Monday, 2 May 2022

कदर असेल तिथेच व्यक्त व्हा




मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय

आजकाल विश्वास कोणावर ठेवावा, कोणावर ठेऊ नये हे समजत नाही. कोण कधी कसे वागेल ह्याचा नेम नाही. सोशल मीडियाच्या, व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून खूप सारी नवीन नाती आपण जोडतो.  भले प्रत्यक्ष भेट होत नसली तरी आपणास ही नाती हवी हवीशी वाटतात. कधी कधी तर आपण अशा मैत्रीच्या इतके आहारी जातो की त्या व्यक्ती विषयी काहीही माहित नसताना आपण सगळे मनातील त्याच्या जवळ बोलून जातो.पण ती व्यक्ती खरोखर विश्वासास पात्र आहे का? याचा जराही विचार न करता मनातील भावना बोलून जातो अगदी डोळे झाकून. पण जर ती व्यक्ती फक्त आपल्याशी स्वार्थापोटी बोलत असेल तर अशा व्यक्तींकडून आपणास धोकाच
मिळू शकतो. आपल्या भोळेपणाचा गैरफायदा घेऊन अशी व्यक्ती आपल्याला हवा तसा त्रास आपणास देऊ शकते आणि त्यातून नवीन संकट उभे राहू शकते कधी कधी तर गोष्टी अगदी हाताबाहेर जातात आणि नको ते माणूस करून  बसतो, परिणामी नाहक जीव गमवण्याचीही वेळ येऊ शकते.
        यासाठी मैत्री किंवा कोणतेही नाते तयार होत असताना माणसाने डोळे, डोके, मन जागेवर ठेऊन सर्व शहानिशा करूनच अशा नात्यांचा स्वीकार करावा. जिथे आपल्या मतांचा आदर केला जातो, उपेक्षा केली जात नाही, आपल्या भावनांची जिथे कदर असते, आपल्याला बोलण्याचे तिथं स्वातंत्र्य मिळते, काय चूक, काय वाईट हे एकमेकांस समजून सांगितले जाते, अशाच ठिकाणी खरे तर माणसाने व्यक्त झाले पाहिजे. 
          बऱ्याचवेळा असे आपल्या नातेवाईकांत किंवा मित्र परिवारात असे आढळते की मनात एकमेकांविषयी अजिबात आपुलकी नसते फक्त एक औपचारिकता म्हणून ही नाती असतात. तिथे नेहमी आपले अस्तित्व गौण असते. आपल्या म्हणण्यास काही किंमत नसते, कायम दुर्लक्षित राहतो. जरा पाठ फिरलीकी आपली निंदा नालस्ती त्यांच्या कडून होत असते. मग अशा ठिकाणी का राहायचे ? त्यापेक्षा एकटे राहिलेले काय वाईट !
            ज्या लोकांना आपल्या असण्याने आनंद होणार आहे, आपण चुकलो तर हक्काने आपल्याला जी माणसे समजावून सांगतात, आपले म्हणणे शांतपणे ऐकून घेण्याची त्यांची कायम तयारी असते, अशा ठिकाणीच
आपण खरे तर व्यक्त व्हावे , नाते निर्माण करावे. 

सौ. राजश्री सुहास जाधव.

3 comments:

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...