Sunday, 31 October 2021

मतभेद



मतभेद हे सर्वच नात्यांमध्ये असतात. माय लेकरांमध्ये,
मित्र-मैत्रिणींमध्ये, शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये, कुटुंबामध्ये,
नवीन पिढी व जुन्या पिढीमध्ये मतभेद हे प्रकर्षाने जाणवतात. ऑफिस मधील सहकाऱ्यांमध्ये, समाजात, धर्मामध्ये अगदी देश-विदेशांमध्ये मतभेद दिसून येतात.
      मतभेदांमुळे वाद-विवाद, कलह, नुकसान, मनस्ताप हेच पदरी पडते. मतभेद हे माणसातच दिसून येतात. आपण कधी पशु पक्ष्यांमध्ये मतभेद झालेले ऐकले आहे का ? नाही ते तर माणसांमध्ये दिसून येतात. माणसातील अहंभाव मतभेदास कारणीभूत ठरतो. तोच अहंभाव जर दूर सारला तर मतभेद मिटू शकतात. समोरच्या व्यक्तीच्या मताचा आदर माणसाने केलाच पाहिजे. मतभेदामुळे माणूस दुःखाच्या गर्तेत अडकतो. स्वतःबरोबरच
तो समाजाचे, देशाचे ही नुकसान करतो. मानव या मतभेदास कवटाळून ठेवतो आणि स्वतःचे जीवन दुःखी करतो.
       मतभेद जर असले तर ते दूर केले पाहिजे, थोडा समजुतदारपणा दाखवला पाहिजे. मनाचा मोठेपणा दाखवून समोरील व्यक्तीस माफ करता आले पाहिजे. आपापसातील वाद-विवाद मिटवून सलोख्याने, एकजुटीने राहिले पाहिजे.

सौ.राजश्री सुहास जाधव.


Friday, 29 October 2021

सुख



खरं सुख हे मानण्यात असतं
बसलो वाट बघत सुखाची जर
सहज ते हुलकावणी देत असतं 
दुःखाशिवाय सुख कळत नसतं
सुख अन् दुःख हे येत नि जातं
येणाऱ्या सुखाला अलवार
ओंजळीत घ्यायचं असतं अन्
सुखाच्या क्षणात स्वच्छंद जगायचं असतं
निसटून जाण्याआधी साऱ्यांना
ते वाटायचं असतं कारण,
देण्यात जे सुख असतं
ते कशातच नसतं.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


शब्दाविना



भाव मनातले जाणण्या
का कराव्या शब्दांना विणविण्या ?
गुज मनीचे ह्या हृदयीचे,
त्या हृदयासी उमजण्या
असावी निस्वार्थ भावना
व्यक्त होईल ती शब्दांविना
डोळ्यांतूनही उमगेल भाव सारे
कशाला हवे मग शब्दांचे पसारे !
शब्दाविना घडेल सारे 
भाव मनातले घेऊन
येईल सुखाचे वारे .....

सौ. राजश्री सुहास जाधव.



























Wednesday, 27 October 2021

एकटी

सर्वांसोबत राहूनही वाटतं
कधी कधी एकटं
कारण वागणं असतं 
समोरच्याचं ते लटकं
असती ती नुसती नाटकं
वागणुकीतून त्यांच्या
सहज समजतं
कोण आपलं अन्
कोण परकं
  

सौ. राजश्री सुहास जाधव.


मर्जी

सर्वांची घरात सांभाळताना मर्जी

त्रेधातिरपीट उडते माझी

गोंधळून जाऊनी कामे करती घाई घाई

मग कामात अचुकता ती कशी येई

सारे म्हणती मग करतेस कामात दिरंगाई

काहीच तुला तर येत नाही

जोडुनी हात सर्वांना करते मी अर्जी

येते मला सारे काही पण

त्रेधातिरपीट उडते माझी

सांभाळताना तुमची मर्जी

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 26 October 2021

निसर्गाचे दान



डोंगर दऱ्या, झुळ झुळणारे झरे
हिरव्या कांतीने नटलेली वसुंधरा
सप्तरंगांची उधळण करणारे नजारे
सारी पंचतत्त्वे, सारेच आहे  निसर्गाचे दान
न करावा कधीच त्याचा अवमान
लाभले आपुल्यास हे वरदान
ठेवावी साऱ्यांनी त्याची जाण
खरेच राखतो का मानव त्याचे भान ?
फायद्यासाठी स्वतःच्या
ओरबाडून घेतला सृष्टीचाच प्राण
माजवले प्रदूषण हरतऱ्हेने
घालविली साऱ्या निसर्गाची शान
अन् बिघडवले स्वतःचेच जीवनमान
निसर्गाच्या दानाचा करिता अवमान
होईल जीवन नर्कासमान
म्हणून मानवा, जतन करून
ठेवावे निसर्गाच्या दानाला
होईल अर्थ प्राप्त
आपुल्या जगण्याला....

सौ. राजश्री सुहास जाधव.


राजे आम्ही....



कष्टाला घाबरणाऱ्यातले नाही आम्ही
करून मेहनत, मातीतून सोने पिकवतो नेहमी
वाहते वारे सदैव चैतन्याचे अन् स्फुर्तीचे
जी कवाडे खोलती प्रकाशाचे
का मग भय बाळगावे अंधाराचे ?
अंधारालाही चिरून
खेचून आणू मार्ग ते यशाचे
भिनले नसानसांत संस्कार
शिवबाचे , संतांचे अन् महंतांचे
झोंबतील जरी वारे अपयशाचे
शोधू मार्ग बाहेर पडण्याचे
आहोत राजे आम्ही
आमुच्या मनाचे ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 24 October 2021

ऋण



देऊनी जन्म मजला तू 🌺

जग हे मज दाविले 🌺

तळहाताचा करुनी पाळणा 🌺

आजन्म मला तू सांभाळले 🌺

गाऊनी अंगाई मजसाठी तू 🌺

कुशीत तुझ्या निजवले 🌺

सांगुनी कथा शूरवीरांच्या 🌺

तूच मजला घडवले 🌺

स्वतः दुःख सोसुनी🌺

सुखात मजला ठेविले 🌺

थोर तुझे उपकार आई 🌺

तुझ्या ऋणाची कशी करू मी उतराई 🌺

आवडेल मज तुझ्या ऋणात राहण्या निरंतर आई.....🌺🌺

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 23 October 2021

ओढ

जे असे गूढ 
लागे त्याचीच ओढ 
ओढ ती आसमंतीच्या चंद्र,चांदण्यांची
ओढ ती  सप्तरंगी इंद्रधनुची
ओढ ती झर झर वाहणाऱ्या
शुभ्र-धवल निर्झराची
ओढ ती दाटुनी आलेल्या
काळयाभोर मेघातुनी बरसणाऱ्या जलधारांची
ओढ ती दूरवरी आळवणाऱ्या
कोकिळेच्या मंजुळ स्वरांची
ओढ ती हलकेच कवाडांतुनी
प्रवेशणाऱ्या त्या रवि किरणांची
ओढ ती कान्ह्याच्या बासरीतुनी
उमटणाऱ्या सुरेल स्वरांची
अनामिक ती ओढ
लाविती जीवाला वेड 
उठते मनी काहूर
आविष्कार तो देखण्या
होई जीव आतुर

सौ. राजश्री सुहास जाधव.


प्रेरणा



यजमानांच्या प्रेरणेने घेतली हाती लेखणी 
अन् सहज जाहले लिहिती मी
विचार ते प्रकटले कागदावरी
घडली कशी काय ही जादुगरी
माझे मलाच न उमजे आजवरी
लेखणीत असे ताकद अफाट खरी
जणू आहे ही शब्दांची तिजोरी
रीती करते ती लेखणीतुनी पानावरी
चुकत असतील शब्द जरी
शिकण्याची असे सदैव तयारी
दुनिया ही शब्दांची न्यारी
आहे त्या दुनियेत मी रमणारी ....

सौ. राजश्री सुहास जाधव.





Friday, 22 October 2021

आता कुठे उमगू लागलं.....

माय-बापाला ना कधी समजून घेतलं...
सतत काळजी करणं त्यांचं,
न मला कधी आवडलं...
वाटली मला ही बंधने त्यांची,
म्हणून प्रेम त्यांचं मी झिडकारलं...
वारंवार समजून सांगण्याच्या,
सवयीला त्यांच्या मी नाकारलं...
प्रेमाला त्यांच्या ना कधी मी
जाणून घेतलं...
धुंदीत स्वतःच्या जगण्यालाच
मी सर्वस्व मानलं...
पण कालांतरानं चित्रं सारं पालटलं...
होता लग्न झाले मग आई
हळुहळू उमगू लागले सारे काही...
आगमनाने बाळाच्या,
हृदयात प्रेम ते साठलं...
स्वतः होऊन आई,
हृदय मायबापाचं मला कळलं...
अन् आठवणीनं त्यांच्या,
हृदय हे पिळवटलं...
त्यांच्यावरचं माझं प्रेम,
सांगायचंच राहून गेलं...

सौ. राजश्री सुहास जाधव.


बीटाच्या पुऱ्या/ पराठे



नमस्कार🙏
आज ज्या पाककृती बद्दल  सांगणार आहे,ती नक्कीच सर्वांना आवडेल. मुले बीट,कोबीची भाजी खायची म्हटलं की कंटाळा करतात. पण ह्या भाज्याही खाणे खूप महत्त्वाचे आहे.अशा वेळेस आपण त्या वेगळ्या पद्धतीने केल्या तर सर्वानाच आवडू शकतात. चला तर मग, आज आपण अशीच एक पाक कृती पाहू.......

बीटाच्या पुऱ्या/ पराठे

साहित्य : २ मध्यम आकाराचे बीट, १कच्चा बटाटा, थोडा कोबी आपल्या आवडीनुसार, गव्हाचे पीठ,बेसन पीठ, मैदा, आले, लसूण, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, एक छोटी वाटी दही, चाट मसाला, धने पूड, जिरे पूड, मीठ, कोथिंबीर, तेल.

कृती :-  प्रथम बीट स्वच्छ धुवून किसून घेणे. त्याचप्रमाणे थोडा कोबी, कच्चा बटाटा दोन्हीही किसून घेणे. किसलेल्या बीटाचे पाणी फेकून न देता ते बाजूला ठेवणे. कोबी व बटाटा किसातील पाणी काढून टाकावे. नंतर या मिश्रणामध्ये गव्हाचे पीठ (इतर दोन्ही पिठांपेक्षा जास्त), थोडे बेसन थोडा मैदा घालावा. या सर्व मिश्रणामध्ये
१ चमचा जिरे, धने पूड, आले लसूण पेस्ट, ५ ते ६ हिरवी मिर्ची पेस्ट (तिखट आवडत असेल तर जास्तही घेऊ शकता), बारीक चिरलेली कोथिंबीर, चाट मसाला १ चमचा, एक छोटी वाटी दही, मीठ चवीनुसार, एक मोठा चमचा गरम तेल घालणे. सर्व मिश्रण एकजीव करून त्याची कणीक मळणे, पण मळताना पाणी अजिबात
घालू नये, त्या ऐवजी आधी काढलेले बीटाचे पाणी लागेल तसे घालून शक्यतो घट्ट मळणे, कारण बीट, बटाटा, कोबी ह्यांस पाणी सुटते. नंतर ५ ते १० मिनिटांनंतर पुऱ्या लाटून, कढईत तेल गरम झाले की तळणे. झाल्या गरमागरम पुऱ्या तयार. 
ह्याच पिठाचे आपण पराठे ही बनवू शकता.
दही किंवा सॉस सोबतही  छान लागतात.

सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 21 October 2021

पंढरीनाथा




दाटला अंधार
ना कोणाचा आधार
झालो मी बेजार
कृपा कर पंढरीनाथा ||
होऊनी वारकरी
आलो मी मंदिरी
पाहू नकोस अंत आता
दर्शन दे रे पंढरीनाथा || धृ ||
रूप तुझे पाहण्या
आसुसले डोळे आता
तू सकलांचा त्राता
निज रूप तुझे दाव आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||१||
दर्शनाने तुझ्या
मिटतील साऱ्या चिंता
घेऊनी कर कटीवरी
उभा विटेवरी
ये सामोरी तू आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||२||
साद लेकराची ऐक आता
चरणी तुझ्या झुकवितो माथा
कर तुझ्या कृपेची बरसात आता
दर्शन दे रे पंढरीनाथा || ३||
निराकार तू ,
साऱ्यांचा आधार तू
रूप तुझे गोजिरे
मला दाव तू
झाले मन अधीर आता
दर्शन दे रे पंढरीनाथा ||४||

सौ. राजश्री सुहास जाधव.


दुःखासोबत सुख .....

खोट्या बतावण्या करून
दिलं ज्यानं अर्ध्यावर सोडून
नाही पाहणार त्याच्याकडं वळून
असेल जिथं जिथं आठवणी त्याच्या
टाकेल मी  अलगद पुसून
पुसल्या जरी त्या आठवणी ,
खरंच जाईल का  निघून ?
राहतील कायम हृदयात
अशाच त्या साठवून
देण्यास दुःख मनाला
येईल त्या वारंवार परतून
परी जाणार नाही कधी मी हरून
पाहिल दुःखा सोबतही जगून 
येईल सुख दारी माझ्या आपणहून .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 20 October 2021

भाव



नाना तऱ्हेचे असती भाव
जे घेते मनाचा ठाव
कल्लोळ उडता भावनांचा
चढवुनी साज शब्दांचा
सुटेल गुंता मनाचा
प्रेमभाव समजण्या
आधार तो प्रेमळ शब्दांचा
करुण भाव उमजण्या
अलवार शब्दांच्या त्या मांडण्या
द्वेष भाव तो असे भयंकर
शब्दा-शब्दातुनी  बरसे मत्सर 
जाणुनी घेता भाव भावना
ना भासेल मग कसलीच विवंचना 

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 19 October 2021

सुख अंतरीचे



दूर वरी जे दिसे
ते सारे नसे साजिरे
समीप जाता तयाच्या
अंतरंग ते सारे उकले
जे  मनासी भावलेले
ते तर मृगजळ सारे
भुलूनी तयासी
नैराश्य पदरी रे
त्यापरी शोधावे
सुख अंतरीचे
वसे ठायी ते आपुले 
असे सौख्य ते
आपुल्यातच दडलेले
पारखण्या ते लागती
दिव्यत्वाचे डोळे
गवसता ते, अनुभवाल
सुख अंतरीचे आगळे वेगळे......

सौ. राजश्री सुहास जाधव.


सुखाच्या पल्याड



'जाऊ दे, माझ्या नशिबात जे असेल ते होईल ', असे वाक्य आपण बरेचदा बोलून जातो. काही माणसांना तर ती सवयच जडते, सरळ सारं काही नियतीवर ढकलून मोकळे होतात.
       
          'दे हरी पलंगावरी' असे म्हणून कसे चालेल ! आपल्याला कुठलाही हरी येऊन आयते काहीच देणार नाही. त्याकरिता स्वतःचं डोकं वापरून, परिश्रम करून आपण वाटचाल केली तर आपले जीवन सुसह्य होईल.
माणसाचे जीवन ध्येय शून्य असेल तर त्याचा काहीच उपयोग होत नाही. नुसतेच नशिबाला दोष देत राहणे, हे चुकीचे आहे.
           माणसाला एकाच वेळेस खूप काही हवे असते. त्याला सुंदर पत्नी हवी असते, छानसं घर हवं असतं, चांगली नोकरी हवी असते, भरपूर पैसा-अडका हवा असतो, समाजात प्रतिष्ठा हवी असते. काहींना हे सारे त्यांच्या कष्टाने, कठोर मेहनतीने प्राप्त होते तर काहींना पूर्वजांच्या कृपेने प्राप्त होते. हे सर्व सुख प्राप्त झाले तरी ते चिरकाल टिकेलच असे आपण सांगू शकत नाही. म्हणून जीवन समाधानाने जगायचे असेल तर मेहनतीशिवाय
पर्याय नाही. आयुष्यात दुःख येते तेव्हाच आपल्याला सुखाची किंमत कळते. आयुष्यात टक्के टोणपे खाऊनच खरे जीवन अनुभवता येते.
            माणूस पूर्णपणे कधीच संतुष्ट नसतो. त्याला अधिकाधिक हवेच असते. पण या सर्वाच्या पलीकडे जाऊनही एक सुदंर असे जग आहे, याचा विचार तो कधी करतच नाही. तुम्ही काय किंवा मी काय आपण सर्वांनी स्वतः पुरता आयुष्य मर्यादित न ठेवता, आपल्याला करण्यासारखे खूप असते.
              कधी वेळ मिळाला तर अनाथाश्रमात जाऊन शक्य ती मदत अनाथांना केली तर त्यांना मिळणाऱ्या आनंदातून माणसाला समाधान मिळू शकते. प्राणी मात्रांवर माणसाला भूतदया दाखवता आली पाहिजे, निसर्गाचा ऱ्हास कसा रोखू शकता येईल, या दृष्टीने माणसाने ठोस पाऊल उचलले पाहिजे, सर्वांशी माणुसकीने वागले पाहिजे.
           ह्यातील एक जरी गोष्ट आपण अंगिकारली तर स्वतः चं आयुष्य सुखाने जगण्या पलीकडेही आनंद देणारं खूप काही असतं, हे आपल्याला उमजून जाईल.

सौ. राजश्री सुहास जाधव.

            

       

            

       


Sunday, 17 October 2021

बेधुंद



जीवन जगता जगता खूप काही शिकले
कसे जाणावे नात्यांना हे अनुभवाने उमजले
स्वतःभोवती मी कुंपण नात्यांचे घातले
अन् बंधनात स्वतःच स्वतःला बांधले
अन् स्वातंत्र्याचे पंख माझे मीच छाटले
दुःख मनीचे ते खोल हृदयी साठवले
अमाप सोसले  कष्ट, नाही जगण्यास ते इष्ट
होऊनी बंधनातूनी मुक्त,विसरुनी सारे बंध
जगायचे आहे मला बेधुंद
अन् जीवनी फुलवावयाचा आहे  आनंद ......

सौ. राजश्री सुहास जाधव. ( काल्पनिक रचना )


प्रेमातुर....



विचारांचे मनात माजते काहूर
आहेस तू ही दूर, मी ही दूर
का येतो तरी भावनांना पूर ?
तू आकाशातील चंद्र
अन् मी अवनी वरील हूर
तू असे क्षितिज
अन् मी क्षितिजा पासून खूपच दूर
ओढ तुला भेटण्याची
करते मला मजबूर
नसावा कधीच तू
माझ्या पासून दूर
वाटते ती अनामिक हुरहूर
वेगळे नसे काहीच हे
मी तर असे प्रेमातुर 💞💞

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 16 October 2021

पुस्तक



निरक्षरास साक्षर करती पुस्तक
पुस्तकांपुढे व्हावे नतमस्तक
पुस्तक असती ज्ञानाचा अथांग सागर
अन् माहितीचे असती ते आगर
पुस्तके असती मानवाचा खरा मित्र
पुस्तकातुनी उमगते सकलांना
थोरा मोठ्यांचे चरित्र
पुस्तके देती प्रेरणा
अन् ध्येयाला नवी दिशा
पल्लवित करतात मनी आशा
ग्रंथ,पुराणे, संत साहित्य,
इतिहासाचा अमूल्य ठेवा
सहज प्राप्त होई मानवा
लेख, कथा, कविता,
कादंबऱ्यातुनी व्यक्त
होती भाव-भावना
ताण रहित करण्यास जीवना
पुस्तकेच येती कामा
वृध्दींगत होई शब्दसंपत्ती,
नवनविन संकल्पना,
पुस्तकातुनी लाभती जीवना
पुस्तकांशी करता मैत्री
मिळते सदोदित यशाची खात्री. 

सौ. राजश्री सुहास जाधव.


                       Google image


वेळ काही पुरत नाही....



रविवार असला तरी वेळ काही पुरत  नाही 🕛
आठवड्यातील कामे काही केल्या संपता संपत नाही 🕧
साफसफाई, झाडूपोछा, धुणी- भांडी 🕐
करता करता उसंत काही मिळत नाही 🕜
सकाळ, दुपार, संध्याकाळ 🕑
बनवावे काय खाण्यास  काही कळतच नाही 🕝
नको उपमा, नको पोहे 🕒
कर तू डोसा,इडली चटणी नाहीतर वडे 🕞
असते अशी मुलांची मागणी 🕓
मग कामाशी करून हात मिळवणी 🕟
पुरी करते त्यांची मागणी 🕔
आहे आज रविवार खास 🕠
तर जेवण बनव लज्जतदार 🕕
आदेश येता यजमानांचा 🕡
आखते बेत मग मिष्टान्नाचा 🕖
तृप्त होती सर्व आस्वाद घेऊनी भोजनाचा 🕢
मग करते विचार जरा वेळ लवंडण्याचा 🕗
तर फर्मान येते त्यांचे 🕣
मिळणार आहे का चहा मला?🕘
लागते  पुन्हा मग तयारीला 🕤
डोंगर उपसता उपसता कामाचा 🕙
ताकद काही उरत नाही 🕥
रविवार असला तरी वेळ काही पुरत नाही 🕚
रांधा वाढा उष्टी काढा 🕦
करता करता कसा पळाला वेळ ⏱️
हे कधीच मला उमजत नाही...⏲️

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 15 October 2021

वाचन प्रेरणा दिवस




भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा (१५ ऑक्टोबर १९३१ ) सर्व शाळा आणि महाविद्यालयांमधून ' वाचन प्रेरणा दिवस' म्हणून साजरा केला जातो.
       विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी हा या मागील महत्त्वाचा उद्देश आहे. शिक्षकांनी मुलांना अब्दुल कलामांची पुस्तके वाचून दाखवावीत, मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन मिळावे. त्यांचे प्रेरणादायक विचार मुलांपर्यंत पोहोचावे, वाचनपर विविध उपक्रम राबवावे, या करिता वाचन प्रेरणा दिवस साजरा केला जातो.
           पण फक्त हा एकच दिवस वाचनासाठी मर्यादित न राहता मुलांनी कलामांचे विचार, नित्य वाचन अंगीकारणे हे खूप महत्त्वाचे आहे. कारण वाचनाने शब्द संपत्तीत भर पडते. ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात. तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करते, स्वतः च्या आणि देशाच्या विकासासाठी वाचन हे खूप महत्त्वाचे असते. वाचनाने माणूस समृद्ध बनतो, क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे, तसे वाचनाविना शिक्षण व्यर्थ आहे. म्हणून कायम वाचनाची कास धरणे खूप गरजेचे आहे.
        भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम हे अतिशय संवेदनशील, साधे
राहणीमान पण उच्च विचारसरणीचे होते. त्यांचे बालपण हे अत्यंत कष्टात गेले होते. पण तरीही त्यांनी स्वतःला घडवत देशात विकास घडविण्याचे मोलाचे कार्य केले. युवकांना कायम प्रेरणा देणारे असे त्यांचे व्यक्तीमत्त्व होते.
मुलांचे आवडते शिक्षक होते.
       डॉक्टर कलाम हे विज्ञानाचे भोक्ते होते. त्यांना 'मिसाईल मॅन' ही उपाधी मिळाली होती.  'अग्नी ' या
क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे त्यांचे जगभरातून कौतुक झाले होते. पृथ्वी, अग्नीबाणाची निर्मिती त्यांनी केली होती.
         त्यांनी भारत देश कसा  प्रगत असावा यासाठी काही स्वप्ने पाहिली होती. त्यादृष्टीने त्यांनी वाटचालही केली होती.
      त्यांनी लिहिलेली ' इंडिया २०२० , विंग्ज फॉर फायर( अग्निपंख ) , ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनियम , टर्निंग पॉइंटस , माय जर्नी हा काव्यसंग्रह  इत्यादी पुस्तके त्यांची साऱ्यांना प्रेरणा देण्याचेच काम करतात.
      त्यांना' पद्मभूषण', 'पद्मविभूषण' , आणि २५ नोव्हेंबर १९९८ साली 'भारतरत्न ' हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.
      जीवनात यशस्वी होण्याचे  मंत्र डॉ.अब्दुल कलामांनी सांगितले होते ते  पुढील प्रमाणे : -
१) अपयश पचवायला शिका.
२) अभ्यासातून इप्सित ध्येयाची संकल्पना रेखाटा.
३) स्वतःशी प्रामाणिक राहा.
४) मर्यादांवर मात करा.
५) सतत शिकत राहा.
६) स्वतःसोबत इतरांनाही घडवा.
७) कामात एकाग्रता आणा.
८) स्वप्नांचा पाठलाग करा.
९) इतरांसाठी प्रेरणादायी बना.
त्यांचे विचार :-
  जर  सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे चटके सहन करावे लागतील.
  स्वप्न ते नाही जे आपण झोपेत पाहतो, स्वप्न ते आहेत जे आपल्याला झोपू देत नाही.
आपण  आपले भविष्य बदलू शकत नाही पण आपण आपल्या सवयी बदलू शकतो आणि
निश्चितच आपल्या सवयी आपले भविष्य बदलण्यास मदत करतील.

सौ. राजश्री सुहास जाधव.









 


त्या पल्याड

 



त्या पल्याड मला जायचं होतं
आणि स्वतःस आजमावून पाहायचं होतं
मनात  साचलेल्या तमास समूळ उपटायचं होतं
अन् आनंदाच्या पलीकडील,
परमोच्च आनंदास प्राप्त करायचं होतं
नात्यांच्या पलीकडील,
नात्यांस अलवार जपायाचं होतं
क्षितिजा पलीकडील,
क्षितिजास नेत्रांनी या पाहायचं होतं
यशाच्या पलीकडील,
अत्युच्च शिखरावर पोहोचायचं होतं
पण मनात नियतीच्या काही वेगळंच होतं
पाशात तिच्या मला जखडलं होतं
त्या पल्याड जायचं स्वप्न,
ते स्वप्नच राहिलं होतं.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


क्षण सुखाचा



सोन पावलांनी शुभ दिन तो आला दसरा
क्षणभर दुःखाला साऱ्यांनी हो विसरा
चौफेर वाहू दे आनंदाचा झरा
जीवनात फुलू दे आनंदाचा फुलोरा
दरवळीने तयांच्या व्यापू दे आसमंत सारा
क्षण सुखाचा जीवनात बहरुनी आला
आसुसलेल्या नेत्रांनी अनुभवेल तो सुख सोहळा .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 14 October 2021

आत्मसुख



माणूस जन्मास आल्यानंतर तो सुरुवातीस परावलंबी असतो. बाल्यावस्थेत त्याचे खूप लाड होतात,त्याला काय  हवे , नको ते पाहिले जाते. त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातात.
     पुढे हेच बालक जसे जसे मोठे होते तसे त्याच्यावर वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावर संस्कार घडतात. त्याला आवश्यक ते ज्ञान प्राप्त होते . पुढे समाजात  वावरताना त्याचा शैक्षणिक, बौद्धिक, आर्थिक , मानसिक
विकास झालेला असतो. आणि जीवनात  हवे ते त्याने
साध्यही केलेले असते. पण तरीही माणूस पूर्णपणे संतुष्ट असतो का?
          ह्याचे उत्तर नाही हेच येणार , कारण  मानसिक रित्या माणूस पूर्णपणे सक्षम झालेला नसतो. आपण
सारेच भौतिक सुखाच्या मागे धावत असतो. तेच खरे सुख
आहे, असे मानण्यात धन्य होत असतो . अशावेळी आपल्याला राग, लोभ, हेवेदावे ह्या गोष्टीचा सामना करावा लागतो, आणि आत्म आनंदाला आपण पारखे होतो.
        बाह्यतः सुख शोधताना , आपण आयुष्याचं गणित
आणखी अवघड करून ठेवतो. खरे सुख हे आपल्या अंतरी दडलेले आहे, हे कधी आपण ध्यानात घेत नाही.
       ज्यावेळेस आपल्याला हे कळून चुकेल की, देह, इच्छा, आकांक्षा, मत्सर ह्या बाह्य दिसणाऱ्या गोष्टी , कालांतराने नष्ट होणाऱ्या आहेत. आत्मा हाच निरंतर आहे, सत्य आहे. आत्मसुख हेच श्रेष्ठ आहे. तेव्हाच  माणूस स्वतःचा शोध घेण्यास यशस्वी होऊ शकतो.
ऐहिक सुखा मागे न धावता माणसाने अहंभाव सोडला तर आयुष्याचे गणित सोडवण्यास त्याला कसलीच अडचण येणार नाही.

सौ. राजश्री सुहास जाधव.


प्रितीचा छंद



छंदात छंद प्रितीचा छंद जडुनी मन हे मोहरते
गुंतुनी तुझ्यात  वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
त्या स्वप्नात येऊनी मनमीत होऊनी
घे करुनी मला तुझीच रे साजणी
तुझीच रे साजणी
अलवार  या मनावरी नाव तुझे कोरतना
वाटे मनासी मजला जणू मोरपीस ते फिरताना
ही प्रीत तुझी बेधुंद करी
न कधी मनासी ती आवरी
न कळे काय ते मनाला होते ?
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
झुरते मी तुझ्यासाठी , नाव तुझेच रे ओठी
तुझ्या प्रीतिचे आळविते गीत मी
माझ्या ओठी
गुंतुनी तुझ्यात वसे तू हृदयात
स्वप्नी तुलाच मी पाहते
त्या स्वप्नात येऊनी मनमीत होऊनी
घे करुनी मला तुझीच रे साजणी
तुझीच रे साजणी.....

राजश्री  सुहास जाधव.


Wednesday, 13 October 2021

आठवणी



हृदयीच्या खोल कोंदणात दडलेल्या असती आठवणी

सोबत नसली जरी, तरी निरंतर राहतात आठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी....

एकांती कातरवेळी मन जाते सैरभैर होऊनी

मग मोरपिसासम हळुवार स्पर्शूनी

जातात मनास आठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी...

गोड, कटू, सुखदायक, दुःखदायक, अन्

असह्य असती त्या आठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी...

आठवे मज बालपणीच्या गमतीजमती,

अन् आठवे मज शाळेतील भाबडी मैत्री ती

आठवे मज शाळेत भोगलेली शिक्षा ती

अन् आठवे मज पाठीवर मिळालेली

शाबासकीची थाप ती

आठवे मज पहिल्या प्रेमाची साद ती

अन् आठवे मायेची  हाक ती

जिवाभावाचे सोडूनी गेले जरी

नित्य राहती स्मरणात परी

असह्य होई जेव्हा आठवणी

मग करते तयांची पाठवणी

मनपटलातील आठवणींसवे रमते मी, रमते मी...

सौ. राजश्री सुहास जाधव.


आठवणी



सोपं असतं का आठवणींना हद्दपार करणं ?
जसं अवघड असतं श्वासाविना जगणं
आपुल्यासवे राहतात निरंतर त्या आठवणी
येता सय तयांची , जाते रमुनी तयात मी
डोहात आनंदाच्या तरंगते मी
आठवणींसवे जगते मी
मग का करावी तयाची पाठवणी ?
अवचित हुरहूर दाटते मनी
छळतात कधी कधी या आठवणी 
परी हृदयात केली मी तयांची साठवणी 
करणार नाही हद्दपार आठवणींना कधीच मी......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 12 October 2021

परी



होती एक परी
नाव तिचे शर्वरी
आवडे मुलांना ती भारी
जाई घेऊनी मुलांना जादुई नगरी
जादुई नगरीत होते इवलेसे दोन ठेंगू
नाव होते त्यांचे गंपू नि झंपू
गंपूकडे होता जादुई पावा
वाजविता तो, मंत्रमुग्ध होऊनी
मुले घेती त्याच्याकडे धावा
झंपूकडे होती जादुई चादर
बसवुनी मुलांना त्यावरी,
करती ते जादुई नगरीची सफर
जादुई नगरीत होते सारेच आगळे
पाहुनी ती जादुगरी अचंबित होती सगळे
जादुई नगरीत त्या रस्ते होते वर
अन् आकाश होते खाली
सूर्य होता रुपेरी अन् चंद्र तो सोनेरी
आकाशाच्या अंगणात विखुरल्या
चांदण्या त्या सोनेरी
रस्त्यावरच्या झाडांना चॉकलेट,
गोळ्या अन् बिस्किटांची फुले
घेण्यासाठी धडपडत होती मुले
फिरवुनी जादुई छडी
मग देई परी मुलांना खाऊची पुडी 
अशा तऱ्हेने मुलांना लागली
जादुई दुनियेची गोडी
जादुई नगरीची गंमत जंमत न्यारी
तुम्हीही करा एकदा, या दुनियेची सफारी......

सौ. राजश्री सुहास जाधव


Monday, 11 October 2021

ओळख स्वत्वाची.....

येतच नाही मला काही,
दुसऱ्यांवर प्रभाव पाडणे,
कदापि जमणार नाही,
बोलण्याचे चातुर्य
मज जवळ नाही,
भीती सदा ही
मनात राही
माझ्या मला मी
कधी ओळखलेच नाही 
क्षमतांना माझ्या
पारखलेच नाही
जवळच होते सर्वकाही
पण ओळखता मात्र
आले नाही
खरे पाहता, प्रत्येकात
सुप्त गुण दडलेले असती
होते त्याची प्रचिती
कधी ना कधी

सौ. राजश्री सुहास जाधव.

  


स्वप्नपूर्ती



धुके अज्ञानाचे विरुनी जावे
स्वप्न पहाटेचे सत्यात उतरावे
ज्ञानदीप ते दशदिशा उजळावे
गर्तेत अज्ञानाच्या न कोणी उरावे
शिकूनी, सवरुनी ज्ञान ते अवगत व्हावे
ध्येयांनाही मग पंख फुटावे
बळ ते सारे पंखात साठवावे
कवेत घेऊनी ध्येयांसी
स्वप्नपूर्तीकरिता सज्ज व्हावे
स्वकर्तृत्वावर स्वतः च्या ,
स्वप्न ते साकार करावे .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 10 October 2021

भाव कळेल का कोणास !



वैश्विक महामारीने घात साऱ्यांचा केला
शिक्षक आणिक विद्यार्थीही
त्यात होरपळून गेला
विद्यार्थ्यांविना ओस पडली शाळा
अन् ऑनलाईन शिक्षणाचा
प्रघात सुरू झाला
परी शिक्षणाला त्या मर्यादा आल्या
कसे परवडेल ऑनलाईन शिक्षण
एखाद्या गरीबाला ?....
ज्यासी भ्रांत पडे पोटापाण्याची
येणाऱ्या नित्य दिनाला
विद्यार्थी अन् शिक्षकांतील
संवाद तो विरला
विद्यार्थ्यांच्या बुद्धीचा
विकास  सारा खुंटला
करावा लागतो ऑनलाईन शिक्षणासाठी
पालकांचा पाठपुरावा
वाढला आहे विद्यार्थी
अन् शिक्षकांतील दुरावा
आजमितीला पर्याय नाही
ऑनलाईन शिक्षणाला
परी प्रत्यक्ष शिकवण्याची
सर नाही येणार त्याला
दोघांतील भाव कळेल का कोणा ?
घाव असे हा जीवघेणा.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 9 October 2021

विवेक




'विवेक' हा ५वी इयत्तेत शिकणारा मुलगा अत्यंत अबोल, नम्र असा आपल्या वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. वडिलांची बदली झाल्यामुळे गावाकडून शहरात तो त्याच्या आजी, आजोबा आणि वडिलांबरोबर राहण्यास आला होता. विवेकची आई, तो पाच
वर्षांचा असताना त्याला सोडून देवाघरी गेली होती. तेव्हा त्याचे आजी, आजोबा व बाबा हेच त्याचे विश्व होते.विवेक खूपच बुजरा होता. त्यामुळे आजीला त्याची नेहमी काळजी वाटत असे. आजी त्याला वेगवेगळ्या गोष्टी, किस्से सांगून बोलते करण्याचा प्रयत्न करत असे पण विवेक कधीच मनमोकळेपणाने बोलत, खेळत नसे.
        जेथे ते राहत होते ती सोसायटी छोटीच होती. त्यामुळे नविन कोणी राहण्यास आले की सर्वांना लगेच समजत असे. सोसायटी राहण्यास येऊन त्यांना आता महिना होऊन गेला होता. विवेकच्या आजीचा स्वभाव बोलका असल्याने त्यांची सोसायटी मधील लोकांशी
बऱ्यापैकी ओळख झाली होती. विवेक मात्र सोसायटी मधील मुलांबरोबर खेळण्यास जात नसे. तो फक्त त्यांच्या शेजारी राहणाऱ्या रोहित बरोबर बोलत असे, कधी कधी त्याच्याबरोबर खेळत असे.
        त्यांच्या सोसायटी जवळ असलेल्या शाळेत विवेकचे ॲडमिशन त्याच्या वडिलांनी केले होते. विवेक त्याच्या नविन मित्राबरोबर, रोहित बरोबर चालत शाळेत जात असे. तो नविन असल्याने त्याच्या वर्गातील काही आगाऊ मुले त्याला रोज त्रास देत असे. ती मुले कधी कधी विवेक मधल्या सुट्टीत खाली गेला की त्याचे दप्तर लपवून ठेवत असे, त्याचे पेन्सिल, खोडरबर दप्तरातून काढून
घेत असे. एकदा तर त्या मुलांनी विवेक हात धुण्यासाठी गेलेला असताना त्याचा सगळा डबा संपवून टाकला होता. मग रोहितने शिक्षकांना सांगितल्यावर शिक्षकांनी सर्व मुलांना चांगलेच खडसावले होते. तरी ही ती मुले   विवेकला कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देत असे. त्याला मुद्दाम मारून पळत असे. पण विवेक कधीच काही बोलत नसे किंवा घरीही आजीला काही सांगत नसे. ह्या गोष्टीचा रोहितला खूप रागही येत असे व वाईटही वाटत असे. तो विवेकला म्हणत असे,"विवेक तू  असा शांत असतो, त्या मुलांना काही बोलत नाही, शिक्षकांना ही त्या मुलांची तक्रार करत नाही.त्यामुळे ती मुले जास्तच त्रास देतात.तू कशाला  इतके सहन करतोस?" पण  विवेक काहीच न बोलता फक्त 'जाऊदे' इतकेच बोलत असे.
               गॅलरीमध्ये विवेकच्या आजीने कुंडीत टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, काही फुलांचीही रोपे लावली होती.
आजी तिथे पक्ष्यांसाठी पाणी, धान्य कधी चपातीचे तुकडे ठेवत असे. त्यामुळे त्यांच्या गॅलरीत चिमण्या, कावळे, कधी पारवे, पोपटही येत असे. त्यांना पाहण्यात विवेक खूप दंग होत असे. त्यांच्या गॅलरीत एक नर पोपट नेहमीच सकाळी सकाळी येत असे. तो पोपट विवेकला खूपच आवडत असे. तो त्याच्यासाठी आजीकडून मिरची, कधी धान्य, कधी पेरू घेऊन त्या पोपटास खाण्यास देत असे. त्या पोपटाची व विवेकची चांगलीच गट्टी जमली होती. आजीलाही त्यामुळे बरे वाटत असे. असेच एकदा नेहमी प्रमाणे विवेक त्या पोपटास भिजवलेली डाळ खाण्यास देत असतो तेव्हा अचानक एक बोका त्या पोपटावर झडप घालतो आणि त्याला तोंडात पकडून झाडावर जातो. विवेकला काहीच लक्षात येत नाही, तो आजीला मोठ्याने हाक मारतो अणि रडायला लागतो. आजी विवेकला रडण्याचे कारण विचारते तेव्हा विवेक रडत रडत सांगतो, " अगं आजी एका बोक्याने आपल्या पोपटाला तोंडात पकडून नेले. आता आपला पोपट मला कधीच दिसणार नाही." असे म्हणून विवेक आणखी मोठ्याने रडू लागतो. आजी त्याला समजावते व म्हणते  "हे बघ विवेक तो पोपट त्या बोक्यासमोर खूपच छोटा होता.त्याच्यात त्या बोक्याबरोबर लढण्याची ताकद नव्हती आणि म्हणूनच त्या बोक्याने त्याचा गैरफायदा घेतला आणि पोपटाला तो घेऊन गेला. तुला वाईट वाटत आहे, हे मला कळत आहे. तसेच तुला कोणी काही बोलले, किंवा शाळेतील मुलांनी तुला त्रास दिला तर आम्हालाही खूप वाईट वाटते. तू तर त्या पोपटापेक्षा खूप मोठा आहेस, हुशार आहेस तरी तू  त्या  मुलांचा त्रास निमूटपणे सहन करतोस. हे चुकीचे आहे." आजीचे हे बोलणे ऐकून विवेक मनातल्या मनात काहीतरी ठरवतो.
         दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे विवेक रोहित बरोबर शाळेत जातो. वर्गात शिरत असताना त्या आगाऊ मुलांपैकी एक मुलगा विवेकला ढकलणारच असतो पण विवेकच्या ते लक्षात येते. तो त्या मुलाचा हात घट्ट पकडतो आणि त्याला ताकीद देतो, "परत जर का असे केलेस तर मीही तुला ढकलील नाहीतर तुझे नाव आपल्या मॅडमना
सांगेल." त्याचे बोलणे ऐकून रोहित आणि बाकीची मुलेही चकित होतात. विवेक त्या दिवसापासून वर्गात सर्व मुलांबरोबर बोलू लागतो. वर्गातील मुलेही त्याला
त्रास देण्याचे बंद करतात. विवेक आता रोज शाळेतून घरी आला की आजी, आजोबांना शाळेतील गमती-जमती सांगत असे.

सौ. राजश्री सुहास जाधव.


आसक्ती



आसक्ती

प्रदर्शन दुःखाचे न वाटे मज करावेसे
दुःख मनीचे ठेविले मी खोल हृदयात
सदैव भाव हसरे ते दिसतील साक्षात
नाही वाटे मजला
सुख दुःखाची आसक्ती जीवनात
जिंकण्यास स्वतःस, जाणले ते मर्म
देह तो त्याज्य, आत्म स्वरूप असे कर्म
हेचि आहे जीवनातील अंतिम वर्म .......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 8 October 2021

शक्ती स्वरूपिणी



भक्ती तुझिया ठायी
वाहिन मी
निज रूप तुझे दावुनी
घे आम्हासी तारूनी
वंदन आमुचे तुझिया चरणी
तू दुर्गा, तू गौरी, तू जगदंबा
तू चंडी अन् तूच चामुंडा
आणिक तूच महिषासुर मर्दिनी
विनाश करण्या दुर्जनांचा
होई तू सौदामिनी
झालीस तू सावित्री
नारीसी दान विद्येचे देऊनी 
नवरात्रीचे नवरंग लेऊनी
गेल्या दशदिशा त्या उजळुनी
व्रत, वैकल्ये करुनी
लाभेल सौख्य जीवनी
जाईल धन-धान्याने कोठार ते भरुनी.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Thursday, 7 October 2021

आठवणीतील गाव




माझ्या आठवणीतील गाव दोंदे त्याचे नाव
घेते मनाचा ठाव, व्याकुळ होतो जीव
अन् घेते गावाकडे धाव

स्वच्छ, सुंदर छोटेसे माझे गाव
पवित्र भीमेच्या सहवासाने
जपले स्वतःचे नाव

गावात प्रवेशास आहे सुंदर असे द्वार
भासे जणू ते गावाचे शिलेदार

गावात असती मंदिरे खूप
वाटते मजला तयांचे अप्रूप

जातीपातीच्या नाहीत येथे भिंती
जपली जातात येथे आपुलकीने नातीगोती

विकासाची कास धरण्यास
मुलेबाळे परगावी जाती
तरी प्रामुख्याने व्यवसाय यांचा असे शेती

रामनवमीचा दिवस असतो खास
असतो त्यादिनी गावचा उरूस

उत्सवास मुले बाळे, बाया- बापडे सारे जमती
आनंदे नाचती गाती अन् दंग होऊनी जाती

श्रीरामास अर्पण केला जातो पुरणपोळीचा प्रसाद
पै पाहुणे येऊनी घेती तयाचा आस्वाद

जपले जातात बंध येथे रूढी अन् रिती-रिवाजांचे
अजूनही नववधूस केले जाते केळवण दूध-शेवयांचे

आठवण होता गावाची घेते मी तेथे धाव
माझ्या आठवणीतील गाव दोंदे त्याचे नाव
अन् घेते मनाचा ठाव

सौ. राजश्री सुहास जाधव.


काजवा



आहे मी इवलासा
स्वयंप्रकाशित काजवा
वाट दाविण्या इतरांसी,
जन्म माझा असावा
सान म्हणुनी
ना कोणी हिनावा
घ्यावी माझ्याकडुनी प्रेरणा
अंधारलेल्या खोल खाईत
अडकलेल्यांना,
दाविन मी मार्ग नवा 
असलो जरी इवलासा
दावितो प्रकाशाचा कवडसा
होईल मार्ग खुला साजेसा
असा मी इवलासा काजवा.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 6 October 2021

अंतरीचे सुख




दूरवर, आसपास , जे जे दिसे आपणास
सारे आहे नश्वर खास
परी निरंतर लागे मनी तयाचीच आस
अन् वेदनेचे डंख टोचे नाहक या जीवास
गुंतूनी घेई मानव स्वतःसी या मृगजळात
घेई धाव मग राग, लोभ आणिक मायेच्या जंजाळात
जणू भ्रमर तो जाई गुंतुनी त्या सुमनात
मग गवसेल कसे अंतरीचे सुख जीवनात?
लाभण्या अंतरीचे सुख, व्हावे अंतर्मुख
करावे नामस्मरण होऊनी ईश्वर सन्मुख .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


बकुळी



चांदण्यासम भासते नाजूक ती बकुळी

रंगाने असली जरी सावळी

परी सुवासिक सुगंधाने ती दरवळली

सुकूनही सुगंध देण्यास अवतरली भूवरी

संध्यासमयी पखरण होता फुलांची

भासते जणू अंगणी अवतरली नक्षीही नक्षत्रांची

अलवार ओंजळीत घेऊनी

सुगंध तो साठविता मनी

जातो घेऊनी रम्य त्या बालपणी

स्मरती अजूनही बकुळ फुलांवरील गाणी

स्वप्नी दिसे मग वेचिता फुले ती नाजूक सावळी

अर्पिते मी तया श्रीहरी चरणी सकळी

कृष्ण- राधेच्या प्रेमात रंगली ही बकुळी....

सौ. राजश्री सुहास जाधव.


स्वप्नांची पहाट



स्वप्नात एकदा मी जात होते अनोळखी वाटेने
सोबत नसे कोणीही चालत होते धीराने
निःशब्द होते सारे, भयभीत होत होते
माझ्याच पावलांच्या नादाने
कूस बदलली अचानक
त्या दिशाहिन वाऱ्याने
स्पर्शुनी गेली मजला
झुळूक ती अलवारपणे
मोहरूनी गेले सारे अंग
शीतल त्या वाऱ्याने
वाट पुढे ती चालता
मंजुळ स्वर ते कोकिळेचे,
अन् पक्ष्यांचे ते किलबिलने,
भ्रमरांचे ते गुंजारवने,
अन् मैनेचे ते गुणगुणने,
ऐकुनी मंत्रमुग्ध जाहले
अनुपम चित्र ते निसर्गाचे
मी माझ्या नेत्रांनी अनुभवले
मग होऊनी पाखरू
विहरत राहिले मी आकाशी
नसे तमा मग कशाची
इतुक्यात हाक ऐकू आली आईची
अन् दचकुनी जागी होऊनी
माघारी फिरले त्याच वाटेने
वाट पाहत स्वप्नांची नव्याने

सौ. राजश्री सुहास जाधव.


Tuesday, 5 October 2021

बालपणीची मैत्री




ती वेळ आठवणीत राहावी अशीच होती
शाळेतील मित्र - मैत्रिणींशी
बऱ्याच वर्षांनी गाठ - भेट झाली होती
बालपणीची मैत्री जी ह्रदयात साठवली होती
त्या मैत्रीला पुन्हा वाट मिळाली होती
गोष्ट ही मनासारखी घडली होती. . .

सौ.राजश्री सुहास जाधव


अपयश ही यशाची शिडी




प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात यश-अपयश हे येतच असते. ह्या ऊन-सावलीच्या खेळातूनच माणूस हा घडत असतो.
       अपयश हे कुठल्याही प्रकारचे असू शकते. कधी कधी माणसाला नोकरीत अपयश येते. माणूस एका जागी नोकरीत स्थैर्य प्राप्त करू शकत नाही, त्यामुळे तो निराश होतो, त्याचा आत्मविश्वास ढासळतो. कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळतात, किंवा एखादा मुलगा परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे अशा स्पर्धात्मक युगात मागे पडल्याने त्याचे मनोधैर्य खचू लागते. तसेच आताचा सर्वात महत्त्वाचा भेडसावणारा प्रश्न म्हणजे ' बेरोजगारी '. वाढत्या बेरोजगारीने तरुण पिढी नैराश्यात जाते. सतत होणाऱ्या लोकांच्या टीकेमुळे माणसाला अपयश पचवणे जड जाते आणि माणूस नैराश्यातून नको ते करून बसतो.
         ह्या येणाऱ्या अपयशाकडे आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून त्यातील असलेल्या त्रुटी कमी करण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. अपयशाच्या अनुभवातून शहाणपण घेऊन जिद्दीने पुन्हा जोमाने कष्ट करण्याची तयारी दर्शवली पाहिजे. कोणत्याही कामाची लाज न
बाळगता कठोर परिश्रम माणसाने घेतले पाहिजे. तरच अपयशाकडून यशाकडे जाण्याची वाटचाल सुकर होऊ शकते. माणूस अपयशाच्या खोल दरीतून तावून सुलाखून बाहेर येऊ शकतो.
        यश मिळवण्यासाठी माणसाने धीर, संयम बाळगला पाहिजे. आजच्या या नव्या युगात प्रत्येकालाच यश हवे असते पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी माणसाची नसते. माणसाला झटपट यश हवे असते. कमी श्रमात जास्त फायदा माणसाला हवा असतो. मग त्याकरिता तो चुकीच्या मार्गाचाही अवलंब करतो. अशा मार्गाने मिळणारे यश हे अल्पकाळ टिकणारे, मनात असंतोष निर्माण करणारे असेच असते.
        मिळणाऱ्या यशाने हुरळूनही जाऊ नये. आपले पाय घट्ट जमिनीवर रोवलेले पाहिजे. यशाची एक एक पायरी वर चढताना स्वतःचा मानसन्मान, नैतिकता न सोडता आत्मविश्वासाने यशाचे शिखर गाठले पाहिजे. जीवनात या आपल्याला, पडू दे उजेड यशाचा.
उ - उठा
जे - जेते व्हा.
ड - डगमगू नका.

सौ.राजश्री सुहास जाधव.


Monday, 4 October 2021

प्रयत्न सच्चे



प्रयत्न असावे ते सच्चे
वाम मार्ग ते असे कच्चे
वाटेवरूनी त्या जाता
झेलावे लागतील अवमानाचे चटके
गवसेल समाधानही ते लटके
म्हणुनी प्रयत्न करावे ते शुद्ध
असे जे अविश्वसनीय ते करावे निषिद्ध
मग संतुष्टतेने व्यापुनी जाईल चित्त
अन् वाटे मनासी आळवावे सुमधुर गीत ........

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 3 October 2021

जबाबदारी



दिवा म्हणे वातीला
देशील ना साथ मला
वात म्हणे कापसाला
सामावून घेशील ना तुझ्यात मला
कापूस म्हणे झाडाला
रुजवशील ना पुन्हा एकदा मला
झाड म्हणे माणसाला
सांभाळशील ना रे नीट मला
माणूस म्हणे ईश्वराला
हे ईश्वरा, सुखी ठेवशील ना रे मला
ईश्वर म्हणे माणसाला
हे मानवा, स्त्रीची पिळवणूक,हिंसाचार
भ्रष्टाचार, अराजकता सारे थांबवून
पेलशील जर या जबाबदारीला
तरच सुखी ठेवीन तुला.

सौ. राजश्री सुहास जाधव.


अनामिक नाते

 


 

शोधून पाहिले होते, 
ते मला गवसले होते
ते अनामिक नाते
माझे माझ्या मनाशी होते
सैरभैर होणाऱ्या मनाला
माझ्या थोपवित होते
अन् सहज, सुंदर
भावनांना फुलवित होते
लेखणीतुनी माझ्या ते
हळुवार, पानावर उमटत होते
नाते माझे माझ्या मनाशी
ते आणखीन दृढ होत होते 
अनामिक ते नाते
स्रोत जणू प्रेरणेचा होते
कुपीत हृदयाच्या मी
जपुनी ठेवले होते 

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 2 October 2021

पक्ष्यांची मैफिल



चिऊ, काऊ, राघू, मैना
पारवा अन् कोकिळ
रंगली साऱ्या पक्ष्यांची
एकदा सुरेल  मैफिल
गाण्यासाठी सारे
झाले होते सामील
देऊनी कोकिळेस पहिला मान
सुरुवात झाली मैफिलीची छान
घेतली कोकिळेने सुंदर तान
गाऊ लागली कोकिळा कुहू कूहू
संगतीने तिच्या राघू-मैनाही लागले गाऊ
आपणही त्यांच्यासवे सुरेल गीत गाऊ
वाटे त्या चिऊ, म्हणुनी करू लागली चिवचिव
न जमले  गाण्याचे सूर,
म्हणुनी साऱ्यांना येई चिऊची कीव
थांबवुनी त्या चिऊस,
गाऊ लागला पारवा गुटूर गू गुटूर गू ...
थांबवुनी त्यास म्हणाला काऊ,
तुझ्यासवे मीही गातो रे भाऊ
अन् कर्कश कावकाव करू लागला काऊ
रंगलेल्या मैफिलीचा बेरंग करुनी
गालातल्या गाली हसू लागला काऊ
न आवडूनी वागणे काऊचे
घेतली कट्टी साऱ्यांनी काऊशी
अन् रंगलेल्या मैफिलीस
दिली सुट्टी त्या दिवशी .........

सौ. राजश्री सुहास जाधव.


Friday, 1 October 2021

जास्वंदी



आहे मी मनमोहक अन् विविध रंगी
अशी मी जास्वंदी
गुलाबी,नारिंगी,पीत, श्वेत, अन् रक्त वर्ण
छटा या मोहविती किती !
श्रीगणेशाची असे मी आवडती
माझ्याविना असे अपुरी भक्ती
पर्ण, पाकळ्या, देठ सारेच
माझे गुणकारी
उपयोगात आणते हर एक नारी
उठून दिसते मी
श्री गजाननाच्या मस्तकावरी.....


सौ. राजश्री सुहास जाधव.


जग स्वतःसाठी.....




उठ रे बंदा 

अन् तोच धंदा

चालू असे सदा

कामे ती पाचवीला पुजली
स्त्रियांच्या सदासर्वदा
घरदार, नोकरी-चाकरी,
मुल-बाळ, त्यांचा सांभाळ,
दळण-कांडण, कामे ती हजार
तारेवरची कसरतच असते फार
केरवारा, सगा-सोयरा करता करता
होतो जीव घाबरा-घुबरा
येतो मग साऱ्याचा तिटकारा
अन् शोधू लागतो सुखाचा किनारा
' बास झालं...थांबावं आता,
जग तू स्वतःकरिता '
मिळे तो मनाला इशारा
मग होते सज्ज अन्
जगते स्वच्छंद,
हर एक क्षण सारा.....

सौ. राजश्री सुहास जाधव.


भाव ते न्यारे....



भाव ते खुलूनी दिसे न्यारे
लोभस मुखचंद्रमा
भुलवी मनासी रे
भाव ते हसरे
करी हर्षाची पखरण रे
भाव ते लडिवाळ
होई प्रीत ती मधाळ
भाव ते अवखळ
जणू झरणारा निर्झर
घालीसी मनासी भुरळ
भाव ते रुसरे
जणू काटे गुलाबाचे बोचरे
भाव ते आक्रंदलेले देखता
होई जीवाची घालमेल रे
भाव हे तुझे
सप्तरंगी इंद्रधनुसम प्रकटती
क्षणात अवतरती अन्
क्षणात लोपती
बदलती ते रंग किती !
परी तुझीच आस असे चित्ती 
रूप तुझे साजिरे मनासी मोहविती 

सौ. राजश्री सुहास जाधव.


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...