Sunday, 22 May 2022

बाग

बाग
आमच्या घरकुल कॉलनीच्या बाहेर थोड्या अंतरावरच एक सुंदर असा बगीचा आहे. सर्व तऱ्हेच्या झाडांनी, फुलांनी बहरलेला. वेगवेगळ्या रंगांची जास्वंद, अबोली, सदाफुली, पेरू, सीताफळ, अशोक...अशी बरीच झाडे बागेत होती. बागेची रखवाली करण्यास तिथेच एका 
खोलीत एक रखवालदार त्याच्या परिवारासह राहत होता. त्यामुळे बागेची योग्य ती काळजी घेतली जात होती. बागेत व्यायामासाठीचे साहित्यही ठेवले होते, त्यामुळे  सकाळ संध्याकाळी बागेत भरपूर लोक हे येत असत. प्रत्येकाचे असे ठराविक टायमिंग ठरलेले होते त्यामुळे जो तो बागेत थोडे फिरून, व्यायाम करून झाले की अर्धातास
बागेत निवांत गप्पा मारण्यात दंग असे.  
          आजही आमच्या कॉलनीतील देशपांडे काकू, सावंत काकू, जोशींच्या रमा आजी, मोरे यांची लेक राखी, गव्हाणेंची नेहा, सुमती काकू , दीपा,  क्षीरसागर आजी, सानिका आणि अर्थात मी अशी वेगवेगळ्या वयाची तरीही एकमेकांची चांगली गट्टी जमलेली.  मंडळी व्यायम आटोपून गप्पा मारण्यात दंग होती. रोज एखादा विषय घेऊन त्यावर चर्चा, सल्लामसलत असे नित्याने होत असे. आजही त्यांच्या अगदी जिव्हाळ्याच्या विषयावर त्यांची चर्चा रंगली होती. विषय होता, ' घरात तुमच्या मताला किती प्राधान्य देतात, ऐकतात.' चर्चेने चांगलाच जोर धरला होता. 
          देशपांडे काकू म्हणाल्या, " आमचे हे आणि माझी मुले एखाद्या विषयावर माझे म्हणणे ऐकून घेतात, मग आम्ही त्यावर चर्चा करतो आणि त्यानंतरच एखादी गोष्ट ठरवतो." सावंत काकू म्हणाल्या, " आता सर्व घरातील कारभार ह्यांच्या पाठीमागे सून आणि मुलगा पाहतो. ते स्वतःहून काही सांगत नाही आणि मीही काही जास्त विचारत नाही. ते जसे ठरवतील तसे." त्यावर सुमती काकू आणि राखी मध्येच बोलू लागल्या, " काकू पण हे चूक आहे, जर महत्वाच्या गोष्टी असतील तर तुमचे मतही घेतलेच पाहिजे ना," त्यावर सावंत काकू म्हणाल्या," अगं, तसे नाही राखी, त्यांनाही जबाबदारीची जाणीव झाली पाहिजे ना, मी किती दिवस आहे त्यांच्या बरोबर. कधी कधी निर्णय चुकतील पण त्यातूनच ते सुधारणा करतील. जर काही चुकले तर मी आहेच की त्यांना सांगायला.
              त्यांचे बोलणे चालू असतानाच रमा आजींनी पिशवीतील काहीतरी आणलेले बाहेर काढले आणि 
त्या सर्वांना म्हणाल्या, " आधी ही कैरीची डाळ खा बरं आज सुनबाईंनी बनवली होती. तीच मला म्हणाली तुमच्या मैत्रिणींना घेऊन जा." मग चर्चा तिथेच थांबवून आम्ही सगळ्यांनी कैरीच्या डाळीचा आस्वाद घेतला.
एव्हाना बाग बंद होण्याची वेळ झाल्याने सर्वांनीच आटोपते घेतले आणि उद्या पुन्हा भेटू, म्हणून निरोप घेतला.
      संध्याकाळी ठरल्या प्रमाणे सर्वजण बागेकडे आले तर बाग बंद आणि तिथे सूचना फलकही लावला होता,
' सदर बाग ही दुसरीकडे होणार आहे, नवीन प्रकल्प येथे सुरू होत असल्याने बागेची जागा  दुसरीकडे असेल, तरीही नागरिकांनी ह्याची नोंद घ्यावी.' ह्या अशा सूचना फलकावर लिहिलेल्या सुचनेने सर्वांनाच नवल वाटले आणि रागही आला. आम्ही साऱ्याजणी आपापसात चर्चा करू लागलो. नंतर रखवालदार दादा आले आणि म्हणाले, " अहो ताई सकाळीच पालिकेतील माणसे, साहेब येऊन गेले , पाहणी करून गेले. इथे कसले तरी ऑफिस होणार आहे. आणि नंतर मग हा फलक लावण्यास मला सांगितला." रखवालदाराचे बोलणे ऐकून नेहा, क्षीरसागर काकूंना तर खूपच राग आला. सर्वांनी समजून सांगितल्यावर त्या शांत झाल्या. आम्ही सर्वजण मग देशपांडेंच्या घरी त्यांच्या टेरेसवर गेलो चर्चा करण्यासाठी. सावंत काकू म्हणाल्या, " हे पाहा बाग ही नागरिकांसाठी  आहे. इतक्या वर्षांपासून सर्वजण ह्या बागते फिरण्यास, व्यायाम करण्यास येत आहोत त्यामुळे सर्वांचेच आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे, ह्या
बागेमुळे. आपल्या कॉलनीची शान आहे ही बाग. वातावरणही चांगले हवेशीर राहते बागेमुळे." सर्वांनी त्यांच्या म्हणण्यास दुजोरा दिला. रमा काकू म्हणाल्या, " आपण कॉलनीतील सर्वांस एकत्र बोलावून मीटिंग घेऊया आणि आपले मुद्दे त्या पालिकेच्या साहेबांसमोर मांडुया. जर त्यांनी नाहीच ऐकले तर आपण सर्व उपोषण करूया."
              झाले, ठरल्याप्रमाणे कॉलनीत एक मीटिंग घेतली. सर्वानुमते त्या पालिकेत जाऊन आधी अर्ज सादर 
केला, सर्वांचे म्हणणे त्या साहेबांना सांगितले. तेव्हा कॉलनीतील बच्चे कंपनीही बरोबर होती. त्यातील छोटा 
यश साहेबांना म्हणाला, " काका , आमची बाग नका तोडू, आम्हाला करमनार नाही." त्याच्या ह्या बोलण्याने 
साहेबांना काय बोलावे समजेना. साहेब म्हणाले," मी प्रयत्न करतो, वरून ऑर्डर आहे पण तुमचे म्हणणे मी 
त्यांना सांगतो. तो पर्यंत तुम्ही थोडे समजदारीने वागा. सूचनेचे पालन करा."
            त्यानंतर आम्हीही सारे पुन्हा माघारी आलो. आठवडाभर सारे कॉलनीतील लोक शांत राहिले कारण
सर्वांना निकाल काय लागतो त्याची काळजी होती. आठवडाभराने रखवालदाराचा मुलगा धावत येऊन साऱ्यांना आनंदाची बातमी देऊन गेला की, ' उद्यापासून बाग पुन्हा उघडेल, आताच आम्हाला कळले.'  हे ऐकून मला तर इतका आनंद झाला की मी लगेच फोन करून कॉलनीतील बऱ्याच लोकांना सांगितले. नंतर सर्वांनाच ही आनंदाची वार्ता समजली. सुमती काकू तर म्हणाल्या की ' मी आजच शनीला जाऊन नारळ फोडून येते' त्यांच्या ह्या बोलण्याने साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️ 

सौ.राजश्री सुहास जाधव.







        
          




         

          

No comments:

Post a Comment

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...