Thursday, 30 September 2021

मायेची माणसं ....



मायेची माणसं एकामागून एक गेली मज सोडूनी
पारखी झाले मी त्यांच्या प्रेमातुनी
लाड माझे पुरविण्या न उरले आता कुणी
साद माझी जाईल का त्यांच्या कानी ?
तीच माता, तीच भगिनी
अन् तोच भ्राता लाभेल का मजला ?
अर्जव करते रे भगवंता तुजला
गेले सोडूनी जरी ते मला
कप्पा आठवणींचा हृदयात
खोल तो साठवला
येताच आठवणी त्यांच्या
कप्पा तो मी उलगडला 
आठवणी त्या देती पाठबळ
माझ्या जगण्याला....

सौ. राजश्री सुहास जाधव.


मन



'काय बरं द्यावं तुला !'
नेहमीच असं वाटतं
द्यावं तुला माझं मन,
मनात राहावं मीच कायम
हेच सांगत राहतं मन ....


सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 29 September 2021

मनातलं माझ्या......



मनातलं माझ्या ओळखत नाही..

दावित असलीस जरी..

मी जाणले आहे...

माझेच नाव कोरले आहे तुझ्या हृदयावरी...

हृदयी तुझ्या मिळवूनी स्थान...

झालो मी बेभान...

मान्य करशील तू ही...

विसरून जाशील भान...

सांगशील गुज मनीचे...

ह्या हृदयीचे, त्या हृदयात...

देशील ग्वाही तुझ्या प्रितीची...

अन् मनातलं माझ्या ओळखल्याची ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


वडा पाव



आज जागतिक वडापाव दिन आहे. मला स्वतःला वडापाव अत्यंत प्रिय आहे. म्हणून ही रचना करण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असेल तर क्षमस्व.🙏

दन खोलुनी
डाव तो साधावा
पावा संगे 
डा तो खावा
वडापाव विना
नाही लज्जत त्या खाण्याला
रंकापासुनी रावा पर्यंत
आवडे तो सर्वांना
वडापाव न आवडे
असा माणूस विरळा
खवय्यांसाठी असे
खाण्याचा तो नित्य सोहळा
अवघ्या विश्वात असे
याचा बोलबाला
खाऊनी वडापाव
तृप्तता लाभे उदराला
मज वाटे वडापाव म्हणजे
पुस्तक आणिक धडा
गणित आणिक पाढा
कात आणिक विडा
वडापाव जणू 
पती-पत्नीच्या नात्यातील गोडवा
पाव म्हणजे पती, जो बनुनी ढाल
करितो साऱ्या परिवाराचे रक्षण
वडा म्हणजे पत्नी, तावून सुलाखून
करते सर्वांच्या इच्छांचे शमन
एकरूप होऊनी परस्परांसवे
सुखी होई जीवन
सोबतीने परस्परांच्या,
सागर किनारी बसुनी
गरमागरम वडापावचा
आस्वाद घ्यावा
मग शीड नसलेल्या नौकेसही
दोघांचा हेवा वाटावा.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 28 September 2021

आर्त साद



सत्ता, संपत्तीच्या हव्यासापायी
मनुष्य रचतो कूटनीति
त्यातुनी नाना समस्या त्या उद्भवती
स्वार्थापोटी  त्यांच्या, निरपराध ते होरपळती
शोषण करूनी त्यांचे, गाजवू पाहतो
साऱ्या सृष्टीवर जणू त्याचाच अधिकार
पण नसे टिकणारे हे चिरकाल
माणसाला करण्यास माणूस
विधात्यालाच बदलावी लागली कूस
मग महामारी, महापूर, महागाई,
भूकंप एकामागुनी एक
संकटाचा घातला तू धुडगूस
पुरती फिटली माणसाची हौस
हे विधात्या, घेऊन जा हे सारे
तुझे उदात्त आणिक दातृत्वाचे
गुण आम्हा सकलांस तू दे रे .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


छत्री



आहे ती एक छत्री
काय सांगू तिची महती !
नाते तिचे अन् आपुले
पुरातन काळापासुनी चालत आले
नानाविध रूप,रंगात ती अवतरते
सुंदर ते रूप साऱ्यांना मोहवते
सानांपासुनी ते थोरांपर्यंत
अन् निर्धनांपासुनी, धनिकांपर्यंत
साऱ्यांच्याच उपयोगी ती पडते
ऊन, पाऊस, वाऱ्यापासुनी
साऱ्यांचे ती रक्षण करते
छत्रीचे ते आवरण,
मज वाटे जणू
कुटुंब प्रमुख यजमान
ठेविती सर्वांस एकसंध जोडून
तार एक जरी निखळता,
समतोल जाई छत्रीचा बिघडून
त्यासम कुटुंबातील व्यक्तीचे गैरवर्तन
बिघडवून टाकती कुटुंबाचे संतुलन
दांडा छत्रीचा म्हणजे
भरभक्कम पाया कुटुंबाचा
एकसंध जोडणारा
धागा तो विश्वासाचा
टोक छत्रीचे भासे मज
शिखर ते सहनशीलतेचे
संकटे अमाप झेलुनी
शाबूत राहते ती नेटाने
रया जाता छत्रीची
दाविली जाते मग
वाट तिला अडगळीची
त्यासम येता वृद्धत्व
वागणूक मिळे उपेक्षेची
सारखीच होई अवस्था ती
छत्रीची अन् माणसाची ...

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 27 September 2021

अपराध



कोणासही दुखवणे, आवडत नाही मला
झाले असेल अनावधानाने,
तर कराल का माफ मला?
नाहीतर कायम अपराधी वाटते मनाला
अन् छळते ती भावना या माझ्या जीवाला
असते मी माझ्या लेखणीत रमलेली
नसते जगाची भ्रांत मला उरलेली
नात्यांपरी आवडे मज दुनिया ही न्यारी
अनोख्या भाव विश्वात मज घेऊनी जाणारी
नसे मग कसलीच तिथे दुनियादारी
अश्या विश्वात रमणारी मी,
सांगा मजला, काय हा गुन्हा केलाय मी !
आरोप प्रत्यारोपापेक्षा ह्या दुनियेतच
राहणे पसंद करते मी ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


शब्द गंध



शब्दांना असती गंध 🌹🌹
जे लाविती प्रीतिचे छंद
शब्दातुनी झळके गंध ते अपरिमित
शब्द भासती ते परिचित वा अपरिचित
शब्दांनी शब्द जोडता प्राप्त होई वाक्यास त्या अर्थ
अंतरीचे भेद जाणण्या शब्दांत असती सामर्थ्य
मृदू शब्दांना असे मायेचा गंध
परखड शब्दांतुनी व्यक्त होई उग्र तो दर्प
प्रेमळ, लडिवाळ शब्दांनी
भरली जाई कुपी अत्तराची
शब्दांना धार असती शस्त्राची
शब्द हसवती, शब्द रडवती,
शब्द घडवती अन् शब्द बिघडवती
काळजास थेट भिडती शब्द
असे शब्दांची सारी किमया
जणू वाटे मज अत्तराचा फाया 🌺🌺🌺

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 26 September 2021

माझ्या माघारी....



किती हे विचार मनात येतात, जातात
अन् जीवाला त्या भंडावून सोडतात
माझ्या माघारी राहतील का,
माझे सारे सुखी,या जीवनात ?
राहिल का मी कायम
त्यांच्या स्मरणात ?
अलिप्त राहून मग
येईल सारं माझ्या लक्षात.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


अलिप्त



कधी कधी विचारांचं माझ्या माजतं काहूर
मग उगाचच वाटे , अनामिक ती हुरहूर
राहू शकेल का मी आपल्यांपासुनी दूर ?
दाटेल का त्यांच्या हृदयी आठवांचे पूर ?
माझ्याविना वाटेल का तयांना, जीवन क्षणभंगुर?
त्याकरिता पाहते मी अलिप्त राहून,
मग जाईल मला सारे उमजून......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 25 September 2021

काय कमावलं....



जगी सर्व सुखी असा कोण आहे||
विचारी मना तूच शोधूनी पाहे ||
समर्थ रामदास स्वामींनी किती समर्पक ओळी रचल्या आहेत ना ! आपणच आपल्या मनाचा ठाव घेतला पाहिजे. जगात सर्वार्थाने सुखी मनुष्य खरेच कोणी असेल का ?
         खरे सुख हे मानण्यात असते. आयुष्याच्या एका वळणावर आल्यानंतर आपल्याला कधी कधी वाटून जाते की, या जगात येऊन आपण काय कमावलं? 'नाव, पैसा, प्रसिध्दी, आणखी काय ! याचं उत्तर आपलं आपल्यालाच मिळून जाईल.
         काय कमावलं अन् काय गमावलं हे मागे वळून बघण्यात काहीच उपयोग नसतो. कारण माणूस स्वतःच्या सुखासाठीच झटत असतो. जास्तीजास्त संपत्ती आपणास कशी प्राप्त होईल, स्वतःचं वर्चस्व कसं प्रस्थापित होईल यासाठी माणूस सतत धडपडत असतो. या  सर्व खटाटोपात माणूस स्वच्छंद जगणं विसरून जातो, नाती, मैत्री, सहृदयता, माणुसकी या साऱ्यांना दुर्लक्षित करतो. स्वतःचा फायदा करून घेताना दुसऱ्यांची मने दुखावली तरी त्याला काही फरक पडत नाही.
           बक्कळ पैसा कमवूनही माणूस समाधानी राहू शकत नाही. सुखाची झोप त्याला मिळत नाही कारण, त्याला आत्मिक समाधान प्राप्त झालेले नसते.  सर्वांच्यांमध्ये राहूनही तो एकटा पडतो. हे माणसाने
स्वतःच्या कृत्यानेच निर्माण केलेले असते.
            म्हणून काय कमावलं, हे न बघता, जे हातून निसटून गेलं आहे ते प्रेम, नात्यांतील जिव्हाळा, दात्तृत्व, परोपकार, ईश्वराप्रती भक्तिभाव माणसाने अंगिकारला
पाहिजे. तेव्हाच खरे सुख प्राप्त होईल.

सौ.राजश्री सुहास जाधव.




        


स्वच्छंद



काय मिळवलं अन् काय गमवलं
नाही गणित मला हे मांडायचं
उणे , अधिकाच्या फंदात
नाही मला पडायचं
एकदा मिळालेलं आयुष्य
आहे मला आनंदाने उपभोगायचं
मग का उगाच जीवास जाळत बसायचं
अन् नाहक दुःखाला कवटाळायचं
त्यापरी बेभान होऊनी जगायचं
विहंगासम स्वच्छंद विहरायचं
अन् मन मानेल तसं जगायचं ......

सौ.राजश्री सुहास जाधव.


चांदणी



एकदा चंद्रावरी रुसली चांदणी
दाटुनी अश्रू ते लोचनी,
म्हणाली," माझ्या परी आहे का कोणी देखणी?"
चंद्र म्हणाला," नको दाटूस अश्रू ते नयनी,
मी चंद्र तू माझी चांदणी,
तुझ्याच रंगात रंगलो मी,
तू नभीची चमचमती चांदणी
रूप तुझे साऱ्यांना भुलविती
अन् कित्येकांसी काव्य ते स्फुरती 
तुझ्याविना असे अपुरा मी
तूच गं माझी साजणी
आहेस तू देखणी 🌠🌠🌠🌠

सौ . राजश्री सुहास जाधव.


काही अडत नाही....



' जन पळभर म्हणतील हाय हाय..
मी जाता राहील कार्य काय?
सूर्य तळपतील, चंद्र झळकतील,
तारे आपुला क्रम आचरतील '
      ह्या भा. रा. तांबेंच्या ओळी किती समर्पक आहेत ना,
आपले कितीही जिवाभावाचे जिवलग असले आणि अचानक नियतीने त्यांना आपल्या पासून हिरावून नेले तरी आपण जगणे काही सोडत नाही. दुःख हे नक्कीच असते. पण काळ जसा पुढे सरकतो तशी त्याची तीव्रता कमी होते. याचा अर्थ आपण त्यांना विसरून जातो, असेही नाही. पण जीवनचक्र हे सुरूच राहते. त्यालाच जर कुरवाळत बसलो तर सर्वच दुःख सागरात बुडून जातील.
          जसे नदीच्या प्रवाहात वाहत येणारे दोन ओंडके काही कालावधीसाठी एकत्र येतात आणि नंतर पुन्हा त्यांच्या त्यांच्या मार्गाने ते प्रवाहीत होतात. तसेच माणसाचे
जीवन असते. आयुष्यात खूप लोक भेटतात, त्यांचे विचार, व्यक्तिमत्त्व आपल्याला आवडते. त्या प्रभावाखाली आपण असतो. त्यांचे चांगले विचार आपण आत्मसात करायचे .जर अशा व्यक्ती कालांतराने आपल्या जीवनातून निघून जरी गेली तरी आपण जगायचे काही सोडत नाही किंबहुना न झुरणे हेच योग्य आहे. त्यांचे चांगले विचार कायम आपल्या स्मरणात राहतील.
        कधी कधी माणसं आपल्या दुःखाचा खूप गाजावाजा करतात,' आता मी कसं
जगायचं, तुझ्याशिवाय जगुच शकत नाही ' वैगरे वैगरे.... पण खरच का आपण गेलेल्यांच्या मागे स्वतःचा जीव देतो का?
        माझ्या स्वतःच्या आयुष्यातील माझ्या जवळच्या ४ व्यक्ती एकामागोमाग एक मला सोडून गेल्या. त्याचे दुःख हे मनात साठवले आहे. पण त्यांच्या जाण्याने मी जगणे काही सोडून दिले नाही. त्यांच्या आठवणीच मला जगण्यासाठी पाठबळ देत असतात.
     म्हणून कुणासाठी झुरत बसण्यापेक्षा जे समोर आहे ते भरभरून उपभोगा, स्वतः सुखी राहा आणि दुसऱ्यांना सुखी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय वाटते? .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


तू आणि मी ....



एवढंच आहे सांगायचं मला
तुझ्याविना न उरे अर्थ जगण्याला
समर्पिले जीवन सारे मी तुला
मी राधा तू श्याम, तू चंद्रमा मी चकोर, 
मी कुसूम तू मकरंद, तू दर्पण मी प्रतिबिंब,
मी धरती तू आकाश, तू काव्य मी रचना
मी पणती तू प्रकाश, तू बासरी मी सूर
मी जीव तू श्वास

होऊनी लाभले सौख्य जीवनास

राहिल निरंतर साथ तुझी नि माझी,

आहे मज गाढ विश्वास .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 24 September 2021

स्वप्नांची दुनिया




प्रत्येक माणूस हा कोणते ना कोणते स्वप्न घेऊन जगत असतो.स्वप्नं ही  जागेपणी,निद्रितावस्थेत,दिवसाढवळ्याही पडतात. काही स्वप्नं ही अगदी मनावर हळुवार मोरपिस फिरवल्याप्रमाणेअसतात, काही स्वप्नं भयप्रद असतात, काही स्वप्नं अगदीच गूढ असतात, काही स्वप्नं ही  अतिशयोक्तीही असतात, काही स्वप्नं ही प्रेरणादायक तर काही निरर्थकही स्वप्नं माणसास पडतात.  काही स्वप्नं पाहिली तरी आठवत नाही. माणूस हा सतत स्वप्नांच्या मागे धावत राहातो.
       माणसाची स्वप्नं ही नानाविध प्रकारची  असतात. कोणास एक चांगले घर हवे असते, कोणाला चांगला जोडीदार हवा असतो, कोणाला परीक्षेत उत्तम गुण हवे असतात, कोणाला खूप प्रसिद्धी, नाव हवे असते, तर छान पर्यटनस्थळे फिरण्याची  काहींची स्वप्नं असतात. ही स्वप्नं साकार करण्यासाठी माणूस धडपडत असतो.
       स्वप्नं पाहावी,निश्चित पाहावी. पण त्याकरिता कठोर परिश्रम करण्याची माणसाची तयारी असणे खूप महत्त्वाचे आहे. स्वप्नं पाहिली तर माणूस ध्येयाकडे वाटचाल करू शकतो. पण कधी कधी पाहिलेले स्वप्न पुरे होतेच असे नाही, तेव्हा खचून न जाता त्यातून न डगमगता बाहेरआले पाहिजे. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून नव्या उमेदीने पुन्हा स्वप्नपूर्तीकरिता झटले पाहिजे. यश - अपयश स्विकारता आले पाहिजे.
        अगदी अलीकडचेच उदाहरण पाहिले तर, प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने ही असेच स्वप्न पाहिले होते.त्याच्याकडे पैसा, प्रसिद्धी, सन्मान सारे काही होते. पण जीवनात काही कटू गोष्टींमुळे, नैराश्याने त्याने स्वतःचे  जीवनच संपवले, ही गोष्ट किती वेदनादायक आहे. ईश्वराने दिलेले हे जीवन खरे तर किती सुंदर आहे. ते माणसाला उपभोगता आले पाहिजे.
        म्हणून स्वप्नं जरूर पाहा, ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक ते कष्ट करा. तसेच अपयश पचविण्याची तयारी ठेवा. नुसतेच स्वप्नांच्यामागे धावू नका, जिद्द ठेवा. ठरवले तर अशक्य असे काहीच नसते,  हा विचार कायम स्मरणात ठेवा.
          'स्वप्नांस देऊनी आकार, तूच हो तुझ्या जीवनाचा शिल्पकार '.

सौ. राजश्री सुहास जाधव
            


      


Thursday, 23 September 2021

शांत मन




'शांत मन' असे सुखाचे साधन. माणसाने स्वतःचे मन शांत ठेवणे खूप महत्वाचे आहे. खूप प्रयत्नांनी आपण हे साध्य करू शकतो.
        माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की त्याच्या मनात सतत काही ना काही चालूच असते. बाह्यतः तो शांत भासत असला तरी त्याच्या अंतरात खूप गदारोळ चालू असतो. तो मनातल्या मनात स्वतःशी अविरतपणे बोलत असतो. वेगवेगळ्या भावना, विचार, भयगंड, आनंद, सुख, चिंता, दुःख, मत्सर, यशापयश, आशा आकांक्षा संताप, क्लेश या साऱ्या विचारांचा त्याच्यावर पगडा असतो. परिणामी माणसाला शांतता लाभत नाही आणि त्यातून प्राप्त होणारे सुखही मिळत नाही.जो पर्यंत माणूस त्याच्या या विचारांतून, अशा इच्छा- आकांक्षातून बाहेर येत नाही तो पर्यंत त्याचे मन हे  शांत होऊ शकत नाही.
       शांतता लाभणे म्हणजे नेमके काय? शांतता ही  खरे तर कुठेही शोधण्याची गरज नसते. ती तर आपल्यात, आपल्या आजुबाजूलाच असते. तिला फक्त अनुभवता आले पाहिजे. जर मन एकाग्र असेल तर खूप कल्लोळातही  ही आपण शांतता अनुभवू शकतो.  न बोलताही खूप काही सांगून जाते शांतता. मनातील  सगळे नकारात्मक विचार नाहीसे होऊन माणूस सगळ्या गोष्टींकडे जेव्हा सकारात्मकतेने पाहू लागतो  तेव्हा त्यास सुख प्राप्त होते, समाधान मिळते.
       ईश्वर सानिध्यात राहून ध्यानाद्वारे आपण मन
शांत ठेऊ शकतो. मनातील सर्व विचार काढून टाकून
एकाग्र चित्ताने ईश्वर साधना केली तर मन हे खरोखर
शांत होऊ शकते. आपण किमान तसे प्रयत्न करू शकतो.
       स्थीर, स्थितप्रज्ञ मन हे कायम शांत असते. अशा शांत मनात संतुष्टता निर्माण होते व माणूस सुखासीन राहतो.
             थोर संत तुकाराम महाराज हे अत्यंत शांत स्वभावाचे होते. त्यांनी संसारात राहूनही खरा परमार्थ प्राप्त केला. लोकांनी कितीही छळले, त्रास दिला तरीही त्यांनी विठ्ठलाचा ध्यास सोडला नाही. पांडुरंगाच्या भक्तीत ते लीन झाले. ' तुका म्हणे माझे हेची सर्व सुख |
                    पाहिन श्रीमुख आवडीने || '
ह्या त्यांच्या अभंग ओळीतून हेच समजते की, त्यांचे सुख हे पांडुरंगातच दडलेले आहे. तुकाराम गाथेतून साऱ्या जीवनाचे सार त्यांनी सांगितले आहे. 

सौ. राजश्री सुहास जाधव.



     


इंद्रधनुष्य



रिमझिम रिमझिम बरसूनी जाता धारा
नभी प्रकटला मनमोहक इंद्रधनुष्यी पिसारा
देखोनी सप्तरंगांचे  रूप साजिरे
हरखूनी गेले हे मन बावरे ||
साठवूनी ठेवण्या रूप तयाचे, नेत्र हे आसुसले
पण निमिषार्धात इंद्रधनू ते लोपले
भाव-भावनांची जणू बनून प्रतीके
सप्तरंग हे अवतरले
अन् जीवन अवघे रंगात रंगले ||
तांबडा रंग हा प्रेमाचा अन् रागाचा
नारिंगी हा त्यागाचा अन् ऊर्जेचा
पिवळा रंग हा मैत्रीचा अन् आशावादाचा
हिरवा रंग हा समृद्धीचा अन् प्रगतीचा
निळा हा विश्वासाचा अन् सद्गुणतेचा
पांढरा रंग हा पावित्र्याचा अन् शांतीचा
जांभळा तो गूढतेचा अन् कल्पकतेचा
पांघरुणी इंद्रधनूचे रंग हे सारे
हरखूनी गेले हे मन बावरे ||

सौ.राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 22 September 2021

ते माझे कधीच नव्हते....




ते माझे कधीच नव्हते.....

माझे हसणे,  माझे रडणे, माझे दिसणे
माझे नाव, माझे गाव आणि माझी माणसे
या माझ्यातच मी गुंतले होते

हृदयाच्या खोल कुपीत खूप काही दडवले होते
ते माझे कधीच नव्हते, हे मी जाणले होते
जे जे होते माझे, ते तर निसर्गाचे दान होते !

लख्ख केले आता मी मनाचे आरसे
जगण्यास बळ देण्या हे आहे पुरेसे

गळून पडले आता मीपणाचे बुरखे
दुःखाला मी केले पारखे

हृदयाच्या खोल कुपीत खूप काही दडवले होते
ते माझे कधीच नव्हते, हे मी जाणले होते......

सौ. राजश्री सुहास जाधव.


पुस्तक परी



NGO मार्फत प्राथमिक शाळेमध्ये ' पुस्तक परी ' म्हणून काम करत असताना, त्या वर सुचलेली माझी ही कविता नक्की वाचा.
     पुस्तक परी
प्रत्येक मूल लाख मोलाचे
ठेऊनी जाण मनी
घेऊनी पुस्तकांची शिदोरी
गोष्टीचे पंख लेऊनी
आली ही पुस्तक परी ||
श्रवण, वाचन, लेखन, संभाषण
साऱ्या आहेत या भाषेच्या क्षमता
त्याकरिता घेऊनी आलो आम्ही
उपक्रमात विविधता.
गाणी, गोष्टी ऐकताना मुले होतात दंग
इयत्तेनुसार दिलेल्या चित्रांत लिलया भरतात रंग.
मुळाक्षरे ते जोडाक्षरे; खडतर असली वाट जरी
अखेर गाठणार आम्ही यशाची पायरी.
घेऊनी पुस्तकांची शिदोरी
गोष्टीचे पंख लेऊनी
आली ही पुस्तक परी ||
वाचनस्पर्धा, कथाकथनातून
मुलांतील सुप्त गुणांना मिळतो वाव
जोडीला घेतला जातो उपक्रम जोडाक्षर सराव.
प्रवाहात शिक्षणाच्या यावे प्रत्येक मूल
ठेऊनी आस ही उरी
घेऊनी पुस्तकांची शिदोरी
गोष्टींचे पंख लेऊनी
आली ही पुस्तक परी ||
सौ.राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 21 September 2021

शब्द....



शब्दांविना सारे असे फोल 
जाणून घ्या हो शब्दांचे मोल
शब्द असतात प्रेमळ, हसरे
अन् कधी लडिवाळ, रुसरे
कधी शब्द कडवट, बोचरे ,
कधी शब्द होती अंगार
कधी शब्द होती लाचार
शब्दांनी शब्द जोडती माणसाला
तसे शब्दांनी शब्द कारण असे तंट्याला
अलवार शब्द हे मनासी घालती फुंकर
अन् भेदती ह्रदयीचे अंतर
सूर-तालांचा साज चढवूनी
शब्दांतूनी होते गीत साकार
हृदयातील भाव जाणण्या शब्द हेच आधार
शब्दांविना सारे असे फोल
जाणिले मी हो शब्दांचे मोल 🌺🌺

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 20 September 2021

कृपादृष्टी 🌹🌹



सहज एकदा मनात मी डोकावले
अन माझ्याच मला पाहुनी भयभीत झाले

तिरस्कारांचे, सूड भावनेचे व अहंभावनेचे
रूप पाहुनी अवसान सारे गळाले

इच्छा-आकांक्षांचे विणूनी जाळे
संघर्षमय जीवनास माझिया मीच कवटाळले
अन् मुखवटे सुखाचे माझे नकळत गळून पडले

जीवनात मिळविण्या प्रेम, वात्सल्य, आपुलकी
शरण गेले मी प्रभूचरणी

पराकाष्ठेने इंद्रियांवरी मिळवूनी ताबा
तमोगुणांचे मळभ सारे दूर केले

न साचे मनात काही आता 
सदैव राहू दे कृपादृष्टी तुझी रे भगवंता...... 🌹🌹🙏 

सौ.राजश्री सुहास जाधव.


रंग हा वेगळा....


श्री छत्रपती शिवरायांची

शौर्य गाथा ज्ञात आहे सकळा

रंग तयांचा वेगळा ||

विठ्ठल नाम जपता जपता तुकोबांनी
फुलवला भक्तीचा मळा 
रंग तयांचा वेगळा ||

मातृत्वाच्या दानाचा
नारी अनुभवे सुखसोहळा
रंग तयांचा वेगळा ||

कन्हैयाच्या बासरीने
मंत्रमुग्ध झाल्या गोपिका या गोकुळा
रंग तयांचा वेगळा ||

स्वातंत्र्य प्राप्तीकरिता शूरवीरांनी
जोपासला छंद बलिदानाचा हा आगळा
रंग तयांचा वेगळा ||

क्षितिजा पलीकडले ज्ञात होण्या
मानव झेपावला अंतराळा
रंग तयांचा वेगळा ||

जन्म घेऊनी या भूमीवर
अनुभवते मी नित्य सोहळा
रंग माझा वेगळा || 🌷🌷

सौ.राजश्री सुहास जाधव.


सृष्टीची जपणूक



आधुनिकतेच्या नावाखाली
अवडंबर माजवले मानवाने
हिरव्या कांतीने नटलेल्या वसुंधरेला 
वृक्षतोड करूनी नेस्तनाभूत केले त्याने
सिमेंटची उभारूनी जंगले वेगाने
दुष्काळाला जणू आमंत्रणच दिले मानवाने
शेतात राबणाऱ्या हातांनी वाट शहराची धरली
अन् स्वतःच्या शिवाराला विकण्याची
वेळ माणसावर ती आली
करू लागले दुकानदारही आता
धान्यात बेमालूमपणे भेसळ
मग येईल कसे अंगात बळ?
सारे असे माणसाच्याच कर्माचे फळ
सण, समारंभाच्या नावाखाली
उच्छाद मांडला कर्ण कर्कश अशा डीजेचा
अन् हरवून गेला सूर तो नाद मधुरतेचा
उतमात केला माणसाने निसर्गाच्या दानाचा
घेतला करुनी घात  स्वतःच स्वतःचा
दुष्काळ, पूर, चक्रीवादळ, भूकंप,
अग्निकांड, करोना एकामागुनी एक
केले आघात मग सृष्टीने
समतोल बिघडवण्या निसर्गाचा
मानवच असे कारण हे त्याने जाणले
करता सृष्टीची जपणूक
सुखी होईल जीवन आपसूक
हे मानवाला आता उमगू लागले
अन् त्या दिशेने पाऊल ते मानवाने उचलले....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 19 September 2021

लिहायचं होतं बरंच काही.....


लिहायचं होतं  बरंच काही....

पण शब्द मजला सुचले नाही....

शब्दांचा उडे गोंधळ....

भावनांची होई सरमिसळ ...

काय लिहावे, काय पुसावे ...

सहज,सुंदर की, ढोबळ ....

लिहायचं होतं बरंच काही ....

पण शब्द मजला सुचले नाही ....

भावनांना जोडुनी शब्दांची धार ....

शब्द देती लिहिण्यास आधार ....

कथा, कादंबरी अन् कविता ....

विषय असती हजार ....

परि जमेल का मजला ...

प्रश्न पडले फार ....

लिहायचं होतं बरंच काही ....

पण शब्द मजला सुचले नाही ....

सौ. राजश्री सुहास जाधव.


कठीण असं काहीच नसतं...



कठीण असं काहीच नसतं
ठरवलं तर सहज, सोपं असतं
विश्वास असता स्वतःवर
सहज साध्य होत जातं ||

इवल्याशा त्या पाखरास
गगन भरारी घेण्यास
पंखात बळ साठवावं लागतं
कठीण असं काहीच नसतं....

काळोखातही अस्तित्व आपले टिकविण्यास
काजव्यास त्या स्वयंप्रकाशित व्हावं लागतं
कठीण असं काहीच नसतं....

स्त्री-पुरुष भेदभावात अडकलेल्या नारीस
खंबीर होऊन लढावंच लागतं
कठीण असं काहीच नसतं....

वाट चुकलेल्या लेकराला सन्मार्गी लावण्यास
मातेला प्रसंगी कठोर व्हावंच लागतं
कठीण असं काहीच नसतं....

ठरवलं तर सहज, सोपं असतं
विश्वास असता स्वतःवर
सहज साध्य होत जातं ||

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 18 September 2021

डाव हे सारे घडीचे.....




'भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी

अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी '
             खरेच जीवन किती क्षणभंगुर आहे ना !,
आपण कशाचीच शाश्वती देऊ शकत नाही. आज
मिळणारे सुख उद्या मिळेलच याची खात्री देता येत नाही.
नियतीने आपल्यापुढे काय मांडून ठेवले आहे ते आपण
सांगू शकत नाही.
            जन्माला येणारा प्रत्येक माणूस हा काही ना काही अपेक्षा, आकांक्षा ठेऊनच मार्गक्रमण करत असतो.
स्वतःची ध्येयं पूर्ण करण्याकरिता नवनवे मनसुबे रचत असतो आणि त्या दिशेने वाटचाल करत असतो. कधी कधी वेगळ्या वाटेने पुढे जायचे धाडसही माणूस दाखवतो. अशावेळेस त्याच्या जिवाभावाचे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तर काही आप्तजन त्याला माग खेचण्यास जीवाचे रान करतात. अशा दोन
टोकाच्या परिस्थितीला माणसाला सामोरे जावे लागते.
एवढा आटापिटा केल्यानंतर माणसाला कधी यश मिळते
तर कधी अपयशाला सामोरे जावे लागते. पण म्हणून लगेच हार मानायची नसते. हा मांडलेला डाव अर्धवट न सोडता माणसाने धैर्याने त्या परिस्थीतीचा सामना करून पुन्हा जोमाने आपले ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
    पती-पत्नी लग्न बंधनात बांधले गेले की संसार सुरळीत सुरू झाला तरी पुढे त्यांना अनेक अडथळ्यांना पार करावे लागते. एकमेकांची मने सांभाळावी लागतात. नात्यांना जपावे लागते. तेव्हा कुठे अडीअडचणींत सगे-सोयरे धावून येतात.
         जीवन हे अशाश्वत आहे, आज आपण आहोत, उद्याचे काहीच सांगता येणार नाही. कोणीही अमृत प्राशन करून जन्माला आलेला नाही, अमर नाही. त्यामुळे सर्वांशी एकोप्याने राहावे, सचोटीने वागावे, सुख-दुःखात आपल्या जवळच्यांच्या सदैव पाठीशी खंबीरपणे उभे राहिले तर तेही आपल्याला साथ देतील.
          'मला ते जमणार नाही, कसे करू!, येत नाही...' असे न म्हणता वेगवेगळे अनुभव घ्यावे, मेहनत करावी आणि विस्कटलेली घडी नीट बसवण्याचा प्रयत्न करावा. यशापयशाने खचून न जाता मिळालेल्या आनंदाचा उपभोग घ्यावा. न जाणो उद्याचा दिवस हा आपलाच असेल आणि सुखाचे क्षण आपल्याला गवसतील. म्हणून 'असले जरी डाव हे घडीचे, प्रयत्न करा हो सच्चे, अन् सार्थक करा जीवनाचे.'

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 17 September 2021

आई

 




आई 🌹

वंचित राहिले सदा आईच्या प्रेमाविना
लाभले नाही भाग्य कुशीत तिच्या निजण्या
व्याकुळ राहिलं मन कायम प्रेमासाठी भुकेलं
सांग ना रे देवा काय माझं चुकलं?

कोड कौतुक करून घेण्या
कोणाकडे करू आता मी विनवण्या
होताना मोठी मी तू न कधी पाहिलं
सांग ना रे देवा काय माझं चुकलं?

सगे-सोयरे होते सारे
पण आईविना मज न आवडे दुसरे
स्वप्नात कायम तुलाच गं मी पाहिलं
सांग ना रे देवा काय माझं चुकलं?

एकदा तरी वात्सल्य मातेचे मिळू दे
हेची मागणे आता तुझ्याकडे 🙏

सौ.राजश्री सुहास जाधव.


स्मृती




रात्र सरली, सरली वर्ष, सरत चालले आयुष्य
तगमग होई जीवाची, धुंद झाली मती,
फिरुनी जाग्या झाल्या स्मृती,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी, झुलते मी |
स्मृतींना गंध आहे शाळेतील मातीशी एकरूप झालेल्या
इवल्याशा निलगिरीचा,
स्मृतींना गंध आहे बासरीतून उमटणाऱ्या
त्या मंजुळ सुरांचा,
स्मृतींना गंध आहे भाबड्या त्या मैत्रीचा,
स्मृतींना गंध आहे हसत खेळत शिक्षण देणाऱ्या
त्या गुरुजनांचा,
स्मृतींना गंध आहे 'सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार
या अभिवादना ' या प्रार्थनेचा,
रात्र सरली, सरली वर्ष , सरत चालले आयुष्य
तगमग होई जीवाची, धुंद झाली मती,
फिरूनी जाग्या झाल्या स्मृती,
आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलते मी, झुलते मी ||

सौ. राजश्री सुहास जाधव.



Thursday, 16 September 2021

प्राजक्त......


सप्तपदीच्या पावलांनी गृहप्रवेश मी केला 

लोभस प्राजक्ताच्या सुवासाने जीव हा मोहरला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


नवखी होते तिथे मी, हर एक क्षण नव्याने अनुभवला 

सासु-सासरे, दिर-नणंदांचा राखुनी मान आदर तयांचा

 केला, अन् माय बापाने दिलेला संस्कार मी जोपासला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


करुनी आपुले सकळांना, गुंफूनी ठेविले या नात्यांना 

जिव्हाळ्याचा अन् प्रेमाचा भावबंध मी जपला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


एकरूप होत सहचाऱ्यासव, संसार सुखाचा केला 

संसाराच्या वेलीवर चिमुकल्याच्या आगमनाने

जीव माझा सुखावला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


माहेरच्या आठवणींनी व्याकुळलेल्या मनाला,

नात्यांनी हळुवार दिलासा दिधला 

आपुलकीचा ठेवा हा हृदयी मी साठवला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


चांदण्यासम भासणाऱ्या, श्वेत, केशरी रंगात रंगलेल्या 

लोभसवाण्या प्राजक्ताने जणू त्याग आणिक 

पावित्र्याचा संदेश मजला दिधला 

माझ्या सासरच्या अंगणी प्राजक्त हा दरवळला ||


सौ. राजश्री सुहास जाधव.

स्किल

       




🌹स्किल🌹 
      
सगळ्यांना सगळं येतं
असं कधी होत नसतं;
पण ज्याला जे येतं ते
खूप छान असतं.
कारण ते ज्याचं त्याचं स्कील असतं.
कोषातच गुरफटून न राहता
सुरवंटाचं फुलपाखरू होतं
हे त्याचं स्कील असतं.
विद्रूप असले जरी पाय
मयुरासम पिसारा फुलवून
नृत्य करणे जमेल काय?
कारण हे त्याचं स्कील असतं.
मातीतून सोनं पिकवणं
हे बळीराजाचं स्कील असतं.
कर्ता करविता तो ईश्वर
कधी, कुठं, कसं, काय, कोणास निर्माण करावं
हे त्याचं स्कील असतं.
आणि दाद कशी, कधी, कुठे, कोणास द्यावी
हे ज्याचं त्याचं स्कील असतं.
सगळ्यांना सगळंच येतं
असं कधी होत नसतं
पण ज्याला जे येतं
ते खूप छान असतं
खूप छान असतं.
                  राजश्री....✍️

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...