?
मनासारखे जगण्याचा तिलाही आहे हक्क
परी हिणवून तिस, करता तिची कुचंबणा....
हसली, बोलली अन् स्वच्छंद जगली की,
ठरते साऱ्यांच्या नजरेत ती वाईट
ओढूनी तिजवर ताशेरे म्हणती सारे,
'आहेस अभागी तू, वाग जरा नीट' ....
एका विधवेची घुसमट उमजेल का कोणास?
मिळणार आहे का कधी सुख तिला उपभोगण्यास?
होणार आहे का परिवर्तन समाजातील लोकांत ?
नको नुसती सहानुभूती, मिळेल का गती तिच्याही जीवनास .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Wednesday, 23 March 2022
युद्ध हा पर्याय नव्हे...
मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-
युद्ध हा पर्याय नव्हे :-
आज मनाच्या डायरीतून सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध. ज्याचे पडसाद मात्र संपूर्ण जगावर उमटत आहे. जग खरेच तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने पाऊल तर टाकत नाही ना ! हा विचार नक्कीच मनाला वेदना देऊन जातो. ह्या देशातील युद्धाची झळ जागतिक पातळीवर सर्वांनाच होऊन महागाईचे चटके सोसावे लागत आहे आणि हे असेच चालू राहिले तर पुढेही सर्व संकटाना सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक अर्थव्यवस्था, जीवितहानी ह्या सर्व संकटाना ह्या युद्धामुळे देशाबरोबर, सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणार आहे.
खरेच युद्ध हाच पर्याय आहे का? स्वतःचे वर्चस्व दुसऱ्यावर प्रस्थापित करताना, दोन परस्पविरोधी विरोधी प्रवृत्ती ह्यांच्यातील असलेला संघर्ष, हा कोणत्याही युद्धास कारणीभूत ठरतो. मग ते युद्ध देशा देशातील असो, दोन भिन्न विचाराच्या व्यक्तिंमधील असो, किंवा नात्यातील युद्ध असो, प्रेमातील युद्ध असो, मनातील द्वंद्व असो,
युद्ध हे युद्धच असते. ते कधी रौद्र रूप धारण करते, तर कधी आपापसांत शीतयुद्ध चालू ठेवते. आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या ह्या युद्धास कधी तरी नक्कीच सामोरे गेलेलो असतो, असे मला वाटते. पण ह्यातून काय साध्य होते, फक्त आणि फक्त त्रास, मानसिक, शारिरीक, आर्थिक, नैतिक ह्यापलीकडे अशा ह्या युद्धातून काहीच साध्य होत नाही. पण स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी हक्कासाठी युद्ध करणे, हे चुकीचे नाही. कारण तो आपला हक्क आहे. फक्त ते करताना आपण आपले धोरण ठरवले पाहिजे, कोणावर अन्याय न करता जे
सामोपचाराने होत असेल तर त्याप्रमाणे केले पाहिजे.आपले विचार तितके प्रगल्भ पाहिजे आणि वेळ पडली तर लढताही आले पाहिजे, असे मला वाटते.
आजकाल तर क्षणाक्षणाला घराघरात, समाजात वावरताना शाब्दिक युद्ध हे चालू असते. नात्यात तर ते नेहमी दिसून येते. टिव्ही सिरियलचा प्रभाव तर घरातून
स्त्रियांवर इतका झालेला असतो की सासू सुनेचे, दीर, जाऊ, नणंदांचे आपापसांत कधी पटत नाही. टिव्ही मध्ये जसे दाखवतात तसे खऱ्या आयुष्यात मग घडू लागते.
प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करत राहतो, हेवेदावे करतो. अशा ह्या शीत युद्धाचे परिणाम खूपच विपरीत होताना दिसतात. नाती दुरावतात, एकमेकांबद्दल कमालीची असूया वाढीस लागते, कधी कधी तर जीवित हानी देखील होते. हेच जर सामंजस्याने वागले , ज्याचा मान त्याला दिला, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले, आपापसांत चर्चा करून प्रश्न मार्गी लावले, एकमेकांशी आदराने वागले मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा छोटी असली तरी, मग अशी युद्ध होण्याचा संभवच निर्माण होणार नाही.
त्यामुळे असे वाटते की युद्ध हा शेवटचा पर्याय नसावा, तुम्हाला काय वाटते ?
सौ. राजश्री सुहास जाधव.
Sunday, 20 March 2022
डोकावलं का हृदयात ...
Tuesday, 15 March 2022
तिचा संघर्ष
ते एक अतिशय सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंब होतं. आई, वडील,दोघी बहिणी, दोघे भाऊ आणि आजी असे. अगदी अलीकडच्या काळातीलच गोष्ट आहे ही. घरात कमवणारे तेवढे एकटे वडील कर्ता पुरुष होते. सरकारी नोकरी होती पण पगार तसा जेमतेमच होता.
तरीही ते सर्व कुटुंब सुखा समाधानाने राहत होते. घरातील स्त्री म्हणजे मुलांची आई अत्यंत काटकसरीने संसार करून घर चालवीत होती. त्यामुळे आहे त्यात ते सुखाने राहत होते. वडिलांना सर्व मुले आबा म्हणत होते. आबा अतिशय सरळ, साधे ज्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. रोज सायकलवरून सकाळी ठरलेल्या वेळेत कामात जात असे आणि संध्याकाळी ठरलेल्या वेळेत घरी येत असे.
मोठा मुलगा 'विनय' हा खूप शिकलेला होता. त्याचे आता लग्नाचे वय झाले होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता पण लग्न लवकर जमत नव्हते. मनासारखे स्थळ मिळत नव्हते. त्याच्या आईची म्हणजे सुमती काकूंची इच्छा होती की मुलाने त्यांच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे पण विनयला ते मान्य नव्हते. कारण त्याला नात्यामध्ये लग्न करायचे नव्हते. त्यामुळे सुमती काकूंचाही नाईलाज होता. खूप प्रयत्न केल्यानंतर एकदाचे विनयचे लग्न झाले. एका श्रीमंत व्यावसायिकाच्या मुलीशी, त्यांच्याच नात्यातील व्यक्तीच्या मध्यस्थीने लग्न ठरवले गेले होते. अशा तऱ्हेने घरामध्ये मोठ्या घरची लेक सून म्हणून आली होती. घरात सारेच खूप खूश होते. नवीन सुनेचे खूप कौतुक होत होते. सर्वांनाच तिच्याविषयी खूप अपेक्षा होत्या.
पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. नवीन सुनेला एकत्र कुटुंब नको होते. एवढ्या माणसांची
तिला सवय नव्हती, कामाची सवय नव्हती. त्यामुळे तिला वेगळा संसार थाटायचा होता. पुढे जाऊन तिने ते खरेही केले. ती घरात कोणाशीच बोलत नसे. तिच्या रूममध्येच सारखी ती झोपून राहायची. घरात मोठी नणंद ' विभा' लग्नाची होती. विभाचेही वय जवळ जवळ २७ चालू होते. मोठ्या भावाच्या लग्नामुळे तिचेही लग्न रखडले होते.
विभासाठी बरीच स्थळे पाहिली होती. पण प्रत्येक वेळेस काहीतरी अडचण येत होती. एकदा तर ठरलेले लग्न ऐनवेळेस क्षुल्लक वादावरून मोडले होते. कोणाला हुंडा हवा होता तर कोणी मुलगी जास्तच फॅशनेबल आहे म्हणून नाकारले होते, तर कोणी तिचे केस छोटे आहेत हे कारण देऊन नकार दिला होता. यामुळे विभा वैतागली होती. ती सारखी उदास राहू लागली. तिच्या बरोबरच्या सर्व मुलींची लग्न झाली होती. लग्नाची अशी तीच राहिली होती. शिवाय शेजारी - पाजारी, तिच्या मैत्रिणी सारख्या तिला लग्नाविषयी विचारत असे ,त्यामुळे ती मनातून जास्तच खचून गेली होती.
खरे तर विभा अतिशय हुशार, दिसण्यास सुंदर , धाडसी, सर्वगुणसंपन्न होती. ती सुंदर रांगोळ्या काढायची,
भरतकाम करायची, मेहंदीही सुंदर काढायची. स्वयंपाकही उत्तम येत होता तिला. कोणते काम येत नाही, असे
कधीच नव्हते. आईचे सर्व गुण तिने घेतले होते. छोट्या बहिणीसही ती खूप जीव लावत असे. त्यांच्या कॉलनीत
काही कार्यक्रम असला की विभाचा कायम पुढाकार असे. तिच्या अंगी नेतृत्व कुशलता होती. कॉलनीत गणपती उत्सवात, मंडळाचे देखावे तयार करण्याचे काम तिच्यावरच असे. तीही अत्यंत आवडीने ते करीत असे. तिची आई व मंडळातील मुले, तिचे दोन्ही भाऊ तिला हवी ती मदत करत असे. विभा सुंदर सुंदर देखावे करून देत असे. वेगवेगळ्या स्पर्धेतही ती नेहमी भाग घेत असे. त्यातही तिचा पहिला नंबर ठरलेला असे. इतर मुली त्यामुळे भाग घेण्यास घाबरत असे. अशीही विभा, बिनधास्त स्वभावाची कॉलनीत , नातेवाईकांत सर्वांची लाडकी होती.
पण हल्ली ती खूप उदास राहत असे. शिवाय तिची वहिनी तिला कधी भांडण झाल्यावर, लग्न ठरत नसल्याने येता जाता टोमणे मारत असे. या सर्वच गोष्टींमुळे विभा वैतागली होती. एकेदिवशी विभाने सहन न झाल्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. यामुळे घरातील सर्वजण खूप दुःखी झाले होते. तिच्या आईची अवस्था तर पाहवत नव्हती. पण सुदैवाने वेळेवर उपचार केल्याने विभा त्यातून बचावली होती.
तिने वडिलांना सांगितले होते की 'आता माझ्यासाठी स्थळ पाहू नका.' पण तरीही वडिलांनी तिचे नाव वधुवर सूचक मंडळात नोंदवले होते. एकेदिवशी त्यांच्यातर्फे वधूवर मंडळाच्या मेळाव्यात ते विभाला घेऊन गेले होते. तिथे एक मुलगा ' श्रीधर ' तिच्या वडिलांना आवडला. त्यांनी त्याची सविस्तर चौकशी केली. विभालाही तो मुलगा बरा वाटला. दुसऱ्याच दिवशी
त्या मुलाचाही वडिलांना फोन आला की त्यांना विभा पसंद आहे. मग काय सर्वजण खूपच आनंदी झाले होते. वडिलांनी विभाला विचारले तेव्हा ती म्हणाली , ' बाबा मुलगा चांगला आहे पण तो तंबाखू खात असावा, मी त्याच्या हातावर चुन्याचे डाग पाहिले आहे. मला नाही अशा मुलाबरोबर लग्न करायचे.' तिने असे म्हटल्यावर सर्वजण तिला ओरडू लागले की काय हा तुझा वेडेपणा ! सर्वांनी तिला खूप समजून सांगितले की ' तसे काही नसेल, तू उगाचच काहीतरी विचार करतेस. ' विभाने खूप
विचार करून शेवटी लग्नास होकार दिला. एका अर्थाने लग्न ठरत असल्याने तिलाही समाधान वाटत होते. घरातील वातावरण पुन्हा आनंदी झाले होते. तिची आई तर मनोमन देवाचे आभार मानत होती.
श्रीधरचे घर गावी होते, तिथे त्यांची थोडी शेती होती. ती त्याचा भाऊ आणि आई पाहत होते. शिकण्यासाठी म्हणून श्रीधर शहरात हॉस्टेल मध्ये राहत होता. लग्नानंतर तो भाड्याने फ्लॅट घेऊन राहणार होता असे त्याने विभाच्या वडिलांना सांगितले होते.
अशा तऱ्हेने विभाचे लग्न श्रीधरशी रिती रिवाजानुसार पार पडले. श्रीधरने पुण्यात भाड्याने फ्लॅट घेतला होता. थोडे दिवस गावी राहिल्यानंतर ते पुण्यात राहण्यास आले. विभाला तर संसाराची खूप हौस होती. तिने तिचे घर खूप सुंदर सजवले होते. नवीनच लग्न झाल्याने ती अधूनमधून छोट्या बहिणीस तिच्या सोबत राहण्यास बोलवून घेत असे. तिने स्वतःचे पार्लरही सुरू केले होते. तिचा त्यात चांगला जमही बसू लागला होता. श्रीधर आधी जागा देणे - घेणे हा व्यवहार करत होता पण नंतर त्याने तेही काम सोडून दिले व पुस्तक प्रकाशनाचे काम तो करू लागला होता. सुरुवातीचे ५-६ महिने विभाचे खूप छान गेले. पण नंतर त्या दोघांत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. तिची बहिण तिच्याकडे अधून मधून राहण्यास येत होती. तिलाही ह्या गोष्टी समजल्या होत्या. श्रीधर खरोखरच तंबाखू खात होता. नुसती तंबाखू नाही तर अधून मधून तो दारुही पित असे. विभाला तर व्यसनाची प्रचंड चीड होती आणि तिच्या नशिबी नेमके तेच आले होते.
हळु हळू त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. श्रीधर साध्या साध्या गोष्टींवरून तिच्याशी भांडण करत असे. जेवण बनविण्यावरूनही विभाला नको नको ते बोलत असे. तरी विभा ते सारे सहन करत होती. ती त्याकडे दुर्लक्ष करायची. तिच्या पार्लरमध्ये स्वतःचे मन ती रमवत असे.
काही दिवसांनी तिच्या आयुष्यात अतिशय आनंदाचा दिवस आला. विभाला दिवस गेले होते. ती मनोमन खूप सुखावली होती. तिच्या माहेरी ही बातमी कळल्यानंतर सर्व खूप खूश झाले होते. विभाची ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांकडे सुरू होती. तिला खूप समाधान वाटत होते. पण इकडे श्रीधरचे पिणेही वाढले होते. अशातच एके दिवशी विभास चक्कर आल्याने तिला दवाखान्यात नेले तिथे तिच्या सर्व तपासण्या केल्या तेव्हा त्यातून समजले की विभाला कॅन्सर झाला आहे. ही गोष्ट जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईस सांगितली तेव्हा त्या फार खचून गेल्या. पण डॉक्टरांनी सांगितले की विभालाही हे सांगणे महत्त्वाचे आहे. तेव्हा वडिलांनी धीर एकटवून ही गोष्ट विभास सांगितली, तिला आधार दिला. विभाला सारे संपले आहे असेच वाटत होते. ती पुरती हादरून गेली होती. पण तिच्या बाळासाठी तिने तिचे दुःख बाजूला सारायचे ठरवले व काहीच झाले नाही असे दाखवत तिनेच तिच्या आई- वडिलांना धीर दिला.
पुढे विभाचे बाळंतपणही काही सोपे गेले नाही. दोन दिवस सतत तिला त्रास होत होता.त्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्यालाही तिच्याजवळ न ठेवता डॉक्टरांच्या देखरेखेखाली आठवडाभर ठेवले होते.
इतर बाळंतीण स्त्रियांसारखे विभाने मात्र जास्त आराम केला नाही. आई, बहिण तिला समजून सांगायच्या पण ती कोणाचे ऐकायची नाही. तिने २ महिन्यांनी पुन्हा तिचे पार्लर सुरू केले. बाळाचे सर्व करून ती पार्लर चालवत होती. श्रीधर दिवसेंदिवस जास्तच दारू प्यायला लागला होता. कामही तो कधी करत असे, कधी करत नसे. घरातील वस्तू विकून त्याचे पैसे घेत असे. पैशांच्या अडचणीपायी त्याने तिचे मंगळसूत्रही विकले होते. पण तरीही विभाने हार मानली नव्हती.
तिचा आजार बळावला होता पण तिला स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करायचे होते. खूप खटपट करून ,सर्व जवळचे दागिने मोडून , कर्ज काढून अखेरीस त्यांनी तिच्या माहेर जवळच स्वतःचे घर बांधले. तिथे तिने पार्लरमध्ये मुलींचे क्लास घेणे सुरू केले. छोट्या बाळाला आईजवळ ठेऊन ती दिवस रात्र काम करत होती. पार्लर बरोबरच तिने स्वतःचे छोटे हॉटेल सुरू केले. जेणेकरून कर्जाचे हफ्ते फिटतील, नवरा तो व्यवसाय पाहिल. हॉटेलही बऱ्यापैकी चालू होते. महिन्याच्या महिन्याला हफ्ते जात होते. विभा त्याकडे जातीने लक्ष देत होती. विभाचे व श्रीधरचे भांडण मात्र कमी होत नव्हते कारण तो पिणे काही सोडत नव्हता. विभाचा छोटा 'मनीष' आता पाच वर्षांचा झाला होता. तेव्हा तिने मोठ्या थाटामाटाने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.
तिचे आजारपण आता वाढले होते. ती वारंवार आजारी पडू लागली. औषधोपचार चालू होते पण त्याचा
काही उपयोग होत नव्हता. आई -वडील जवळ असल्याने ते तिच्याकडे लक्ष देत होते. आता तिला पार्लर कठीण
जात होते. त्यामुळे ते ही बंद झाले होते. नंतर नंतर ती पार अंथरूणाला खिळून होती. तिला तिच्या मुलाचे जास्त
लाडही करता येत नव्हते. आजी आजोबा छोट्या मनीषची खूप काळजी घेत होते. श्रीधरही मनातून घाबरून गेला होता पण कोणाच्याच हातात काही उरले नव्हते.
जेमतेम नऊ वर्षांचा संसार करून विभा छोट्या सात वर्षांच्या मनीषला सोडून देवाघरी गेली होती. संसाराची स्वप्नं पाहणारी, जिद्दीने जगणाऱ्या विभाचा संघर्ष इथेच संपला होता. एका वर्षाने श्रीधरही हे जग सोडून गेला. खऱ्या अर्थाने मनीष अनाथ झाला होता पण आजी आजोबांनी त्याला उराशी कवटाळले होते.
( सत्य घटनेवर आधारित)
सौ. राजश्री सुहास जाधव.
Friday, 11 March 2022
भीती
अंधार आणि प्रकाश
Wednesday, 2 March 2022
खेळ मनाचे
माणूस हा अतिशय आशावादी प्राणी आहे. स्वप्नात रमण्यास त्याला नेहमीच आवडते. त्याला नाविन्याची ओढ असते, गुढते विषयी आकर्षण असते,
कल्पनातीत जे आहे ते त्यास नेहमी हवे हवेसे वाटते.
मग त्याच्या मनाचे तर्क, वितर्क खेळ सुरू होतात.
माणसाचे मन हे त्याची मानसिकता कशी आहे
यावर अवलंबून असते. जर माणसाची मानसिकता कायम
नकारात्मक विचार करत असेल तर मनात त्याच्या तसेच खेळ सुरू होतात. उगाचच कशाचीही अनामिक भीती,
एखाद्याविषयी राग, सुडाची भावना , चित्र विचित्र स्वप्नं ,
हे असे सारे खेळ माणसाच्या मनात सुरू होतात आणि सुरू होते असह्य वेदना.
शरीराला जशी भूक लागते तशी मनाला माणसाच्या, नेहमीच भूक लागते. ती भूक शमविण्यासाठी
तो मग मनात इमले रचू लागतो. त्याला जे साध्य प्रत्यक्षात
होत नाही , ते तो मनाच्या खेळात साध्य करू पाहतो.
तो आकाशास गवसणी घालू लागतो. त्याला कधी मुक्त जगायचे असते, 'कधी सारे सुख पायाशी लोळण घेत आहे', या भ्रमातच त्याला राहायचे असते. कधी मनाच्या
ह्या खेळात तो एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो एकतर्फी,
तर कधी टोकाचा राग धरतो एखाद्या विषयी, कधी माणसाचे मन इतके बेभान होते ह्या खेळात तो इतका
रंगून जातो की त्याला कसलेच ,वास्तवाचे भान राहत नाही.
माणूस एखाद्या विषयी चुकीचे मत करून घेतो आणि तसेच खेळ मनात रचतो. ती व्यक्ती कितीही आकांताने तिची बाजू मांडू लागली तरी त्याला मग ते
काही पटत नाही.
जीवनात माणसाला सुखी व्हायचे असेल तर आधी त्याने स्वतः आनंदी राहण्यास शिकले पाहिजे.
आजू बाजूचे लोक जरी कसेही वागले तरी त्याचा परिणाम
त्याच्या मनावर होता कामा नये, तेव्हाच माणूस आनंदी
होऊ शकतो. त्याचे मन प्रसन्न आणि विनयशील असेल
तर माणसाचे मन ही तसेच स्वप्नं पाहू लागते. त्याच्या
मनातले खेळही त्यास आनंद देणारे असतात. त्याला कधी
मग फुलपाखरू व्हावे वाटते, कधी आकाशातील तारा, तर कधी झरणारा निर्झर, तर कधी एखादं आवडतं व्यक्तिमत्त्व, माणूस त्याच्या मनाच्या खेळात होऊन जातो.
त्या मनातील विचाराने त्याचे काही नुकसान होणार नसते.
कारण त्याच्या मनास वास्तवाची जाणीव असते. हे मनाचे खेळ तो सहज पाहत असतो.
मनाच्या ह्या खेळात किती रमावे आणि कुठे
थांबावे ह्याचे भान ज्याने त्याने राखलेच पाहिजे नाहीतर
जीवनाचा मेळ बसणे कठीण होऊन जाईल. त्याकरिता माणसाने कायम आनंदी, निर्मळ मन ठेवले पाहिजे.
सौ. राजश्री सुहास जाधव.
बोनस
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
-
सत्ता, संपत्तीच्या हव्यासापायी मनुष्य रचतो कूटनीति त्यातुनी नाना समस्या त्या उद्भवती स्वार्थापोटी त्यांच्या, निरपराध ते होरपळती शोषण क...
-
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
-
नाते मग ते कोणतेही असो , बहिण भावाचे, आई वडिलांचे , पती पत्नीचे, मित्र मैत्रिणींचे , प्रियकर प्रेयसीचे ; त्या नात्यांना जर जखडून ठेवले तर मग...