Sunday, 27 November 2022

ऑनलाईन मैत्री


           ऑनलाईन मैत्री 
 ऑनलाईन मैत्रीचे जसे फायदे आहेत तसे खूप गंभीर असे परिणामही त्यामुळे भोगावे लागतात, हे तर आता साऱ्यांनाच माहित आहे. 
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
       ऑनलाईन मैत्री वर इथे एक कविता सुचली आहे , ती अशी :
  ऑनलाईन मैत्रीने तिलाही भुरळ घातली
  विचार करण्याची क्षमताच जणू खुंटली
  अजाणतेपणी गेली वाहवत अशी काही
   मोहाच्या पाशात ती आपसूक गुंतली....

ऑनलाईन मैत्रीने केली अशी दैना
रोज तो म्हणे तिला," तुझ्याविना जीव राहिना "
ती ही भुलली त्याच्या बोलण्याला
तिचाही दिवस त्याच्याशी बोलल्याशिवाय जाईना.....

रोज सकाळच्या गुड मॉर्निंग पासून रात्रीच्या गुड नाईटपर्यंत 
किती आणि काय, काय बोलणे होई !
नव्हते त्यांस काही ताळतंत्र 
मिस यू, मिस यू म्हणत एकमेकांस दिवस जाई.....
      
झाली एकदा उपरती,आली अवचित भानावर
ऑनलाईन मैत्रीनेच आणली गदा तिच्या आयुष्यावर
जाणले तिने जेव्हा नव्हती तीच एकटी त्याच्या आयुष्यात 
खूप जणींना लावूनी नादी तो खेळत होता खेळी त्यांच्यावर ......
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
               
    ऑनलाईन मैत्रीचे हे प्रस्थ इतके माजले आहे की तरुणाईचे तर त्याविना पान हलत नाही. पूर्वीच्या काळी कुठे होते असे काही तंत्रज्ञान विकसित पण त्या मैत्रीत खरी ओढ होती, ती दृढ होती. मुळात मैत्रीच्या मर्यादा सांभाळूनच ती मैत्री निभावली जात होती. तिथे कसलाही स्वार्थ, दिखाऊपणा नव्हता. ती मैत्री मग दोन
मित्रांतील असो वा दोन मैत्रिणींतील असो ती निखळ होती.

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷                        

        हल्ली फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, व्हॉट्सॲप, स्नॅप चैट अशी कितीतरी माध्यमे आहेत ज्यात ही तरुणाई अखंड बुडालेली असते. ऑनलाईन जग हेच खरे मानून मग तिथे मैत्री केली जाते. लाईक्स मिळविणे आणि एकमेकांना फॉलो करणे नंतर पर्सनल नंबर घेणे इथून सुरुवात झाली की ती थेट नको ते वळण घेते. ह्यात प्रेम, मैत्री कुठेच नसते फक्त आकर्षण असते किंवा एखादा
फसविण्याचा दृष्टिकोन ठेऊनच मैत्री करतो. अशा मैत्रीत ना एकमेकांविषयी आदर असतो ना काळजी. जर एखाद्यावेळेस समोरून प्रतिक्रिया मिळण्यास वेळ झाला किंवा ताबडतोब जर उत्तर नाही दिले गेले की मग गैरसमज त्यातून पुन्हा वाद सुरू होतात. एकमेकांवर जीव ओवाळून टाकणारे क्षणाचा विलंब न करता ब्लॉक करून मोकळेही होतात. इतका ह्या  मैत्रीतील विश्वास कमकुवत असतो.  एकमेकांना इतके गृहीत धरत असतात की प्रत्येकास त्याचे व्यक्तिगत आयुष्य हे असतेच हे ही विसरले जाते.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
        
      ऑनलाईनची ही आभासी दुनिया ज्याने आपल्याला साऱ्या सुख सोयी उपलब्ध करून दिल्या असल्या तरी त्याच्या विळख्यात आजची तरुणपिढी बेमालूमपणे अडकत चालली आहे ते ही तितकेच खरे आहे. खोटे फेक अकाउंट्स बनवून फसवणे, व्हिडिओ कॉलिंग द्वारे स्क्रीन रेकॉर्डिंग करून मुली, मुले एकमेकांस ब्लॅकमेल करून 
पैसे उकळण्याचे धंदे करत असतात त्याला जर कोणी जुमानले नाही तर त्या व्यक्तीची बदनामी करण्यासही मुले, मुली मागे पुढे पाहत नाही.
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
           
      ऑनलाईन मैत्री करताना आपण ती कोणाशी करत आहोत, समोरील व्यक्तीचा हेतू कसा आहे, त्याच्या विषयीची संपूर्ण माहिती ही आपणास असणे गरजेचे आहे. जरी नाही मिळाली सर्व माहिती तर आपण आपल्या मर्यादा राखूनच बोलले पाहिजे. आपली सर्व माहिती अशी कोणास सहज देताही कामा नये. न जाणो कोणी त्याचा कधी गैरफायदा घेईल ते आपल्याला समजणार देखील नाही. कधी कधी  ह्या ऑनलाईन मैत्रीतून चांगलेही घडताना पाहिले आहे. जन्मोजन्मीचे जोडीदारही ह्या मैत्रीतून होताना दिसले आहे. त्यामुळे ऑनलाईन मैत्रीचे चांगले आणि वाईट असे दोन्हीही परिमाण दिसून येतात फक्त ते आपणास ओळखता आले पाहिजे.


🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

सौ. राजश्री सुहास जाधव.



          





                    



             
             

Wednesday, 1 June 2022

बायको

मनातील डायरीचे पान  🌿🌿:-
बायको : ( एक कणा कुटुंबाचा )
बा - बाराही महिने,
य - यथा शक्ती, 
को - कोणतेही काम चोख बजावणारी, अशीच असते बायको. 
            
पटले की नाही😀पण खरेच आहे ते. एक गृहिणी म्हणून तिची सर्व कर्तव्य ती पार पाडत असते. तेही कसलीच अपेक्षा न ठेवता. घराला घरपण येते ते तिच्यामुळे. मग ती आई असो, मुलगी असो वा पत्नी. माहेरी लहानाची मोठी होते. ज्या घरी ती वाढली, इतकी वर्ष सुखात कसलीच जबाबदारी नसलेली ती लग्न झाले की आयुष्यभरासाठी सासरी सर्व जबाबदारी अगदी सांभाळून घेते. सर्वांना आपलेसे करते. तिच्यामुळे दोन्ही कुटुंब जोडली जातात. ज्येष्ठांना आदर, सगळ्यांना काय हवे,नको ते पाहणे, घरातील सर्वच कामे, सणवार, पाहुणचार, सगळ्यांची दुखणी , आदरातिथ्य मुलांवर संस्कार हा जणू तिने घेतलेला मक्ताच असतो. तिला त्यासाठी गृहीत धरतात. एक स्त्रीही ते अत्यंत प्रेमाने ती सर्व कामे करत असते. तिला फक्त तुमच्याकडून दोन शब्द प्रेमाचे ऐकायचे असतात, तिचे कौतुक केले की तिच्या आनंदाला पारावार राहत नाही. 
         
         नोकरी करणारी स्त्रीही देखील कोणाची आई, पत्नी असते. तिच्यावर तर जास्त जबाबदारी असते. ती नोकरी करते म्हणून घराला वाऱ्यावर सोडत नाही. सर्व घरातली जबाबदारी सांभाळून ती नोकरी करते. हे करत असताना तिची किती कसरत होते हे तिलाच ठाऊक. घरातील किराणा, दळण, साफसफाई, भाजीपाला, घरात जर वृध्द व्यक्ती असतील तर त्यांची देखभाल,छोट्या छोट्या गोष्टींकडेही  तिलाच जातीने लक्ष द्यावे लागते. नाही तर तिचा सतत उद्धार  होत राहतो. तिच्या नोकरी करण्याचाही काहींना त्रास होतो. तिला टोमणे ऐकावे लागतात. नोकरी करते म्हणून कोणी तिला काही आयते खाण्यास आणून देत नाही. ती कुठे जरी बाहेर गेली तरी नंतर सर्व कामे ही तिलाच पूर्ण करावी लागतात. काही अपवाद असतात. ज्या कुटुंबात स्त्रियांना असा पाठिंबा मिळत असेल अशी कुटुंब खूपच कौतुक करण्याजोगी आहेत. 
                
           ज्या घरात ती नसते, अशी घरे एकदा जाऊन बघा, त्या घराचा जणू आत्माच हरवलेला असतो. एका स्त्रीच्या असण्याने घरात चैतन्य निर्माण होते. साऱ्या घरावर तिची एक छाप असते, नीटनेटकेपणा त्या घरात असतो. संस्कार जपले जातात. ह्या सर्वांचा अभाव, ज्या घरात स्त्री नसते तिथे दिसून येतो. हे सर्व मी अनुभवले आहे, जेव्हा मी माहेरी जाते तिथे आता आई नसल्याने घर एकदम भकास वाटते, करमत नाही. एक पोकळी निर्माण झाल्याची सतत जाणीव होत राहते. 
                  
             कधी कधी स्वतःच्याच बायकोविषयी बोलताना पुरुषमंडळी किती सहजपणे बोलून जातात, ' आमची मंडळी घरातच असतात, बाकी काही करत
नाही.' पण कधी विचार केला आहे का तुम्ही ? घरात ती सतत राबत असते. त्याचा कधी मोबदला मागत नाही. एक दिवसही तिच्या कामांना सुट्टी मिळत नाही. सर्वांस
हवे ते हवे तेव्हा खाण्यास बनवून देते. तिला कधी वाटत नसेल का आपल्यालाही कोणी आयते बनवून द्यावे, एखाद्या दिवशी उशीरा उठावे, मनासारखे जगावे, हिंडावे,
नवऱ्याने तिचे कौतुक करावे, तिला फिरायला घेऊन जावे. असे काही ठिकाणी होत असेलही पण सर्वसाधारण सर्वत्र अशीच परिस्थिती असते, कामाच्या व्यापात स्त्री 
स्वतःचं अस्तित्वच विसरून गेलेली असते. तिचे छंद, तिच्या आवडी निवडी तिने बऱ्याचदा बाजूला सारलेल्या आढळतात. खरे तर असे म्हटले पाहिजे, ' एक स्त्री काय काय करते !' 
               
            स्त्री मग ती आई, बहिण, मुलगी, पत्नी कोणीही असो, तिची कदर करा. तिला जपा, तिच्यातील गुणांचे कौतुक करा, पाठिंबा द्या आणि कधीतरी  तिच्यासाठी स्वतः काहीतरी बनवून द्या, अगदी चहा जरी केला तरी ती किती खूश होते ते पाहा ! स्त्री आणि पुरुष ही रथाची दोन चाके आहेत, त्यामुळे एक चाक जरी डळमळीत झाले तर संसार कोलमडून पडण्याची शक्यता असते. तेव्हा दोघांनी सामंजस्याने वागणे हिताचे ठरते. 

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 25 May 2022

दोष कोणाचा?...

दुसऱ्याला दोष  देणं असतं किती सोपं !
विचारून पाहा मनास एकदा, का सारखं असं होतं ?
दुसऱ्याच्या चुका दाखवण्यास माणूस असतो तरबेज 
येते जेव्हा स्वतःवर वेळ, तेव्हा मात्र बोलणंच खुंटतं .....

एकमेकांना दोष देण्यात का घालवावा वेळ ?
अशाने सांधणार नाही कधीच ताळमेळ 
जीवन आहे क्षणभंगुर, आज आहे, उद्या नसेलही
होईल कधीही ते फितूर अन् मनाची  वाढेल घालमेल .....

जे असते चांगले, ग्राह्य,  ते दिसत नाही कोणाला
होता एखादी जरी चूक, दाखविण्यास ती मात्र,
माणूस नेहमीच  पुढे सरसावला 
असेच चालू राहते मग दोषारोपाचे अविरत सत्र .....

खरे पाहता दोष नसतो कोणा एकाचा,
करावा सदैव विचार दोन्ही बाजूंचा 
मिटवावे मतभेद ते सामंजस्याने, 
तरच होईल उत्कर्ष जीवनाचा ......

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

सौ. राजश्री सुहास जाधव.

Sunday, 22 May 2022

बाग

बाग
आमच्या घरकुल कॉलनीच्या बाहेर थोड्या अंतरावरच एक सुंदर असा बगीचा आहे. सर्व तऱ्हेच्या झाडांनी, फुलांनी बहरलेला. वेगवेगळ्या रंगांची जास्वंद, अबोली, सदाफुली, पेरू, सीताफळ, अशोक...अशी बरीच झाडे बागेत होती. बागेची रखवाली करण्यास तिथेच एका 
खोलीत एक रखवालदार त्याच्या परिवारासह राहत होता. त्यामुळे बागेची योग्य ती काळजी घेतली जात होती. बागेत व्यायामासाठीचे साहित्यही ठेवले होते, त्यामुळे  सकाळ संध्याकाळी बागेत भरपूर लोक हे येत असत. प्रत्येकाचे असे ठराविक टायमिंग ठरलेले होते त्यामुळे जो तो बागेत थोडे फिरून, व्यायाम करून झाले की अर्धातास
बागेत निवांत गप्पा मारण्यात दंग असे.  
          आजही आमच्या कॉलनीतील देशपांडे काकू, सावंत काकू, जोशींच्या रमा आजी, मोरे यांची लेक राखी, गव्हाणेंची नेहा, सुमती काकू , दीपा,  क्षीरसागर आजी, सानिका आणि अर्थात मी अशी वेगवेगळ्या वयाची तरीही एकमेकांची चांगली गट्टी जमलेली.  मंडळी व्यायम आटोपून गप्पा मारण्यात दंग होती. रोज एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा, सल्लामसलत असे नित्याने होत असे. आजही त्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची चर्चा रंगली होती. विषय होता, ' घरात तुमच्या मताला किती प्राधान्य देतात, ऐकतात.' चर्चेने चांगलाच जोर धरला होता. 
          देशपांडे काकू म्हणाल्या, " आमचे हे आणि माझी मुले एखाद्या विषयावर माझे म्हणणे ऐकून घेतात, मग आम्ही त्यावर चर्चा करतो आणि त्यानंतरच एखादी गोष्ट ठरवतो." सावंत काकू म्हणाल्या, " आता सर्व घरातील कारभार ह्यांच्या पाठीमागे सून आणि मुलगा पाहतो. ते स्वतःहून काही सांगत नाही आणि मीही काही जास्त विचारत नाही. ते जसे ठरवतील तसे." त्यावर सुमती काकू आणि राखी मध्येच बोलू लागल्या, " काकू पण हे चूक आहे, जर महत्वाच्या गोष्टी असतील तर तुमचे मतही घेतलेच पाहिजे ना," त्यावर सावंत काकू म्हणाल्या," अगं, तसे नाही राखी, त्यांनाही जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे ना, मी किती दिवस आहे त्यांच्या बरोबर. कधी कधी निर्णय चुकतील पण त्यातूनच ते सुधारणा करतील. जर काही चुकले तर मी आहेच की त्यांना सांगायला.
              त्यांचे बोलणे चालू असतानाच रमा आजींनी पिशवीतील काहीतरी आणलेले बाहेर काढले आणि 
त्या सर्वांना म्हणाल्या, " आधी ही कैरीची डाळ खा बरं आज सुनबाईंनी बनवली होती. तीच मला म्हणाली तुमच्या मैत्रिणींना घेऊन जा." मग चर्चा तिथेच थांबवून आम्ही सगळ्यांनी कैरीच्या डाळीचा आस्वाद घेतला.
एव्हाना बाग बंद होण्याची वेळ झाल्याने सर्वांनीच आटोपते घेतले आणि उद्या पुन्हा भेटू, म्हणून निरोप घेतला.
      संध्याकाळी ठरल्या प्रमाणे सर्वजण बागेकडे आले तर बाग बंद आणि तिथे सूचना फलकही लावला होता,
' सदर बाग ही दुसरीकडे होणार आहे, नवीन प्रकल्प येथे सुरू होत असल्याने बागेची जागा  दुसरीकडे असेल, तरीही नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी.' ह्या अशा सूचना फलकावर लिहिलेल्या सुचनेने सर्वांनाच नवल वाटले आणि रागही आला. आम्ही साऱ्याजणी आपापसात चर्चा करू लागलो. नंतर रखवालदार दादा आले आणि म्हणाले, " अहो ताई सकाळीच पालिकेतील माणसे, साहेब येऊन गेले , पाहणी करून गेले. इथे कसले तरी ऑफिस होणार आहे. आणि नंतर मग हा फलक लावण्यास मला सांगितला." रखवालदाराचे बोलणे ऐकून नेहा, क्षीरसागर काकूंना तर खूपच राग आला. सर्वांनी समजून सांगितल्यावर त्या शांत झाल्या. आम्ही सर्वजण मग देशपांडेंच्या घरी त्यांच्या टेरेसवर गेलो चर्चा करण्यासाठी. सावंत काकू म्हणाल्या, " हे पाहा बाग ही नागरिकांसाठी  आहे. इतक्या वर्षांपासून सर्वजण ह्या बागते फिरण्यास, व्यायाम करण्यास येत आहोत त्यामुळे सर्वांचेच आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे, ह्या
बागेमुळे. आपल्या कॉलनीची शान आहे ही बाग. वातावरणही चांगले हवेशीर राहते बागेमुळे." सर्वांनी त्यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. रमा काकू म्हणाल्या, " आपण कॉलनीतील सर्वांस एकत्र बोलावून मीटिंग घेऊया आणि आपले मुद्दे त्या पालिकेच्या साहेबांसमोर मांडुया. जर त्यांनी नाहीच ऐकले तर आपण सर्व उपोषण करूया."
              झाले, ठरल्याप्रमाणे कॉलनीत एक मीटिंग घेतली. सर्वानुमते त्या पालिकेत जाऊन आधी अर्ज सादर 
केला, सर्वांचे म्हणणे त्या साहेबांना सांगितले. तेव्हा कॉलनीतील बच्चे कंपनीही बरोबर होती. त्यातील छोटा 
यश साहेबांना म्हणाला, " काका , आमची बाग नका तोडू, आम्हाला करमनार नाही." त्याच्या ह्या बोलण्याने 
साहेबांना काय बोलावे समजेना. साहेब म्हणाले," मी प्रयत्न करतो, वरून ऑर्डर आहे पण तुमचे म्हणणे मी 
त्यांना सांगतो. तो पर्यंत तुम्ही थोडे समजदारीने वागा. सूचनेचे पालन करा."
            त्यानंतर आम्हीही सारे पुन्हा माघारी आलो. आठवडाभर सारे कॉलनीतील लोक शांत राहिले कारण
सर्वांना निकाल काय लागतो त्याची काळजी होती. आठवडाभराने रखवालदाराचा मुलगा धावत येऊन साऱ्यांना आनंदाची बातमी देऊन गेला की, ' उद्यापासून बाग पुन्हा उघडेल, आताच आम्हाला कळले.'  हे ऐकून मला तर इतका आनंद झाला की मी लगेच फोन करून कॉलनीतील बऱ्याच लोकांना सांगितले. नंतर सर्वांनाच ही आनंदाची वार्ता समजली. सुमती काकू तर म्हणाल्या की ' मी आजच शनीला जाऊन नारळ फोडून येते' त्यांच्या ह्या बोलण्याने साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

सौ.राजश्री सुहास जाधव.







        
          




         

          

Saturday, 21 May 2022

प्रेम की आकर्षण?

मनातील डायरीचे पान🌿🌿 :- अंतर्गत विषय 

             प्रेम की आकर्षण ?
        
         'इस प्यार से मेरी तरफ ना देखो प्यार हो जायेगा' खरेच असे एका नजरेत एखाद्यावर प्रेम होऊ शकते का ? असे नेहमी आपण ऐकतो की पाहताक्षणी ती किंवा तो तिच्या प्रेमात पडला. असे होतही असेल पण प्रेम हे सहवासाने, एकमेकांस समजून घेण्याने निर्माण होत असते. प्रेमात  माणूस आंधळा होतो असे म्हणतात त्याला प्रेमापुढे कशाचीच फिकीर नसते. हे जरी खरे असले तरी खरे प्रेम हे डोळसपणे एकमेकांत निर्माण झालेले असते. 
              
          किशोर वयात म्हणजे मुला मुलींना या विषयी खूप कुतूहल असते. त्यांच्या मनात वेगवेगळ्या भावना उत्पन्न होत असतात. शाळेत असताना एखादी मुलगी आवडू लागते. तिच्याशी मैत्री करावीशी वाटते. मग त्यालाच ते प्रेम समजू लागतात. पण ते प्रेम नसून आकर्षण असते.
आणि अशा वेळेस पालकांनी मुलांशी अशा गोष्टींवर मनमोकळे पणाने बोलणे गरजेचे असते. मुलांना तुमच्याशी बोलण्यास संकोच वाटतो पण पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांस योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे असते. असे केल्याने मुले भरकटणार नाहीत.
           
             प्रेम आणि आकर्षण या दोन्ही मध्ये  एक सूक्ष्म रेषा आहे. जी पटकन लक्षात येत नाही. कॉलेज मध्ये असे प्रेमवीर खूप पाहण्यास मिळतात. त्यांचे हे प्रेम वारंवार उफाळून येत असते. मग त्यासाठी ते कोणते कोणते मार्ग अवलंबतात, जेणे करून एखादी मुलगी त्यांच्या प्रेमात पडेल. इतके स्वस्त असते का प्रेम?  खऱ्या प्रेमाचा अर्थही त्यांस समजलेला नसतो. नुसते बाह्य सौंदर्यावर भाळून, कोणताही सारासार विचार न करून एखादा मुलगा किंवा मुलगी एकमेकांच्या प्रेमात पडतात. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता भावनेच्या भरात पळून जाऊन लग्नही करतात आणि कालांतराने त्यांच्यातील प्रेम कुठे नष्ट होते ते त्यांनाच कळून येत नाही, मग सारखे खटके उडू लागतात. जगण्यासाठी इतरही गोष्टींची गरज लागते हे नंतर त्यांच्या लक्षात येते, परिस्थितीचे चटके बसू लागतात. अशा वेळेस एकेमकांचा सहवासही मग त्यांस नकोसा वाटू लागतो. कधी कधी गोष्टी अतिशय कठीण होऊन जातात. घटस्फोटापर्यंत येऊन त्यांचे प्रेम संपुष्टात येते.
              
        का होते असे? खरे तर प्रेमा सारखी सुंदर अनुभूती दुसरी कोणतीही नाही. प्रेम हे अंतःकरणातून व्हावे लागते. प्रेमात समर्पण असते, त्याग असतो. एखाद्या व्यक्तीच्या गुण दोषांसहित तिचा स्वीकार त्यात केला जातो. ते निःस्वार्थ असते. प्रेम हे सहवासातून फुलत जाते. प्रेमात एकमेकांविषयी काळजी असते. दूर राहूनही प्रेम हे हृदयात कायम जपले जाते. स्वतःस कितीही त्रास झाला तरी आपल्या प्रेमाच्या व्यक्तीस त्याची झळ बसू नये ही भावना प्रेम करणाऱ्या व्यक्तींमध्ये कायम असते. प्रेमात असलेली व्यक्ती आपले म्हणणे तिच्या आवडत्या व्यक्तीवर लादत नाही. ती कितीही लांब जरी असली तरी त्यांचे प्रेम, अस्तित्व मनात सदैव असते आणि विनाकारण ते दुःखी न राहता कायम आनंदी राहतात. हेच खरे प्रेम असते. एका नजरेत प्रेम होते असे आपण म्हणतो पण ते आकर्षण असते. तो प्रेम होण्याचा टप्पा असू शकतो. त्यासाठी त्या दोन व्यक्तींना एकमेकांस समजून घ्यावे लागते, सहवासातून नंतर प्रेम हे बहरत जाते. 
              
                एखाद्या व्यक्तीचे दिसणे, तिचा आवाज, तिचे व्यक्तिमत्त्व आपणास आवडू लागते. ती व्यक्ती कायम आपल्या सोबत असावी असे वाटू लागते, तेव्हा त्या व्यक्तीस हे प्रेम आहे असे वाटू लागते परंतु ते प्रेम नसून आकर्षण असते. कारण खऱ्या प्रेमात ज्याच्यावर प्रेम आहे ती व्यक्ती दूर असली तरी मनाने तितकीच जवळ असते. आकर्षणात त्या व्यक्तीची सोबत हवी असते. 
स्पर्श हवाहवासा वाटतो. आकर्षणात आग्रह, हट्ट हा ठरलेला असतो. खऱ्या प्रेमात कोणत्याही  प्रकारचा आग्रह धरला जात नाही. इतके प्रेम त्यांचे समंजस आणि बळकट असते. 
           
                 प्रेमावर जितके बोलू तितके कमीच होईल. प्रत्येकाने प्रेम आणि आकर्षण यातील फरक जाणला तर प्रेम काय असते ते सहज उमजून जाईल. खऱ्या प्रेमाची अनुभूती माणूस घेत राहील.
                    
      

   सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 6 May 2022

प्रेम

पहिल्या प्रेमावर करण्यास भाष्य
नाही मी इतकी महान
प्रेम मग ते कोणाचे,
कोणावर जडलेले असो
असते मात्र छान .....

काय माराव्या इथे प्रेमाच्या गप्पा !
तो तर हृदयातील एक अनमोल कप्पा
कुपीत हृदयाच्या असे तो जतन
न फुललेल्या प्रेमाचा, असे तो एक टप्पा ....

पहिलं अन् दुसरं असं असतं का प्रेम?
माहित नाही मला तरी !
प्रेम हे प्रेमच असतं,
हीच आहे भावना खरी .....💞💞💞

सौ. राजश्री सुहास जाधव.

Monday, 2 May 2022

कदर असेल तिथेच व्यक्त व्हा




मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय

आजकाल विश्वास कोणावर ठेवावा, कोणावर ठेऊ नये हे समजत नाही. कोण कधी कसे वागेल ह्याचा नेम नाही. सोशल मीडियाच्या, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून खूप सारी नवीन नाती आपण जोडतो.  भले प्रत्यक्ष भेट होत नसली तरी आपणास ही नाती हवी हवीशी वाटतात. कधी कधी तर आपण अशा मैत्रीच्या इतके आहारी जातो की त्या व्यक्ती विषयी काहीही माहित नसताना आपण सगळे मनातील त्याच्या जवळ बोलून जातो.पण ती व्यक्ती खरोखर विश्वासास पात्र आहे का? याचा जराही विचार न करता मनातील भावना बोलून जातो अगदी डोळे झाकून. पण जर ती व्यक्ती फक्त आपल्याशी स्वार्थापोटी बोलत असेल तर अशा व्यक्तींकडून आपणास धोकाच
मिळू शकतो. आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन अशी व्यक्ती आपल्याला हवा तसा त्रास आपणास देऊ शकते आणि त्यातून नवीन संकट उभे राहू शकते कधी कधी तर गोष्टी अगदी हाताबाहेर जातात आणि नको ते माणूस करून  बसतो, परिणामी नाहक जीव गमवण्याचीही वेळ येऊ शकते.
        यासाठी मैत्री किंवा कोणतेही नाते तयार होत असताना माणसाने डोळे, डोके, मन जागेवर ठेऊन सर्व शहानिशा करूनच अशा नात्यांचा स्वीकार करावा. जिथे आपल्या मतांचा आदर केला जातो, उपेक्षा केली जात नाही, आपल्या भावनांची जिथे कदर असते, आपल्याला बोलण्याचे तिथं स्वातंत्र्य मिळते, काय चूक, काय वाईट हे एकमेकांस समजून सांगितले जाते, अशाच ठिकाणी खरे तर माणसाने व्यक्त झाले पाहिजे. 
          बऱ्याचवेळा असे आपल्या नातेवाईकांत किंवा मित्र परिवारात असे आढळते की मनात एकमेकांविषयी अजिबात आपुलकी नसते फक्त एक औपचारिकता म्हणून ही नाती असतात. तिथे नेहमी आपले अस्तित्व गौण असते. आपल्या म्हणण्यास काही किंमत नसते, कायम दुर्लक्षित राहतो. जरा पाठ फिरलीकी आपली निंदा नालस्ती त्यांच्या कडून होत असते. मग अशा ठिकाणी का राहायचे ? त्यापेक्षा एकटे राहिलेले काय वाईट !
            ज्या लोकांना आपल्या असण्याने आनंद होणार आहे, आपण चुकलो तर हक्काने आपल्याला जी माणसे समजावून सांगतात, आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची कायम तयारी असते, अशा ठिकाणीच
आपण खरे तर व्यक्त व्हावे , नाते निर्माण करावे. 

सौ. राजश्री सुहास जाधव.

Thursday, 28 April 2022

माझ्यातील मी

बऱ्याचदा माझ्याच मी ला शोधत असते 
नित्य ह्या मनाच्या लपाछपीत हरवून जाते
भासते कधी अंतर्मुख तरी कधी निर्विकार, 
कशी आहे मी ? माझेच मला न गवसते .....

कधी होऊनी जाते खूपच चंचल, 
उमटती मनात भावना त्या तरल 
कधी होऊनी जाते खूपच संयमी, 
अन् आखते धोरण साचेबद्ध जीवनी.....

खरेच माझ्यातील मीस पाहायचे आहे शोधून!
अहंकार, दुजाभाव, कपट अन्  लोभासी त्याज्य करून 
जमेल का मला ह्या साऱ्यांना वगळून?,
महत प्रयासाने होईल साध्य, सांगते मी मनास बजावून....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

गझल १७, लेक

आनंदकंद वृत्त :- मात्रा २४

का भेद हा मुलीने झेलायचा कळेना 
इथल्या समानतेशी संबंधही जुळेना ...

जन्मास लेक आली हा काय दोष माथी 
का भोग हे तिच्या रे नशिबी कसे टळेना ...

ध्येयास पंख द्यावे देऊन तिस दुजोरा 
का भाव मानवाच्या हृदयात तो रुळेना ...

गोठून आज गेल्या  साऱ्याच वेदना त्या 
डोळ्यांत आसवांची का धार ही गळेना ...

जखडून बंधनाची का घालतात बेडी 
का बेगड्या रिती या जळताच रे जळेना ...

सौ. राजश्री सुहास जाधव.

Tuesday, 26 April 2022

अलंकार

अलंकार 
स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारे, स्त्रियांच्या अगदी आवडीचा आणि अविभाज्य घटक म्हणजे वेगवेगळे अलंकार. जे घालून मिरवण्यास स्त्रियांना अतिशय आवडते.चार चौघीत आपले कौतुक व्हावे, सगळ्यांत
आपण उठून दिसावे ही त्या मागची भावना असते. 
            फार पूर्वीपासून स्त्रियांच्या जीवनात दागिन्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि सोन्याचे वा चांदीचे दागिने घालणे हे आरोग्य दृष्ट्याही चांगले असते. स्त्री काय किंवा पुरुष काय दोघेही त्याचा वापर करतात. 
हे धातू शरीरातील उष्णता कमी करतात. शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास त्याने मदतही होते. हे सर्व जरी खरे असले तरी आजच्या युगात असे दागिने घालून मिरवणे धोकादायकही आहे. या दागिन्यांपायी कधी कधी जीवासही मुकावे लागते. ज्याची ऐपत नसते ते लोक मग खोटे दागिनेही घालतात आणि त्यात समाधान मानतात. पण कधी कधी असे खोटे अलंकार शरीरास घातक 
ठरतात. 
            जसजसा काळ बदलला गेला तसे मुलींमध्ये दागिने वापरण्याची क्रेझ पूर्वीपेक्षा कमी झाली आहे आणि त्यामागे तथ्यही आहे. हे सगळे जरी खरे असले तरी दागिने हाच खरा अलंकार आहे का? त्यानेच फक्त स्त्रीचे सौंदर्य खुलून येते का ? तर नाही, माणसाचे मन हे निर्मळ असले पाहिजे, त्याच्यामध्ये सद्भाव असला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याविषयी माणूस जागरूक असला पाहिजे. तेव्हाच तो खरा माणसाच्या आयुष्यातील अलंकार ठरेल आणि त्याच्या मनाच्या सौंदर्याला सोन्याप्रमाणे झळाळी येईल. तोच दागिना माणसाला खरा शोभून दिसतो आणि आजन्म तो त्याच्याबरोबर राहतो.  बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंग माणसाचे जर निर्मळ असतील तर कृत्रिम अलंकारांची त्याला गरज भासत नाही. लोकांच्या मनावरही अशीच माणसे अधिराज्य करू शकतात. या सर्व गुणां बरोबर माणसात कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, काहीतरी करून दाखवण्याची धमक माणसाच्या अंगी असली पाहिजे तेव्हा हेच सर्व अलंकार त्याच्या देहावर शोभून दिसतील. माणूस खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होऊ शकेल.
        बाह्य अलंकार घालून कोणी सुंदर दिसू शकत नाही त्यापेक्षा माणसाचे मन हे शुद्ध असेल तर  तो खरा सुंदर. यावरून एक गोष्ट आठवली चला तर मग वाचूया गोष्ट.....
           फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका राज्यात एक राजा आणि राणी, त्याच्या राजपुत्रासह राहत होती. राजाचे त्याच्या प्रजेवर अतिशय प्रेम होते. एक प्रेमळ राजा म्हणून त्याचा नावलौकिक होता. सर्व प्रजा त्याच्या राज्यात गुण्यागोविंदाने नांदत होती. तरीही राजा,राणी दोघेही दुःखी होते. त्यांच्या दुःखाचे कारण म्हणजे त्यांचा वयात आलेला राजपुत्र लग्न करण्यास नकार देत होता.
राजा, राणीनं खूप समजावूनही त्याला काही पटत नव्हते. शेवटी राणीने जेव्हा अन्न त्याग  करायचे राजपुत्रास सांगितले तेव्हा कुठे राजपुत्राने विवाह करण्यास संमती दर्शवली पण त्याने एक अट घातली. राजा, राणीनेही त्याची अट मान्य केली. ते दोघे अत्यंत खूश झाले. राजपुत्राची अट अशी होती की, 'जी मुलगी सर्वात सुंदर,
जिचे हात सर्वात सुंदर असतील अशा मुलीशीच मी लग्न करणार.'
          साऱ्या राज्यात राजाच्या आज्ञेनुसार दवंडी पिटवली गेली, 'जी मुलगी सर्वात सुंदर, जिचे हात सर्वांत सुंदर अशा राजकन्येशी राजपुत्र विवाह करील.' ही वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या राज्यातही ही बातमी समजली. जो तो राजा त्याच्या राजकन्येचा विवाह
राजपुत्राशी व्हावा ही इच्छा बाळगून त्यानुसार तयारी करू लागला. 
           अखेर तो दिवस उजाडतो ज्या दिवशी राजपुत्र त्या मुलीची निवड करून तिच्याशी विवाह करणार असतो. दूर दूर राज्यातून अनेक राजे त्यांच्या राजकन्येस घेऊन दरबारात हजर होतात. एकाहून एक सुंदर अशा मुली त्या दरबारात हजर असतात. सर्वांनी उंची वस्त्र, सोन्या,मोत्याचे अलंकार घातल्याने त्या सर्वच राजकन्या अतिशय सुदंर दिसत होत्या. तसेच आपण आणखी सुदंर 
कशा प्रकारे दिसू याची त्या राजकन्या काळजी घेत होत्या. काहींनी त्यांच्या हाताचे सौंदर्य खुलून यावे म्हणून हातावर सुंदर मेहंदी काढली होती, कोणी अतिशय सुंदर कला कुसर असलेले कंगण हातात घातले होते, कोणी रत्नजडित बांगड्या हातात घातल्या होत्या, जेणेकरून राजपुत्र आपलीच निवड करील  असे त्यांना वाटत होते.
           राजाच्या त्याच राज्यात एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगी होती. अतिशय मनमिळाऊ आणि सुशील अशी स्वभावाने होती. तिचेही लग्नाचे वय झाले होते. शेतकऱ्यास वाटते, जर राजपुत्राने आपल्या मुलीस पसंद केले तर किती भाग्याची गोष्ट असेल.  तो तसे त्याच्या मुलीस सांगतो. शेतकऱ्याच्या मुलीस ते पटत नाही. ती काहीच न बोलता नेहमीप्रमाणे वडिलांबरोबर शेतात काम करण्यास जाते, त्याआधी ती घरात असलेल्या तिच्या आजारी आईला हवं ते सर्व बघते. शेतकरी त्याच्या मुलीस गळ घालतो की 'निदान तो सोहळा पाहण्यास आपण शेतातील काम संपले की जाऊया.' शेतकऱ्याच्या मुलीला वडिलांचे मन मोडणे बरोबर वाटत नाही म्हणून ती त्याला होकार देते. सर्व शेतातील काम आटोपून ते दोघे दरबारातील सोहळा पाहण्यास जातात.
                दरबारात सर्व राजकन्या आसनावर विराजमान झालेल्या असतात . राजपुत्र प्रत्येकी जवळ जाऊन तिचे हात आणि राजकन्येस पाहू लागतो पण त्याला त्याच्या मनासारखी कोणी आवडत नाही. सर्व राजकन्या आतुरतेने वाट बघत असतात की राजपुत्राने
आपली निवड करावी पण तसे काही होत नाही. शेवटी तिथे एका बाजूला तो शेतकरी आणि त्याची मुलगी जिथे उभी असते तिकडे राजपुत्र येतो आणि त्या मुलीस न्याहाळू लागतो. अतिशय साधी, रंगाने सावळी जरी ती होती तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज चमकताना
राजपुत्रास जाणवते. तो त्या मुलीस तिचे हात पुढे करण्यास सांगतो तेव्हा ती मुलगी तिचे दोन्ही हात पुढे करते. उन्हाने तिचे दोन्ही हात रापलेले असतात. तळहातावर त्याला काही घट्टेही त्यास दिसतात. तिने ना कसले दागिने घातले असतात ना चांगली वस्त्र परिधान केलेली असतात. राजपुत्र तिच्या हाताला असे काय झाले? हे शेतकऱ्यास विचारतो तेव्हा शेतकरी त्याला सांगतो की माझी मुलगी मला मदत करण्यास रोज शेतात येते तेही तिच्या आजारी आईची सर्व देखभाल करून.
यावर राजपुत्र मनात काहीतरी विचार करतो आणि राजास सांगतो की, ही मुलगी मला पसंद आहे.
हीच खऱ्या अर्थाने खूप सुंदर आहे. राजाला राजपुत्राचे म्हणणे मान्य करावे लागते. तो त्या शेतकऱ्याच्या मुलीचा आणि राजपुत्राचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून देतो. 
सगळ्या राज्यात आनंदाचे वातावरण पसरते. अशा तऱ्हेने खरे सौंदर्य कशात आहे, हे त्या राजपुत्राला समजलेले असते.
              आपल्यालाही खरा अलंकार कोणता आहे हे समजले पाहिजे नाही का !

सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 22 April 2022

आतुरता

मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :

आतुरता : 
                 डोळ्यांत या आस तुझी
                  दाटूनी येई आसवांचा पूर
                 उठे हृदयी माझ्या काहूर 
                भेटीस तुझ्या झाले मी आतुर....
एका प्रेयसीचे मनातील गुज आहे, जीला तिच्या सख्याच्या भेटीची ओढ लागलेली आहे, ती आठवणीने त्याच्या व्याकूळ झालेली आहे. अशी आतुरता प्रत्येकालाच कशा ना कशाची लागलेली असते. एखादी गोष्ट मनापासून मिळावी, अशी उत्कंठा माणसाला नेहमीच असते. त्यासाठी तो त्याच्या मनाची हवी ती तयारी करतो कारण ती आतुरता त्याला शांत बसू देत नाही.
             माणूस कशासाठी आतुर होईल, ह्याचा काही नेम नाही. कधी कोणाला भेटण्याची आतुरता असते, विद्यार्थ्यांस परीक्षेचा निकाल जाणून घेण्याची, नववधूला तिच्या मिलनाची ओढ लागलेली असते. एखाद्या मातेस तिच्या आई होण्याची आतुरता लागलेली असते. तर 
कोणाला गावी जाण्याची, कोणास सैन्यात भरती होण्याची, बळीराजाला दमदार पावसाची ओढ लागलेली असते, तसेच जे परंपरेनं चालत आलेले सण आहेत, त्याचीही आतुरता माणसांना खूप असते. एकंदरच माणसाचा स्थायी स्वभाव आहे तो, कशाचीही ओढ त्यास लागू शकते. 
                एवढेच काय पण ह्या चराचरातील सारेच कशा न कशाने व्याकूळ होत असतात. ग्रीष्माने तप्त झालेली वसुंधरा पावसाच्या एका थेंबासाठी आतुर झालेली असते. जेव्हा पावसाच्या सरी बरसू लागतात तेव्हा ती वसुंधरा तृप्त होते आणि त्याचे जणू  प्रत्युत्तर म्हणून सारी सृष्टी  हिरवा साज चढवते, नद्या नाले दुथडी भरून वाहू लागतात. नवचैतन्याने सृष्टी खुलून जाते. ही सारी कमाल आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्या पावसाच्या आगमनाने झालेली असते. कोकीळ, चातकही पावसाची आतुरतेने वाट पाहत, सूर आळवत बसलेला असतो. पावसास येण्यासाठी साद घालत असतो. 
            आतुर होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती मनातील उत्कंठा माणसाच्या भावना जागृत ठेवते आणि आपल्याला हवे ते मिळवण्याची एक धुंदी माणसाच्या मनावर चढते. प्रेमात व्याकूळ झालेली प्रेयसी,प्रियकराच्या एका कटाक्षासाठी वेडी होते. त्यासाठी ती त्याच्या आवडीनुसार स्वतःस बदलते, आपल्याकडे आकर्षित 
करण्यासाठी सजते, सवरते. हे सर्व त्या एका ओढीने तिच्याकडून ते आपोआप होत असते. 
          मातृत्वाची जेव्हा एखाद्या स्त्रीला चाहूल लागते, तेव्हा तिच्या बरोबरच परिवारातील सारेच त्या छोट्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. त्याच्या स्वागतची जय्यत तयारी सुरू करतात. त्या होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेऊ लागतात, तिचे सर्व लाड पुरवतात. घरातील वातावरण त्यामुळे खेळीमेळीचे होऊन जाते. सर्वांस बाळाची ओढ लागलेली असते. 
           जीवन आहे तिथे ओढ आहे. जिथे ओढ आहे तिथे काळजी, प्रेम आहे. मग ती माणसे असो वा प्राणी-पक्षी किंवा हा निसर्ग. आतुरता ही सगळीकडेच दिसून येते. 
             
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Thursday, 21 April 2022

जाणीव सत्याची

सत्य हेच आहे, 
कोणाला कोणाचे, 
नसते काहीच देणे घेणे
आवडते साऱ्यांनाच इथे
स्वतःचा उदो उदो करणे....

जाणत नाही सत्य ते 
काय सांगावे !
आज आहे जीवन
तर उदया असेल मरण....

मोह मायेच्या जंजाळात 
अडकतो माणूस,
तुझे माझे करता करता
जातो जीव हकनाक,
करत नाही कोणीही साधी विचारपूस ....

धरशील जर सदैव सत्याची कास,
मिळेल माणसा, यश तुजला हमखास
कर दुजांच्याही भावनांची कदर, 
आहे जोवरी श्वासात तुझ्या श्वास ......

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 20 April 2022

नव्याने भेटले मला

आज मी पुन्हा भेटले,
माझ्याच स्वतःच्या अस्तित्वाला
माझ्यातच होते ते लोपलेले,
ठेविले होते मी बंदिस्त त्याला....

साठला होता मनात माझ्या,
न्यूनगंड हा खूप
स्वतःस स्वतःला लेखीत होते,
जणू काहीच नाही माझ्यात अनुरूप.....

वाटे मज नाही मी कशातच हुशार,
साऱ्यांसाठी आहे मी फक्त एक भार
साऱ्या माझ्या मनाच्या कल्पना,
जाणले मी त्यास तेव्हा,
दिला मज ह्यांनी आधार जेव्हा .....

म्हणाले मज हे, " आहे तू साऱ्यांहूनी देखणी,
शोभूनी दिसे हाती तुझ्या लेखणी"
त्यांच्याच प्रेरणेने घेतली हाती लेखणी,
भेटले पुन्हा मला मी नव्याने,
अस्तित्वाला माझ्या गवसली पर्वणी .....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Tuesday, 19 April 2022

भविष्य आपुले..

केली जरी पृष्ठांवर उत्तरे चिन्हांकित
त्यासाठी करावे लागते अध्ययन स्वयंप्रेरीत
अन् असले जरी भविष्य आपुले अधोरेखीत
परी स्वकष्टाने भविष्य घडविणे,
हेच खरे आहे आपुले संचित

का अवलंबून राहावे भविष्यावर ?
असेल जर प्रेम आपुले जीवनावर
तर ठेवावा विश्वास स्वतःवर ,
अन् जगावे स्वबळावर 

करावे कर्म नेकीने, अन् लढावे जिद्दीने
नसावे मिंधे कधीही, जगावे स्वाभिमानाने
हुरळून जाऊ नये यशाने
अन् खचून जाऊ नये अपयशाने

दिले जरी संकेत भविष्याने असावे निडर मनाने
आहे आपुल्याच हातात आपुले भविष्य घडविणे......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 18 April 2022

एकतर्फी प्रेम

मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-
एकतर्फी प्रेम
'प्रेम' ही सुंदर अनुभूती आहे. प्रेमाची व्याख्या शब्दांत मांडणे जितके कठीण, तितके निर्व्याज प्रेम अलीकडे दिसून येत नाही. आजच्या युगात असा कृष्ण, राधा होणे हे अशक्यप्राय गोष्ट. प्रेम म्हणजे स्वतःपेक्षा जिच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीच्या सुखाचा, तिच्या भावनांना विचार नेहमी मनात करणे. न बोलताही त्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट समजून घेणे. तिच्या सुखातच आपले सुख मानून घेणे, हे खरे असते प्रेम.
         आता मूळ विषयावर येते, ' एकतर्फी प्रेम ', जी व्यक्ती करते ती स्वतःचे आयुष्य तर दुःखात लोटते पण त्या बरोबर दुसऱ्या व्यक्तीसही त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रेम कोणावरही होऊ शकते त्यात काही गैर नाही. पण असे प्रेम काय कामाचे जिथे त्या व्यक्तीचे प्रेम समोरील व्यक्तीस मान्य नसेल किंवा ते शक्य नसेल, तिचे प्रेम नसेल किंवा ती व्यक्ती आधीच तिच्या आयुष्यात सुखी असेल. मग असे एकतर्फी प्रेम करण्यात काय साध्य होणार? पण अशा प्रेमात अडकलेला माणूस कसलाही विचार न करता सतत त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीस त्रास देत असेल तर  त्यातून मानसिक त्रास दुसऱ्या व्यक्तीस सहन करावा लागतो. प्रेम करणारी व्यक्ती हे समजून घेत नाही की  स्वतःचे वागणे चुकीचे आहे, ह्यामुळे स्वतः बरोबर दुसऱ्याच्या आयुष्याचेही नुकसान करून घेत आहे. 
           एकतर्फी प्रेमातून कधी कधी अतिशय गंभीर 
घटना घडलेल्या आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर अत्याचार, खून, ॲसिड हल्ला, अशा कितीतरी घटना आजुबाजूस 
घडत असतात. कित्येक मुलींचे आयुष्य त्यात उध्वस्त झालेले आढळून आले आहे. अजूनही परिस्थिती फार वेगळी नाही अशा घटना घडताना लोक फक्त बघ्याची 
भूमिका बजावतात, अशा गोष्टीचे भांडवल करतात. पण जी पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळणे तर दूर पण त्यातून तिच्यावर मग सगळ्यांची नजर रोखली जाते, मग वर्षानुवर्षे खटले चालू राहतात आणि त्या व्यक्तीचे आयुष्य नाहक पणाला लागते. 
        प्रेम आहे तर त्या व्यक्तीस सांगा तिला ते पटवून द्या. जर तिने तुमचे प्रेम स्वीकारले तर चांगलीच गोष्ट आहे. जर तिला मान्य नसेल तर तुमच्या डोक्यातून तिचे विचार बाजूला सारा आणि नव्याने आयुष्य जगा. नाही ना तिचे प्रेम, पण निःस्वार्थ मैत्री तर असू शकते ना. तिच्या मताचा आदर करा. 
         प्रेम नाही म्हणजे आयुष्य संपले का? अहो आयुष्यात प्रेमाशिवाय करण्यासारखे खूप आहे, ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल, लोक तुम्हाला नावाजतील. दुसऱ्यास सुख कसे मिळेल हा विचार जर माणसाने केला तर तो ही आपसूक सुखी होईल.
        एकदा नक्की विचार करून पाहा, एकतर्फी प्रेम करायचे की ती व्यक्ती आपल्या जीवनात हवी असेल तर तिच्याशी निस्वार्थ मैत्री करायची, तिच्या मताचा आदर करायचा. स्वतः आनंदात राहायचे आणि दुसऱ्यासही आनंदात राहू द्यायचे.

सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 15 April 2022

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

मनातील डायरीचे पान🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :-

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

'प्रवृत्ती' म्हणजे स्वभाव, माणसाच्या वागण्याच्या तऱ्हा. जन्मास येणारा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचे काही ना काही वेगळेपण, वैशिष्ट्य असते. त्याच्या त्या स्वभावाने तर त्याच्या व्यक्तिमत्वाची चांगली किंवा वाईट छाप पडत असते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादी घटना घडलेली पाहून तिथे असणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या घटने संदर्भात निरनिराळे तर्क वितर्क लावते. एखादा त्या घटनेविषयी हळहळ व्यक्त करील, तर एखादा त्याकडे दुर्लक्ष करील, तर एखादा त्या घटनेची खोलात जाऊन चौकशी करील, तर एखादा ती घटना पाहून घाबरून जाईल. असे माणसाचे स्वभाव असतात, वागण्याच्या तऱ्हा ह्या
तो त्याच्या सोयीनुसार बदलत असतो, जरी मूळ स्वभाव कसाही असला तरी.
                एखादी व्यक्ती ही अतिशय बडबडी असते, तर एखादी एकदम अबोल,भिडस्त स्वभावाची असते. एखादा चटकन राग व्यक्त करतो तर एखादा माणूस तो मनातच ठेवतो.काहींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो तर काही व्यक्ती ह्या सतत नकारात्मकच विचार करत राहतात. काही व्यक्तींना बिनधास्त आयुष्य जगणे पसंद असते, तर काही व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरत असते. अशी एकंदर भिन्न स्वभावाची माणसे आपल्या अवतभोवती सतत असतात. त्यांच्याशी आपल्याला
जुळवून घेता आले पाहिजे. भिन्न स्वभाव असेल तर आपसांत खटके उडू शकतात पण जर नाते टिकवायचे असेल तर स्वतःच्या अहंभावास बाजूला सारून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले, त्याच्या विचारांना समजून घेतले तर नाते टिकू शकते.
         माणसाचा स्थायी स्वभाव हा कधी बदलत नाही परंतु  त्याच्या व्यक्तिमत्त्वात प्रयत्न केले तर नक्कीच बदल घडू शकतात. एखाद्या व्यक्तीस लहानपणापासून जर चोरी करायची सवय असेल पण त्याने मनाचा निग्रह केला, चांगले विचार जर सतत त्याच्या मनावर बिंबवले गेले तर त्या माणसाची सवय ही नक्कीच जाऊ शकते.
         कधी कधी माणसे मुखवटे धारण करून जगात वावरत असतात. त्या मुखवट्यामागील खरा चेहरा ओळखायचा असेल तर त्या माणसाशी आपणास जमवून घेतले पाहिजे, त्याच्या अंतरंगात डोकावता आले पाहिजे. तर खरा माणूस काय आहे ते आपणास समजून जाईल.
           माणसाचा स्वभाव हा काहीवेळेस तात्काळ समजून जातो तर कधी कधी माणसाच्या स्वभावाचा थांगही लागत नाही कारण माणूस हा त्याचे वागणे हे परिस्थितीनुरूप बदलत असतो. हे जरी खरे असले तरी मूळ स्वभाव हा मात्र तसाच खोलवर रुजलेला असतो.
                              'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
                              माणसाच्या स्थायी किती
                             जुळवूनी घेतले जर परस्परांशी
                               चिरंतन राहतील ती नाती' .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

           
                            


Tuesday, 12 April 2022

गझल :-१८

आनंद कंद वृत्त , मात्रा : २४

खोटीच आसवे ती, डोळ्यांत आज आहे
लोभास भाळुनी का विकलीस लाज आहे ....

न्याराच डौल त्याचा, लोकांस दावताना 
धुंदीत चेवलेला मदमस्त माज आहे ....

आगीत तेल ओती, कपटीच जात त्याची 
अंगात माणसाच्या भिणलीच खाज आहे ....

वाणीत गोडवा तो, पेराल साखरेचा 
बेरंग जीवनाचा रे तोच साज आहे ....

हरवून काय जातो, इतक्यात तूच वेड्या
हासून दावलेल्या दुःखात राज आहे ....

सौ. राजश्री सुहास जाधव.

ती कळी...

 


मोजताना फुले बागेतली

एक कळी खुदकन हसली

देखुनी त्या कळीस,
मनात अलवार भावना जागली

मोहक तिचे रूप ,
साठवले मी डोळ्यांत
केव्हा खुलेल कळी ती फुलात ?
उमटले सहज भाव ते अंतरंगात ....

दडली होती जरी ती पानाआड 
न होऊ दिले तिस मी नजरेआड
आला हळुवार एक कवडसा किरणाचा
स्पर्शून त्या कळीस, केले प्रेम जीवापाड
अन् झाले कळीचे फूल क्षणात
पाहुनी त्या आविष्कारासी,
भिणला आनंद रोमारोमात ....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 11 April 2022

सोबती

प्रेम असो वा मैत्री 
असावी तिथे खात्री 
जीवनाच्या  वाटेवरी, 
असावा सोबती
जो निभावेल खरी मैत्री ....

खऱ्या मैत्रीत नसावा दुस्वास 
ठेवावा परस्परांवरी विश्वास 
प्रेम वा मैत्रीचा हा सहवास
जोडुनी ठेवितो हृदयास ....

कितीही घ्या प्रेमाच्या आणाभाका !
कितीही व्हा मैत्रीत व्यक्त !
नसेल जर त्यात आत्मीयता,
कदापि ठरत नाही, नाते ते सशक्त ....

असते गरज साऱ्यांनाच सोबतीची
जी काढते भरून उणीव आयुष्याची 
सहवासात तिच्या नसते जाणीव दुःखाची 
असते गरज फक्त एकमेकांस समजून घेण्याची ...

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.

Saturday, 9 April 2022

बापाच्या मनाची व्यथा..

मनातील डायरीचे पान 🌿🌿:- अंतर्गत विषय:-

बापाच्या मनाची व्यथा :-
        
            आई म्हटले की एक वात्सल्य मूर्ती समोर येते कारण घराला घरपण तिच्यामुळे येते आणि वडील म्हटले की एक शिस्तप्रिय, कठोर व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते. जणू आपण ते गृहितच धरलेले असते. पण एका बापालाही तितकेच हळवे मन असू शकते जितके एखाद्या स्त्रीचे असते. पुरुषांनी रडलेले हे मात्र फारसे कुणाला रुचत नाही. जर त्याच्याकडून तसे झाले तर त्याला नावं ठेवली जातात. का, त्याला रडण्याचा हक्क नाही का ? कितीही आघात झाले तरी त्याने ते आतल्या आत सहन करणे योग्य आहे का ? साऱ्यांना खंबीरपणे साथ देणे
एवढेच त्याचे कर्तव्य आहे का ? त्यालाही त्याच्या आवडी निवडी प्रमाणे हवे ते घेण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा अवधी नको का? हे प्रश्न खरोखर एकदा जाणून
घेतले तर पुरुषांच्या मनाची व्यथा सहज लक्षात येईल.
              
           एक स्त्री घरासाठी जितकी राबते, तितकेच एक पुरुष बाहेरील सर्व जबाबदारी नेटाने पेलतो. आयुष्यभर घरासाठी झटत असतो. बाहेर जाऊन, पडेल ते काम करून, प्रसंगी वरिष्ठांकडून होणारा अपमान सहन करून तो पैसे मिळवतो आणि घरातील सर्वांच्या गरजा भागवत असतो. तो कमावून आणून देतो म्हणून घरातील स्त्री सगळ्यांसाठी खाण्यास बनवू शकते. त्याला होणारा त्रास तो कधी दाखवत नाही .खरे तर जास्त मानसिक त्रास हा
पुरुषच सहन करत असतो. स्त्री रडून, दुसऱ्याशी बोलून स्वतःचे दुःख हलके करते पण पुरुष मात्र रात्री झोपताना छताकडे पाहून, कधी शून्यात नजर लावून बसलेला बऱ्याच जणांनी पाहिले असेल. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्याची घडी कशी नीट बसेल, महिना संपत आला की, खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न, हे सारे प्रश्न उभे ठाकलेले असतात. तो कधी ते बोलून दाखवत नाही.
              
                    एक वडील म्हणून ते मुलांना चांगल्या शाळेत घालतात भले त्यांची ऐपत नसेल तरीही आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेतले पाहिजे याकरिता ते कर्ज काढून, मोठ्या कष्टाने मुलांना शिकण्यास प्रोत्साहन देत असतात. त्यांना हवे ते खाणे, पिणे, कपडालत्ता, सर्वांच्या सुखाचा एक वडील आधी विचार करतात. बायको, मुलांसाठी हवं ते खरेदी करतील पण स्वतः मात्र कधी काही घेत नाही. मुलांना महागडे मोबाईल खरेदी करून देतील, त्यांना हवे तेव्हा पैसे देतील , स्वतः मात्र काटकसर करून जगतील. बहुतेक असेच चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. आपण मदर्स डे जितका दणक्यात साजरा करतो तितका फादर्स डे साजरा करत नाही. हेही तितकेच खरे आहे. आईच्या वात्सल्याचे नेहमीच कौतुक होत असते पण वडीलही आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमाविषयी मात्र एवढे एवढे बोलले जात नाही. वडील हे कायम दुर्लक्षित राहतात. 
                
                  मोठ्या मोठ्या संकटांना धीराने पेलणारा, दीपस्तंभासम असतो एक बाप. त्याच्या मनाची व्यथा जर समजून घेतली तर आणखी दहा हत्तीचे बळ त्याच्यात संचारेल व कोणतेही संकट तो  सहज पार करील.
               
                   मी माझ्या वडिलांवर एक कविता लिहिली आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यांच्या प्रेमाला कसलीच तोड नाही.
                         
       
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
लावला जीव अपार आम्हां लेकरांवरी 
पाहत आले मी बालपणापासुनी
सांभाळले आम्हांस तळ हाताच्या फोडापरी.....

नसे कसलेच व्यसन अन् सवयी
असे त्यांची साधी अन् सरळ राहणी
आहेत ते प्रेमळ अन् सुंदर विचारांचे धनी
हीच दिली आम्हा मुलांना शिकवणी.....

येता अनंत अडचणी,
जाणवू न दिल्या आम्हाला कधी
पेलत राहिले एकटेच आपल्या बाहुवरी
पाहिले साऱ्यांचे सुख आधी .....

सर्वांचे सर्व केले, ज्याला त्याला मार्गी लावले
परिस्थितीशी दोन हात त्यांनीच केले
नाही ठेवली अपेक्षा कोणाकडूनही,
न जगता स्वतःसाठी, आम्हा मुलांसाठी झिजले ......

पोहोचू दिली नाही कधीच आम्हास झळ
होते जणू अंगात त्यांच्या,
दहा हत्तींचे बळ
ओढत राहिले संसाराचा गाडा
सोसूनी अंतरी वेदनेची कळ ....

अजूनही माहेरी गेल्यावरी,
हवे काय, काय नको मज पाहतात सर्वतोपरी
भासू न देती यत्किंचतही उणीव मातेची
जणू घेतलाय जन्म लेकरांसाठीच त्यांनी भूवरी .....

सदैव काळजी असते आम्हा लेकरांची
बसवण्यास घडी प्रपंचाची,
परिश्रमासवे असते जोड त्यांच्या आर्थिक धोरणांची
कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल सावली जणू आभाळाची.....

थकले असती आता जरी
सळसळते चैतन्य असे तरुणापरी
त्यांच्या आचार-विचारांची,
जपली आहे शिदोरी अंतरी.....

साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
सदैव राहिल ऋणी त्यांची मी
करते मी ईश्वरचरणी विनवणी,
लाभो मज हेच पिता जन्मोजन्मी...... 💐💐🙏

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Thursday, 7 April 2022

अंतर्मन (आत्मपरीक्षण)

मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿:- अंतर्गत विषय
अंतर्मन ( आत्मपरीक्षण )
       'पाहिलं जर अंतर्मनात डोकावून,
       खूपकाही जाल सहज उमजून
       प्राप्त करण्यास आत्मसुख,
      ओळखावे स्वतःस आत्मचिंतनातून'....

                  जीवन जगत असताना, माणूस  स्वतःच्या 'मी'पणात इतका गुरफटलेला असतो की तो कधी स्वतःचं आत्मपरीक्षण करतच नाही. खरे तर बाह्यमन आणि अंतर्मन ही मनाचीच रूपे आहेत. आपण जे विचार सतत करत असतो तेच कुठेतरी अंतर्मनात खोलवर रुजतात आणि नंतर ते स्वीकारून बाह्य मनाद्वारे बाहेर पडतात.
जर आपले विचार हे सकारात्मक, विनयशील असतील तर जीवनात आपल्याला ऊर्जा, यश हे हमखास मिळते. पण आपण अंतर्मनात सतत नकारात्मक, आत्मघातकी, वाईट विचार करत राहिलो तर मग जीवनात तसेच घडत जाते, अपयश पदरी पडते. जीवन नैराश्याने ग्रासले जाते.
म्हणून स्वतःचे अंतर्मन हे सदैव निकोप ठेवा कारण अंतर्मन हे वाईट, चांगले दोन्हीही स्वीकारत असते, तेव्हा अंतर्मनावर जेवढे चांगले विचार बिंबवता येतील तितके बिंबवा.
           माणूस दुसऱ्यांचे दोष काढण्यात कायम तत्पर असतो. 'हम करे सो कायदा' अशीच त्याची वृत्ती असते. त्याला स्वतःचेच म्हणणे खरे करायचे असते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून, समजून घेण्याची त्याची वृत्तीच नसते. कधी
कधी समोरच्या व्यक्तीचेही बरोबर असू शकते. ही गोष्ट कधी आपल्या लक्षातच येत नाही. दुसऱ्यांच्या मतासही तितकेच महत्त्व द्या जितकं तुमच्या मतास इतरांनी
द्यावे, असे आपणास वाटत असते.
          स्वतःच स्वतःला आधी ओळखण्यास शिकले पाहिजे. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असू शकत नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्यास शिका. स्वतःमधील
राग, मत्सर हे दूर सारून जर आत्मचिंतन केले तर मनास एक वेगळेच समाधान प्राप्त होऊ शकते.  कारण जर आपण आपल्या आत डोकावून पाहिले तर तिथे सर्वात
जास्त दुसऱ्या विषयी असूया, तिरस्कारच आपल्याला आढळून येईल. ही मनात साठलेली जळमटे फेकून देऊन मन हे सद्विचाराने भरले पाहिजे. आत्मपरीक्षणाणे माणूस स्वतःची चूक मान्य करू शकतो, दुसरे जर चुकले असतील तर त्यांस मोठ्या मनाने माफ करू शकतो.
आणि ह्यामुळे परस्परांची नातीही दृढ होण्यासाठी मदत होते. नात्यात कोणताही दुरावा निर्माण होऊ शकत नाही.
              आत्मपरीक्षण करण्याने माणसाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते. स्वतःतील गुण, दोष सहज लक्षात येतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासास आत्मपरीक्षण हे मोलाचे काम करते. स्वतःस कशाची आवड आहे, कोणती गोष्ट आपण सहज करू शकतो, हे जर ओळखता आले तर जीवनात माणसाला यश हे नक्कीच मिळू शकते. करिअर घडविण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण हे करताच आले पाहिजे. इतर सांगतात म्हणून आपण त्याच वाटेने जाणे हे  कितपत योग्य आहे? त्यापेक्षा स्वतःतील गुण शोधा, कोणते काम तुम्ही जास्त आवडीने आणि योग्य रित्या करू शकता, कोणत्या गोष्टीत आपली रुची आहे , हे जर माणसाने जाणले तर त्यास यश हे हमखास मिळणार, यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे दुसऱ्यास काय वाटेल ? याची चिंता करत बसू नका, तुमचे मन काय सांगते , त्याचा आधी विचार करा. कधी कधी नाही म्हणण्यास शिका कारण लोक गैरफायदा घेण्यास टपूनच बसलेले असतात.
              माझ्या बुद्धीला जे उमगले ते विचार इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास
क्षमस्व.🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

















           

     


Monday, 4 April 2022

रहस्यमय जीवन

माणसाचे मन म्हणजे रहस्यमय जीवन
किती अन् काय काय दडले आहे त्यात!
नेहमीच प्रश्न पडतो मज गहन, 
जाता उलगडण्यास ते गुंतून जाई आपणच त्यात ....

रहस्य असतात मनातील खूपच गूढ अन् अनाकलनीय
अंदाज बांधणे  ठरते नेहमीच अविश्वसनीय, 
खूप काही विचित्र अन् तितकेच अद्भुत 
लागत नाही ठाव कदापि त्याचा असतात ती अतुलनीय ...

रहस्यमयी मनावर असते घातलेले गारुढ विचारांचे,
कधी असतात विचार ते मवाळ तर कधी प्रखर, 
तर कधी असतात ते सोज्वळ तर कधी घातकी, 
लागत नाही कधीच थागं त्याचा, 
दडलेली असतात रहस्य ती खोलवर ....

घ्यावयाचे असेल जर रहस्य दुसऱ्याचे जाणून,
तर करावा लागेल विश्वास संपादन
देऊनी त्यास दुजोरा, करावे लागेल समर्थन 
जिंकले जर प्रेमाने तरच रहस्याचे होईल निवारण .....

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 1 April 2022

गझल:- २०

गझल ,वृत्त :- आनंदकंद

डोळ्यांत आज त्याच्या अंगार फार आता 
हृदयात भावनांचा भलताच भार आता ....

प्रेमास तो भुकेला व्याकूळ रे किती हा 
सोडून संयमाला केलेस पार आता ....

क्रोधात जाळतोया जीवास तू सदा रे 
जाणीव यातनांची केलीस गार आता ....

भाषेत गोडवा तो नाहीच रे कधीही 
बोलून ते विखारी करतोस वार आता ....

विसरू नकोस वेड्या माणूसकी जरा ही
घे ना तुझ्या मनाशी जोडून तार आता ....

सोसून  डंख सारे  लढशील तू नव्याने 
गवसेल जीवनाचे  परतून सार आता .....

येतील पाखरे ती फांदीवरी बसाया 
लावू नको कधीही हृदयास दार आता ....


सौ. राजश्री सुहास जाधव.

ध्येयासक्त..

आता कुठे उमजत आहे 
मळभ मनातील सरत आहे 
काळोखास भेदून 
आशेचा किरण डोकावत आहे
नवपालवी मनास या फुटत आहे
संस्काराचे बीज मनी रुजत आहे 
ध्येयासक्त होऊन मी ,
उमेद मनात जागवत आहे 
खूप काही करायचे आहे 
हे मनावर माझ्या बिंबवित आहे 
त्याच दिशेने पाऊल माझे पडत आहे 
जणू  आभाळच  सारे कवेत माझ्या ! 
हीच जाणीव मनास माझ्या सुखावत आहे 
ध्येयवेडी मी, माझ्या काव्यातून सारे मांडत आहे .....🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 30 March 2022

स्वरामृत



पहाटे पहाटे जर आपण निसर्गाच्या सानिध्यात गेलो तर 
आपल्या कानावर निरनिराळे स्वर पडतात. पक्ष्यांचा 
तो सुंदरसा किलबिलाट, कोकिळेचे मंजुळ स्वर ऐकून
मनाला खूप प्रसन्नता लाभते आणि असे वाटते की ह्या निसर्गाच्या सान्निध्यातच दिवसरात्र राहवे. नीट कान देऊन 
ऐकले की त्या नीरव शांततेत येणारे अगदी कोणतेही आवाज मग ते माणसांचे असो, स्त्रियांच्या बांगड्यांचा किणकिणण्याचा आवाज असो किंवा सकाळी सकाळी चहापानासाठी तयारी करताना होणारा तो कपबश्यांचा आवाज, प्राणी - पक्ष्यांचे विविध आवाज, अगदी निसर्गातील प्रत्येक गोष्टीचे ज्यास अस्तित्व आहे, वर्दळीचे, 
नदीच्या वाहणाऱ्या प्रवाहाचे, सकाळी सकाळी भक्तीत लीन होऊन गाणाऱ्या भक्ताचा स्वर हे प्रातःकाळी कानावर पडले की ते ऐकण्यास मधुरच वाटतात. फक्त त्यासाठी तशी दृष्टी असावी लागते आणि कान , डोळे हे 
सजग असले पाहिजे. हे सारे स्वर हे अमृतासमान गोड भासतात.  
         त्याप्रमाणेच जे थोर संत होऊन गेले त्यांची संतवाणीही,अभंगवाणी  अमृताहूनही अवीट आहे. कितीदा ती ऐकली तरी मन भरत नाही. त्यातून जीवनाचे 
सार आपल्याला प्राप्त होते. पाप आणि पुण्यातील फरक 
लक्षात येतो.  आत्मचिंतन , परोपकार , निखळ आनंद, सेवाभाव, सहिष्णूता , आत्म्सुख नेमके कशात आहे , या 
साऱ्या गोष्टी आपल्याला त्यांच्या वाणीतूनच आपल्यापर्यंत 
सहज पोचतात. तो स्वर जाणण्यासाठी तसे हृदय माणसाने तयार करणे गरजेचे आहे .
       स्वर मग तो कोणताही असो जो मनापासून उच्चारला तर तो गोड होऊन जातो. जसे की नुकत्याच जन्म घेतलेल्या बाळाचा रडका स्वरही मातेस  अमृतासमान गोड वाटतो. 

सौ.  राजश्री सुहास जाधव.


        

    

Tuesday, 29 March 2022

एक अविश्वसनीय सत्य

मनातील डायरीचे पान 🌿🌿: पुरुषांचे वर्चस्व आणि स्त्री

कितीही होऊ दे समाजात परिवर्तन,
तरीही खरेच मिळते का स्त्रीस समर्थन?
शिकून सवरून होऊ दे कितीही मोठी,
थोपवले जाते जबाबदारीचे ओझे तिच्याच पाठी.....

वर्चस्व असते कायम पुरुषांचेच समाजात,
असाच तर पडलाय खरा प्रघात
स्त्रीला दिले जाते नावापुरते वरचे स्थान,
केले जातात वारंवार तिच्यावरी आघात.....

नाही म्हणत सगळेच पुरुष असतात तसे,
पण तरीही स्त्री समाजात दुय्यमच असे
महत्वाचे निर्णय घेणे, हे जणू पुरुषांचे काम
स्त्रीच्या पाचवीला  मात्र पुजलेले असते घरकाम.....

कोणी ठेवा अगर नका ठेऊ विश्वास,
हेच खरे आहे अविश्वसनीय सत्य
दिले असले समाजाने स्त्रीस हक्क,
तरीही पुरुषाच्याच हाती असते घराचे सारथ्य .....

✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨✨

सौ. राजश्री सुहास जाधव.

Monday, 28 March 2022

मी पणा

अविश्वसनीय सत्य हेच आहे,
स्वतःवरील प्रेमात नेहमीच
असतो माणूस मग्न,
देतो तो आधी स्वतःस प्राधान्य,
स्वतःपुढे इतर, त्याच्या तुलनेत नगण्य.....

माझे, मला ,मी , माझ्याकरिता,
ह्यातच गुरफटलेला असतो माणूस
स्वतःचाच अहंभाव मिरवताना
घेत नाही जाणून, कोणाच्याच भावनांचा मागमूस ....

करतही नाही स्वीकार तो सत्य,
असले कितीही जरी त्यात तथ्य
यावे मीपणातून बाहेर आपण,
अन् जगावे दुजांकरिताही
वाटत नाही मनास त्याच्या,
कितीही बजावले जरी त्यास नित्य.....

घेत नाही ध्यानात कधीच,
मृत्यू हेच सत्य अंतिम
देऊ पाहतो हुलकावणी त्यास,
झटत असतो जगण्याकरिताच रात्रंदिन  .....

💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥💥

सौ. राजश्री सुहास जाधव.

Saturday, 26 March 2022

वेदना त्या....

खोटे ते हसणे,
जणू अवसान ते उसणे
बनविशी मूढ लोकांस
परी अंतरीच्या वेदनांची,
द्यावी कोणास बरी दुषणे? ....

खोट्या त्या  हास्यावरी
भाळती सारे जण,
जाणीव नसे तयांना काही
सदैव असे विषण्ण ते मन ....

विषण्ण त्या मनास
ठेवावे कसे सचेतन ?
लेऊनी मुखवटा हास्याचा
रिझविती लोकांचे मन ....

अंतरीच्या वेदना त्या
शमतील केव्हातरी,
ठेऊनी आस मनी
उमटवते हास्य अधरांवरी ....

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 25 March 2022

तिची घुसमट

मनातील डायरीचे पान  : 🌿🌿

होणार आहे का,
विचारांचा तुमच्या कायापालट ?
आहे एक विधवा म्हणून,
किती व्हावी तिची फरफट ! ....

विधवा होणे हा काही तिचा गुन्हा नाही,
पण समजेल का कधी समाजाला?
बांधले जाते नित्य तिलाच दावणीला
म्हणे, तयार राहा भोग भोगायला .....

तिला ही आहे ना हो मन अन् भावना,
तरी का यावी तिच्याच वाट्यास अवहेलना ?
मनासारखे जगण्याचा तिलाही आहे हक्क
परी हिणवून तिस, करता तिची कुचंबणा....

हसली, बोलली अन् स्वच्छंद जगली की,
ठरते साऱ्यांच्या नजरेत ती वाईट
ओढूनी तिजवर ताशेरे म्हणती सारे,
'आहेस अभागी तू, वाग जरा नीट' ....

एका विधवेची घुसमट उमजेल का कोणास?
मिळणार आहे का कधी सुख तिला उपभोगण्यास?
होणार आहे का परिवर्तन समाजातील लोकांत ?
नको नुसती सहानुभूती, मिळेल का गती तिच्याही जीवनास  .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 23 March 2022

युद्ध हा पर्याय नव्हे...

मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-

युद्ध हा पर्याय नव्हे :-

आज मनाच्या डायरीतून सध्या सर्वत्र चर्चेत असलेला विषय म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध. ज्याचे पडसाद मात्र संपूर्ण जगावर उमटत आहे. जग खरेच तिसऱ्या महायुद्धाच्या दिशेने पाऊल तर टाकत नाही ना ! हा विचार नक्कीच मनाला वेदना देऊन जातो. ह्या देशातील युद्धाची झळ जागतिक पातळीवर सर्वांनाच होऊन महागाईचे चटके सोसावे लागत आहे आणि हे असेच चालू राहिले तर पुढेही सर्व संकटाना सामोरे जावे लागणार आहे. आर्थिक अर्थव्यवस्था, जीवितहानी ह्या सर्व संकटाना ह्या युद्धामुळे देशाबरोबर, सामान्य माणसाला तोंड द्यावे लागणार आहे.
            
             खरेच युद्ध हाच पर्याय आहे का? स्वतःचे वर्चस्व दुसऱ्यावर प्रस्थापित करताना, दोन परस्पविरोधी विरोधी प्रवृत्ती ह्यांच्यातील असलेला संघर्ष, हा कोणत्याही युद्धास कारणीभूत ठरतो. मग ते युद्ध देशा देशातील असो, दोन भिन्न विचाराच्या व्यक्तिंमधील असो, किंवा नात्यातील युद्ध असो, प्रेमातील युद्ध असो, मनातील द्वंद्व असो,
युद्ध हे युद्धच असते. ते कधी रौद्र रूप धारण करते, तर कधी आपापसांत शीतयुद्ध चालू ठेवते. आपण सर्वच कोणत्या ना कोणत्या ह्या युद्धास कधी तरी नक्कीच सामोरे गेलेलो असतो, असे मला वाटते. पण ह्यातून काय साध्य होते, फक्त आणि फक्त त्रास, मानसिक, शारिरीक, आर्थिक, नैतिक ह्यापलीकडे अशा ह्या युद्धातून काहीच साध्य होत नाही. पण स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी हक्कासाठी युद्ध करणे, हे चुकीचे नाही. कारण तो आपला हक्क आहे. फक्त ते करताना आपण आपले धोरण ठरवले पाहिजे, कोणावर अन्याय न करता जे
सामोपचाराने होत असेल तर त्याप्रमाणे केले पाहिजे.आपले विचार तितके प्रगल्भ पाहिजे आणि वेळ पडली तर लढताही आले पाहिजे, असे मला वाटते.
           
            आजकाल तर क्षणाक्षणाला घराघरात, समाजात वावरताना शाब्दिक युद्ध हे चालू असते. नात्यात तर ते नेहमी दिसून येते. टिव्ही सिरियलचा प्रभाव तर घरातून
स्त्रियांवर इतका झालेला असतो की सासू सुनेचे, दीर, जाऊ, नणंदांचे आपापसांत कधी पटत नाही. टिव्ही मध्ये जसे दाखवतात तसे खऱ्या आयुष्यात मग घडू लागते.
प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी करत राहतो, हेवेदावे करतो. अशा ह्या शीत युद्धाचे परिणाम खूपच विपरीत होताना दिसतात. नाती दुरावतात, एकमेकांबद्दल कमालीची असूया वाढीस लागते, कधी कधी तर जीवित हानी देखील होते.  हेच जर सामंजस्याने वागले , ज्याचा मान त्याला दिला, प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेतले, आपापसांत चर्चा करून प्रश्न मार्गी लावले, एकमेकांशी आदराने वागले मग ती व्यक्ती आपल्यापेक्षा छोटी असली तरी, मग अशी युद्ध होण्याचा संभवच निर्माण होणार नाही.
         
             त्यामुळे असे वाटते की युद्ध हा शेवटचा पर्याय नसावा, तुम्हाला काय वाटते ?

सौ. राजश्री सुहास जाधव.

Sunday, 20 March 2022

डोकावलं का हृदयात ...



डोकावलं का कधी हृदयात?
ठेवा वा नका ठेऊ विश्वास,
तो ईश्वरच तर आहे कारण
वाल्याचा वाल्मिकी होण्यास.....

हृदयात प्रत्येकाच्या असे 
त्याचाच तर वास,
कधी होतो प्रकट मातेच्या ममतेतून,
कधी प्रकटतो बाल्यावस्थेतून,
कधी पापी, वैरी होऊनी
दावितो त्याचे रूप जगतास....

आहे हे खरे सत्य,
ह्रदयात तो चिन्मय नित्य
परी गवण्यास तो मानवा,
ठेऊनी इंद्रियांवरी ताबा
लागते करावे हृदय ते शुध्द....

सौ. राजश्री सुहास जाधव.

Tuesday, 15 March 2022

तिचा संघर्ष

 


         

ते एक अतिशय सर्वसाधारण मध्यम वर्गीय कुटुंब होतं. आई, वडील,दोघी बहिणी, दोघे भाऊ आणि आजी असे. अगदी अलीकडच्या काळातीलच गोष्ट आहे ही. घरात कमवणारे तेवढे एकटे वडील कर्ता पुरुष होते. सरकारी नोकरी होती पण पगार तसा जेमतेमच होता.
तरीही ते सर्व कुटुंब सुखा समाधानाने राहत होते. घरातील स्त्री म्हणजे मुलांची आई अत्यंत काटकसरीने संसार करून घर चालवीत होती. त्यामुळे आहे त्यात ते सुखाने राहत होते. वडिलांना सर्व मुले आबा म्हणत होते. आबा अतिशय सरळ, साधे ज्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. रोज सायकलवरून सकाळी ठरलेल्या वेळेत कामात जात असे आणि संध्याकाळी ठरलेल्या वेळेत घरी येत असे.
              मोठा मुलगा  'विनय' हा खूप शिकलेला होता. त्याचे आता लग्नाचे वय झाले होते. मुलगी बघण्याचा कार्यक्रम चालू होता पण लग्न लवकर जमत नव्हते. मनासारखे स्थळ मिळत नव्हते. त्याच्या आईची म्हणजे सुमती काकूंची इच्छा होती की मुलाने त्यांच्या भावाच्या मुलीशी लग्न करावे पण विनयला ते मान्य नव्हते. कारण त्याला नात्यामध्ये लग्न करायचे नव्हते. त्यामुळे सुमती काकूंचाही नाईलाज होता. खूप प्रयत्न केल्यानंतर एकदाचे विनयचे लग्न झाले. एका श्रीमंत व्यावसायिकाच्या मुलीशी, त्यांच्याच नात्यातील व्यक्तीच्या मध्यस्थीने लग्न ठरवले गेले होते. अशा तऱ्हेने घरामध्ये मोठ्या घरची लेक सून म्हणून आली होती. घरात सारेच खूप खूश होते. नवीन सुनेचे खूप कौतुक होत होते. सर्वांनाच तिच्याविषयी खूप अपेक्षा होत्या.
             पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. नवीन सुनेला एकत्र कुटुंब नको होते. एवढ्या माणसांची
तिला सवय नव्हती, कामाची सवय नव्हती. त्यामुळे तिला वेगळा संसार थाटायचा होता. पुढे जाऊन तिने ते खरेही केले. ती घरात कोणाशीच बोलत नसे. तिच्या रूममध्येच सारखी ती झोपून राहायची. घरात मोठी नणंद ' विभा' लग्नाची होती. विभाचेही वय जवळ जवळ २७ चालू होते. मोठ्या भावाच्या लग्नामुळे तिचेही लग्न रखडले होते.
         विभासाठी बरीच स्थळे पाहिली होती. पण प्रत्येक वेळेस काहीतरी अडचण येत होती. एकदा तर ठरलेले लग्न ऐनवेळेस क्षुल्लक वादावरून मोडले होते. कोणाला हुंडा हवा होता तर कोणी मुलगी जास्तच फॅशनेबल आहे म्हणून नाकारले होते, तर कोणी तिचे केस छोटे आहेत हे कारण देऊन नकार दिला होता. यामुळे विभा वैतागली होती. ती सारखी उदास राहू लागली. तिच्या बरोबरच्या सर्व मुलींची लग्न झाली होती. लग्नाची अशी तीच राहिली होती. शिवाय शेजारी - पाजारी, तिच्या मैत्रिणी सारख्या तिला लग्नाविषयी विचारत असे ,त्यामुळे ती मनातून जास्तच खचून गेली होती.
         खरे तर विभा अतिशय हुशार, दिसण्यास सुंदर , धाडसी, सर्वगुणसंपन्न होती. ती सुंदर रांगोळ्या काढायची,
भरतकाम करायची, मेहंदीही सुंदर काढायची. स्वयंपाकही उत्तम येत होता तिला. कोणते काम येत नाही, असे
कधीच नव्हते. आईचे सर्व गुण तिने घेतले होते. छोट्या बहिणीसही ती खूप जीव लावत असे. त्यांच्या कॉलनीत
काही कार्यक्रम असला की विभाचा कायम  पुढाकार असे. तिच्या अंगी नेतृत्व कुशलता होती. कॉलनीत गणपती उत्सवात, मंडळाचे देखावे तयार करण्याचे काम तिच्यावरच असे. तीही अत्यंत आवडीने ते करीत असे. तिची आई व मंडळातील मुले, तिचे दोन्ही भाऊ तिला हवी ती मदत करत असे. विभा सुंदर सुंदर देखावे करून देत असे. वेगवेगळ्या स्पर्धेतही ती नेहमी भाग घेत असे. त्यातही तिचा पहिला नंबर ठरलेला असे. इतर मुली त्यामुळे भाग घेण्यास घाबरत असे. अशीही विभा, बिनधास्त स्वभावाची कॉलनीत , नातेवाईकांत सर्वांची लाडकी होती.
            पण हल्ली ती खूप उदास राहत असे. शिवाय तिची वहिनी तिला कधी भांडण झाल्यावर, लग्न ठरत नसल्याने येता जाता टोमणे मारत असे. या सर्वच गोष्टींमुळे विभा वैतागली होती. एकेदिवशी  विभाने सहन न झाल्याने विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला होता. यामुळे घरातील सर्वजण खूप दुःखी झाले होते. तिच्या आईची अवस्था तर पाहवत नव्हती. पण सुदैवाने वेळेवर उपचार केल्याने विभा त्यातून बचावली होती.
           तिने वडिलांना सांगितले होते की 'आता माझ्यासाठी स्थळ पाहू नका.' पण तरीही  वडिलांनी तिचे नाव वधुवर सूचक मंडळात नोंदवले होते. एकेदिवशी त्यांच्यातर्फे वधूवर मंडळाच्या मेळाव्यात ते विभाला घेऊन गेले होते. तिथे एक मुलगा ' श्रीधर ' तिच्या वडिलांना आवडला. त्यांनी त्याची सविस्तर चौकशी केली. विभालाही तो मुलगा बरा वाटला. दुसऱ्याच दिवशी
त्या मुलाचाही वडिलांना फोन आला की त्यांना विभा पसंद आहे. मग काय सर्वजण खूपच आनंदी झाले होते. वडिलांनी विभाला  विचारले तेव्हा ती म्हणाली , ' बाबा मुलगा चांगला आहे पण तो तंबाखू खात असावा, मी त्याच्या हातावर चुन्याचे डाग पाहिले आहे. मला नाही अशा मुलाबरोबर लग्न करायचे.' तिने असे म्हटल्यावर सर्वजण तिला ओरडू लागले की काय हा तुझा वेडेपणा ! सर्वांनी तिला खूप समजून सांगितले की ' तसे काही नसेल, तू उगाचच काहीतरी विचार करतेस. ' विभाने खूप
विचार करून शेवटी लग्नास  होकार दिला. एका अर्थाने लग्न ठरत असल्याने तिलाही समाधान वाटत होते. घरातील वातावरण पुन्हा आनंदी झाले होते. तिची आई तर मनोमन देवाचे आभार मानत होती.
         श्रीधरचे घर गावी होते, तिथे त्यांची थोडी शेती होती. ती त्याचा भाऊ आणि आई पाहत होते. शिकण्यासाठी म्हणून श्रीधर शहरात हॉस्टेल मध्ये राहत होता. लग्नानंतर तो  भाड्याने फ्लॅट घेऊन राहणार होता असे त्याने विभाच्या वडिलांना सांगितले होते.
          अशा तऱ्हेने विभाचे लग्न श्रीधरशी रिती रिवाजानुसार पार पडले. श्रीधरने पुण्यात भाड्याने फ्लॅट घेतला होता. थोडे दिवस गावी राहिल्यानंतर ते पुण्यात राहण्यास आले. विभाला तर संसाराची खूप हौस होती. तिने तिचे घर खूप सुंदर सजवले होते. नवीनच लग्न झाल्याने ती अधूनमधून छोट्या बहिणीस तिच्या सोबत राहण्यास बोलवून घेत असे. तिने स्वतःचे पार्लरही सुरू केले होते. तिचा त्यात चांगला जमही बसू लागला होता. श्रीधर आधी जागा देणे - घेणे हा व्यवहार करत होता पण नंतर त्याने तेही काम सोडून दिले व पुस्तक प्रकाशनाचे काम तो करू लागला होता. सुरुवातीचे ५-६ महिने विभाचे खूप छान गेले. पण नंतर त्या दोघांत छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले. तिची बहिण तिच्याकडे अधून मधून राहण्यास येत होती. तिलाही ह्या गोष्टी समजल्या होत्या. श्रीधर खरोखरच तंबाखू खात होता. नुसती तंबाखू नाही तर अधून मधून तो दारुही पित असे. विभाला तर व्यसनाची प्रचंड चीड होती आणि तिच्या नशिबी नेमके तेच आले होते.
            हळु हळू त्यांच्यात वारंवार खटके उडायचे. श्रीधर साध्या साध्या गोष्टींवरून तिच्याशी भांडण करत असे. जेवण बनविण्यावरूनही विभाला नको नको ते बोलत असे. तरी विभा ते सारे सहन करत होती. ती त्याकडे दुर्लक्ष करायची. तिच्या पार्लरमध्ये स्वतःचे मन ती रमवत असे.
         काही दिवसांनी तिच्या आयुष्यात अतिशय आनंदाचा दिवस आला. विभाला दिवस गेले होते. ती मनोमन खूप सुखावली होती. तिच्या माहेरी ही बातमी कळल्यानंतर सर्व खूप खूश झाले होते. विभाची ट्रीटमेंट चांगल्या डॉक्टरांकडे सुरू होती. तिला खूप समाधान वाटत होते. पण इकडे श्रीधरचे पिणेही वाढले होते. अशातच एके दिवशी विभास चक्कर आल्याने तिला दवाखान्यात नेले तिथे तिच्या सर्व तपासण्या केल्या तेव्हा त्यातून समजले की विभाला कॅन्सर झाला आहे. ही गोष्ट जेव्हा डॉक्टरांनी तिच्या आईस सांगितली तेव्हा त्या फार खचून गेल्या. पण डॉक्टरांनी सांगितले की विभालाही हे सांगणे महत्त्वाचे आहे. तेव्हा वडिलांनी धीर एकटवून ही गोष्ट विभास सांगितली, तिला आधार दिला. विभाला सारे संपले आहे असेच वाटत होते. ती पुरती हादरून गेली होती. पण तिच्या बाळासाठी तिने तिचे दुःख बाजूला सारायचे ठरवले व काहीच झाले नाही असे दाखवत तिनेच तिच्या आई- वडिलांना धीर दिला.
          पुढे विभाचे बाळंतपणही काही सोपे गेले नाही. दोन दिवस सतत तिला त्रास होत होता.त्यानंतर तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्या बाळाची प्रकृती नाजूक असल्याने त्यालाही तिच्याजवळ न ठेवता डॉक्टरांच्या देखरेखेखाली आठवडाभर ठेवले होते.
              इतर बाळंतीण स्त्रियांसारखे विभाने मात्र जास्त आराम केला नाही. आई, बहिण तिला समजून सांगायच्या पण ती कोणाचे ऐकायची नाही. तिने २ महिन्यांनी पुन्हा तिचे पार्लर सुरू केले. बाळाचे सर्व करून ती पार्लर चालवत होती. श्रीधर दिवसेंदिवस जास्तच दारू प्यायला लागला होता. कामही तो कधी करत असे, कधी करत नसे. घरातील वस्तू विकून त्याचे पैसे घेत असे. पैशांच्या अडचणीपायी त्याने तिचे मंगळसूत्रही विकले होते. पण तरीही विभाने हार मानली नव्हती.
           तिचा आजार बळावला होता पण तिला स्वतःचे घर घ्यायचे स्वप्न पूर्ण करायचे होते. खूप खटपट करून ,सर्व  जवळचे दागिने मोडून , कर्ज काढून अखेरीस त्यांनी तिच्या माहेर जवळच स्वतःचे घर बांधले. तिथे तिने पार्लरमध्ये मुलींचे क्लास घेणे सुरू केले. छोट्या बाळाला आईजवळ ठेऊन ती दिवस रात्र काम करत होती. पार्लर बरोबरच तिने स्वतःचे छोटे हॉटेल सुरू केले. जेणेकरून कर्जाचे हफ्ते फिटतील, नवरा तो व्यवसाय पाहिल. हॉटेलही बऱ्यापैकी चालू होते. महिन्याच्या महिन्याला हफ्ते जात होते. विभा त्याकडे जातीने लक्ष देत होती. विभाचे व श्रीधरचे भांडण मात्र कमी होत नव्हते कारण तो पिणे काही सोडत नव्हता. विभाचा छोटा 'मनीष' आता पाच वर्षांचा झाला होता. तेव्हा तिने मोठ्या थाटामाटाने त्याचा वाढदिवस साजरा केला होता.
           तिचे आजारपण आता वाढले होते. ती वारंवार आजारी पडू लागली. औषधोपचार चालू होते पण त्याचा
काही उपयोग होत नव्हता. आई -वडील जवळ असल्याने ते तिच्याकडे लक्ष देत होते. आता तिला पार्लर कठीण
जात होते. त्यामुळे ते ही बंद झाले होते. नंतर नंतर ती पार अंथरूणाला खिळून होती. तिला तिच्या मुलाचे जास्त
लाडही करता येत नव्हते. आजी आजोबा छोट्या मनीषची खूप काळजी घेत होते. श्रीधरही मनातून घाबरून गेला होता पण कोणाच्याच हातात काही उरले नव्हते.
           जेमतेम नऊ वर्षांचा संसार करून विभा छोट्या सात वर्षांच्या मनीषला सोडून देवाघरी गेली होती. संसाराची स्वप्नं पाहणारी, जिद्दीने जगणाऱ्या विभाचा संघर्ष इथेच संपला होता. एका वर्षाने श्रीधरही हे जग सोडून गेला. खऱ्या अर्थाने मनीष अनाथ झाला होता पण आजी आजोबांनी त्याला उराशी कवटाळले होते.
( सत्य घटनेवर आधारित)

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 11 March 2022

भीती




भीती ही माणसाला कशाचीही वाटू शकते. ती खरे तर 
आपल्या मनातील भावना आहे. एखादी विशिष्ट घटना उदाहरण सांगायचे झाले तर एखादा अपघात पाहिला, किंवा भांडण पाहिले, एखाद्या वस्तू विषयी अशा बऱ्याच 
गोष्टी असतात ज्या आपण अनुभवल्या , पाहिल्या तर 
माणसाच्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. 
आपल्याला काही इजा तर होणार नाही ना अशी धास्ती मनात असते. 
             लहान मुलांशी अगदी मोठ्याने बोलले, रागावले 
तर त्याला समोरील व्यक्तीची भीती वाटते. ते मूल मग त्या व्यक्ती जवळही जात नाही. त्याच्या मनात त्याच्या विषयी
ती भावना अगदी तीव्र होते. 
         शाळेत असताना आपल्याला शिक्षकांची भीती 
वाटते. ती ही दोन प्रकारची असते, एक तर शिक्षक आपल्याला आपण केलेल्या चुकांबद्दल शिक्षा तर करणार नाही ना, किंवा काही शिक्षक हे खूप शिस्तप्रिय असले तरी ते अतिशय मनमिळाऊ असतात तेव्हा आपल्याला 
त्यांच्या विषयी आदरयुक्त भीती वाटत असते.  
                विद्यार्थ्यांना परीक्षेची भीती वाटत असते, 
आसपास घडत असणाऱ्या घटनांमुळे स्त्रीला समाजात 
स्वतंत्रपणे वावरण्याची भीती वाटत असते, नव विवाहितेला तिच्या सासरची माणसे कशी असतील?  तिचा संसार सुरळीत होईल का? अशी भीती सतत वाटत असते.  अशा प्रकारे वेगवेगळ्या भीतीने माणूस ग्रासलेला असतो. 
          पण कधी कधी माणसाला विनाकारणच भीती वाटत असते. कुठल्याही गोष्टीविषयी तो सतत विचार करत राहतो ,त्याचे पर्यवसान भीतीत निर्माण होते. माणूस   अतिविचाराने , मानसिक त्रासाने खचून जातो. तो  नैराश्याने ग्रासतो,  म्हणजेच डिप्रेशन मध्ये जातो. त्यातून 
जर तो बाहेर आला नाही तर त्याचे गंभीर परिणाम त्याला 
त्याच्या जवळील व्यक्तींना भोगावे लागतात. याकरिता त्याला खरे तर समजून घेण्याची, मानसोपचार तज्ज्ञांची 
गरज असते. ती त्याला वेळीच मिळणे खूप आवश्यक 
असते. त्याच्यातील अस्वस्थतेचे ,anxiety चे कारण शोध ले गेले पाहिजे. तेव्हा कुठे या भीतीतून माणूस बाहेर पडू शकतो. 
         एकूण काय भीती जरी वाटली तरी त्यातून बाहेर कसे पडता येईल , त्यासाठी माणसाने प्रयत्न केले पाहिजे. नुसतेच मला भीती वाटते, आता काय करू?  असे म्हणून काहीच उपयोग होत नाही. त्या गोष्टीकडे ही
सकारात्मक रित्या पाहिले तर नक्कीच मार्ग निघू शकतो, 
हे कायम माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. 
     म्हणून भीती घालवायची असेल तर तिला सामोरे जा म्हणजे आपोआप मनातील भीती कमी होईल. 

     सौ. राजश्री सुहास जाधव.

          

अंधार आणि प्रकाश



अंधाराची भीती वाटत नाही मला, 
जितकी माणसांची भीती वाटे मनाला 
अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट असते सुकर, 
पण  कसे घालवावे माणसाच्या मनातील अंधाराला ?....

मिणमिणता दिवा नष्ट करी त्या तमाला, 
हलकासा कवडसाही खूप असतो अंधाराला 
माणसाच्या अंगात भिणलेल्या अंधाराला, 
उच्चाटन्यास लावावे लागतात प्राण पणाला ....

न  धरावी कदापि अंधाराची भीती 
त्याच्यामुळेच तर  जाणती सारे, 
काय असते प्रकाशाची महती ! 
असते ती तर खरी, सुख-दुःखाची युती ....

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 2 March 2022

खेळ मनाचे

माणूस हा  अतिशय आशावादी प्राणी आहे. स्वप्नात रमण्यास त्याला नेहमीच आवडते. त्याला नाविन्याची ओढ असते, गुढते विषयी आकर्षण असते,
कल्पनातीत जे आहे ते त्यास नेहमी हवे हवेसे वाटते.
मग त्याच्या मनाचे तर्क, वितर्क खेळ सुरू होतात.

         माणसाचे मन हे  त्याची मानसिकता कशी आहे
यावर अवलंबून असते. जर माणसाची मानसिकता कायम
नकारात्मक विचार करत असेल तर मनात त्याच्या तसेच खेळ सुरू होतात. उगाचच कशाचीही अनामिक भीती,
एखाद्याविषयी राग, सुडाची भावना , चित्र विचित्र स्वप्नं ,
हे असे सारे खेळ माणसाच्या मनात सुरू होतात आणि सुरू होते असह्य वेदना.
          शरीराला जशी भूक लागते तशी मनाला माणसाच्या, नेहमीच भूक लागते. ती भूक शमविण्यासाठी
तो मग मनात इमले रचू लागतो. त्याला जे साध्य प्रत्यक्षात
होत नाही , ते तो मनाच्या खेळात साध्य करू पाहतो.
तो आकाशास गवसणी घालू लागतो. त्याला कधी मुक्त जगायचे असते, 'कधी सारे सुख पायाशी लोळण घेत आहे', या भ्रमातच त्याला राहायचे असते. कधी मनाच्या
ह्या खेळात तो एखाद्यावर जीवापाड प्रेम करतो एकतर्फी,
तर कधी टोकाचा राग धरतो एखाद्या विषयी, कधी  माणसाचे मन इतके बेभान होते ह्या खेळात तो इतका
रंगून जातो की त्याला कसलेच ,वास्तवाचे भान राहत नाही.

             माणूस एखाद्या विषयी चुकीचे मत करून घेतो आणि तसेच खेळ मनात रचतो. ती व्यक्ती कितीही आकांताने तिची बाजू मांडू लागली तरी त्याला मग ते
काही पटत नाही.
          जीवनात माणसाला सुखी व्हायचे असेल तर आधी त्याने स्वतः आनंदी राहण्यास शिकले पाहिजे.
आजू बाजूचे लोक जरी कसेही वागले तरी त्याचा परिणाम
त्याच्या मनावर होता कामा नये, तेव्हाच माणूस आनंदी
होऊ शकतो. त्याचे मन प्रसन्न आणि विनयशील असेल
तर माणसाचे मन ही तसेच स्वप्नं पाहू लागते. त्याच्या
मनातले खेळही त्यास आनंद देणारे असतात. त्याला कधी
मग फुलपाखरू व्हावे वाटते, कधी आकाशातील तारा, तर कधी झरणारा निर्झर, तर कधी एखादं आवडतं व्यक्तिमत्त्व, माणूस त्याच्या मनाच्या खेळात होऊन जातो.
त्या मनातील विचाराने त्याचे काही नुकसान होणार नसते.
कारण त्याच्या मनास वास्तवाची जाणीव असते. हे मनाचे खेळ तो सहज पाहत असतो.

           मनाच्या ह्या खेळात किती रमावे आणि कुठे
थांबावे ह्याचे भान ज्याने त्याने राखलेच पाहिजे नाहीतर
जीवनाचा मेळ बसणे कठीण होऊन जाईल. त्याकरिता माणसाने कायम  आनंदी, निर्मळ मन ठेवले पाहिजे.

सौ. राजश्री सुहास जाधव.




     
   


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...