Thursday, 28 April 2022
माझ्यातील मी
गझल १७, लेक
Tuesday, 26 April 2022
अलंकार
Friday, 22 April 2022
आतुरता
Thursday, 21 April 2022
जाणीव सत्याची
Wednesday, 20 April 2022
नव्याने भेटले मला
Tuesday, 19 April 2022
भविष्य आपुले..
केली जरी पृष्ठांवर उत्तरे चिन्हांकित
त्यासाठी करावे लागते अध्ययन स्वयंप्रेरीत
अन् असले जरी भविष्य आपुले अधोरेखीत
परी स्वकष्टाने भविष्य घडविणे,
हेच खरे आहे आपुले संचित
का अवलंबून राहावे भविष्यावर ?
असेल जर प्रेम आपुले जीवनावर
तर ठेवावा विश्वास स्वतःवर ,
अन् जगावे स्वबळावर
करावे कर्म नेकीने, अन् लढावे जिद्दीने
नसावे मिंधे कधीही, जगावे स्वाभिमानाने
हुरळून जाऊ नये यशाने
अन् खचून जाऊ नये अपयशाने
दिले जरी संकेत भविष्याने असावे निडर मनाने
आहे आपुल्याच हातात आपुले भविष्य घडविणे......
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 18 April 2022
एकतर्फी प्रेम
Friday, 15 April 2022
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
मनातील डायरीचे पान🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :-
व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
'प्रवृत्ती' म्हणजे स्वभाव, माणसाच्या वागण्याच्या तऱ्हा. जन्मास येणारा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचे काही ना काही वेगळेपण, वैशिष्ट्य असते. त्याच्या त्या स्वभावाने तर त्याच्या व्यक्तिमत्वाची चांगली किंवा वाईट छाप पडत असते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादी घटना घडलेली पाहून तिथे असणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या घटने संदर्भात निरनिराळे तर्क वितर्क लावते. एखादा त्या घटनेविषयी हळहळ व्यक्त करील, तर एखादा त्याकडे दुर्लक्ष करील, तर एखादा त्या घटनेची खोलात जाऊन चौकशी करील, तर एखादा ती घटना पाहून घाबरून जाईल. असे माणसाचे स्वभाव असतात, वागण्याच्या तऱ्हा ह्या
तो त्याच्या सोयीनुसार बदलत असतो, जरी मूळ स्वभाव कसाही असला तरी.
एखादी व्यक्ती ही अतिशय बडबडी असते, तर एखादी एकदम अबोल,भिडस्त स्वभावाची असते. एखादा चटकन राग व्यक्त करतो तर एखादा माणूस तो मनातच ठेवतो.काहींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो तर काही व्यक्ती ह्या सतत नकारात्मकच विचार करत राहतात. काही व्यक्तींना बिनधास्त आयुष्य जगणे पसंद असते, तर काही व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरत असते. अशी एकंदर भिन्न स्वभावाची माणसे आपल्या अवतभोवती सतत असतात. त्यांच्याशी आपल्याला
जुळवून घेता आले पाहिजे. भिन्न स्वभाव असेल तर आपसांत खटके उडू शकतात पण जर नाते टिकवायचे असेल तर स्वतःच्या अहंभावास बाजूला सारून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले, त्याच्या विचारांना समजून घेतले तर नाते टिकू शकते.
माणसाचा स्थायी स्वभाव हा कधी बदलत नाही परंतु त्याच्या व्यक्तिमत्त्वात प्रयत्न केले तर नक्कीच बदल घडू शकतात. एखाद्या व्यक्तीस लहानपणापासून जर चोरी करायची सवय असेल पण त्याने मनाचा निग्रह केला, चांगले विचार जर सतत त्याच्या मनावर बिंबवले गेले तर त्या माणसाची सवय ही नक्कीच जाऊ शकते.
कधी कधी माणसे मुखवटे धारण करून जगात वावरत असतात. त्या मुखवट्यामागील खरा चेहरा ओळखायचा असेल तर त्या माणसाशी आपणास जमवून घेतले पाहिजे, त्याच्या अंतरंगात डोकावता आले पाहिजे. तर खरा माणूस काय आहे ते आपणास समजून जाईल.
माणसाचा स्वभाव हा काहीवेळेस तात्काळ समजून जातो तर कधी कधी माणसाच्या स्वभावाचा थांगही लागत नाही कारण माणूस हा त्याचे वागणे हे परिस्थितीनुरूप बदलत असतो. हे जरी खरे असले तरी मूळ स्वभाव हा मात्र तसाच खोलवर रुजलेला असतो.
'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
माणसाच्या स्थायी किती
जुळवूनी घेतले जर परस्परांशी
चिरंतन राहतील ती नाती' .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Tuesday, 12 April 2022
गझल :-१८
ती कळी...
मोजताना फुले बागेतली
एक कळी खुदकन हसली
देखुनी त्या कळीस,
मनात अलवार भावना जागली
मोहक तिचे रूप ,
साठवले मी डोळ्यांत
केव्हा खुलेल कळी ती फुलात ?
उमटले सहज भाव ते अंतरंगात ....
दडली होती जरी ती पानाआड
न होऊ दिले तिस मी नजरेआड
आला हळुवार एक कवडसा किरणाचा
स्पर्शून त्या कळीस, केले प्रेम जीवापाड
अन् झाले कळीचे फूल क्षणात
पाहुनी त्या आविष्कारासी,
भिणला आनंद रोमारोमात ....
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 11 April 2022
सोबती
Saturday, 9 April 2022
बापाच्या मनाची व्यथा..
मनातील डायरीचे पान 🌿🌿:- अंतर्गत विषय:-
बापाच्या मनाची व्यथा :-
आई म्हटले की एक वात्सल्य मूर्ती समोर येते कारण घराला घरपण तिच्यामुळे येते आणि वडील म्हटले की एक शिस्तप्रिय, कठोर व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते. जणू आपण ते गृहितच धरलेले असते. पण एका बापालाही तितकेच हळवे मन असू शकते जितके एखाद्या स्त्रीचे असते. पुरुषांनी रडलेले हे मात्र फारसे कुणाला रुचत नाही. जर त्याच्याकडून तसे झाले तर त्याला नावं ठेवली जातात. का, त्याला रडण्याचा हक्क नाही का ? कितीही आघात झाले तरी त्याने ते आतल्या आत सहन करणे योग्य आहे का ? साऱ्यांना खंबीरपणे साथ देणे
एवढेच त्याचे कर्तव्य आहे का ? त्यालाही त्याच्या आवडी निवडी प्रमाणे हवे ते घेण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा अवधी नको का? हे प्रश्न खरोखर एकदा जाणून
घेतले तर पुरुषांच्या मनाची व्यथा सहज लक्षात येईल.
एक स्त्री घरासाठी जितकी राबते, तितकेच एक पुरुष बाहेरील सर्व जबाबदारी नेटाने पेलतो. आयुष्यभर घरासाठी झटत असतो. बाहेर जाऊन, पडेल ते काम करून, प्रसंगी वरिष्ठांकडून होणारा अपमान सहन करून तो पैसे मिळवतो आणि घरातील सर्वांच्या गरजा भागवत असतो. तो कमावून आणून देतो म्हणून घरातील स्त्री सगळ्यांसाठी खाण्यास बनवू शकते. त्याला होणारा त्रास तो कधी दाखवत नाही .खरे तर जास्त मानसिक त्रास हा
पुरुषच सहन करत असतो. स्त्री रडून, दुसऱ्याशी बोलून स्वतःचे दुःख हलके करते पण पुरुष मात्र रात्री झोपताना छताकडे पाहून, कधी शून्यात नजर लावून बसलेला बऱ्याच जणांनी पाहिले असेल. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्याची घडी कशी नीट बसेल, महिना संपत आला की, खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न, हे सारे प्रश्न उभे ठाकलेले असतात. तो कधी ते बोलून दाखवत नाही.
एक वडील म्हणून ते मुलांना चांगल्या शाळेत घालतात भले त्यांची ऐपत नसेल तरीही आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेतले पाहिजे याकरिता ते कर्ज काढून, मोठ्या कष्टाने मुलांना शिकण्यास प्रोत्साहन देत असतात. त्यांना हवे ते खाणे, पिणे, कपडालत्ता, सर्वांच्या सुखाचा एक वडील आधी विचार करतात. बायको, मुलांसाठी हवं ते खरेदी करतील पण स्वतः मात्र कधी काही घेत नाही. मुलांना महागडे मोबाईल खरेदी करून देतील, त्यांना हवे तेव्हा पैसे देतील , स्वतः मात्र काटकसर करून जगतील. बहुतेक असेच चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. आपण मदर्स डे जितका दणक्यात साजरा करतो तितका फादर्स डे साजरा करत नाही. हेही तितकेच खरे आहे. आईच्या वात्सल्याचे नेहमीच कौतुक होत असते पण वडीलही आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमाविषयी मात्र एवढे एवढे बोलले जात नाही. वडील हे कायम दुर्लक्षित राहतात.
मोठ्या मोठ्या संकटांना धीराने पेलणारा, दीपस्तंभासम असतो एक बाप. त्याच्या मनाची व्यथा जर समजून घेतली तर आणखी दहा हत्तीचे बळ त्याच्यात संचारेल व कोणतेही संकट तो सहज पार करील.
मी माझ्या वडिलांवर एक कविता लिहिली आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यांच्या प्रेमाला कसलीच तोड नाही.
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
लावला जीव अपार आम्हां लेकरांवरी
पाहत आले मी बालपणापासुनी
सांभाळले आम्हांस तळ हाताच्या फोडापरी.....
नसे कसलेच व्यसन अन् सवयी
असे त्यांची साधी अन् सरळ राहणी
आहेत ते प्रेमळ अन् सुंदर विचारांचे धनी
हीच दिली आम्हा मुलांना शिकवणी.....
येता अनंत अडचणी,
जाणवू न दिल्या आम्हाला कधी
पेलत राहिले एकटेच आपल्या बाहुवरी
पाहिले साऱ्यांचे सुख आधी .....
सर्वांचे सर्व केले, ज्याला त्याला मार्गी लावले
परिस्थितीशी दोन हात त्यांनीच केले
नाही ठेवली अपेक्षा कोणाकडूनही,
न जगता स्वतःसाठी, आम्हा मुलांसाठी झिजले ......
पोहोचू दिली नाही कधीच आम्हास झळ
होते जणू अंगात त्यांच्या,
दहा हत्तींचे बळ
ओढत राहिले संसाराचा गाडा
सोसूनी अंतरी वेदनेची कळ ....
अजूनही माहेरी गेल्यावरी,
हवे काय, काय नको मज पाहतात सर्वतोपरी
भासू न देती यत्किंचतही उणीव मातेची
जणू घेतलाय जन्म लेकरांसाठीच त्यांनी भूवरी .....
सदैव काळजी असते आम्हा लेकरांची
बसवण्यास घडी प्रपंचाची,
परिश्रमासवे असते जोड त्यांच्या आर्थिक धोरणांची
कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल सावली जणू आभाळाची.....
थकले असती आता जरी
सळसळते चैतन्य असे तरुणापरी
त्यांच्या आचार-विचारांची,
जपली आहे शिदोरी अंतरी.....
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
सदैव राहिल ऋणी त्यांची मी
करते मी ईश्वरचरणी विनवणी,
लाभो मज हेच पिता जन्मोजन्मी...... 💐💐🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Thursday, 7 April 2022
अंतर्मन (आत्मपरीक्षण)
मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿:- अंतर्गत विषय
अंतर्मन ( आत्मपरीक्षण )
'पाहिलं जर अंतर्मनात डोकावून,
खूपकाही जाल सहज उमजून
प्राप्त करण्यास आत्मसुख,
ओळखावे स्वतःस आत्मचिंतनातून'....
जीवन जगत असताना, माणूस स्वतःच्या 'मी'पणात इतका गुरफटलेला असतो की तो कधी स्वतःचं आत्मपरीक्षण करतच नाही. खरे तर बाह्यमन आणि अंतर्मन ही मनाचीच रूपे आहेत. आपण जे विचार सतत करत असतो तेच कुठेतरी अंतर्मनात खोलवर रुजतात आणि नंतर ते स्वीकारून बाह्य मनाद्वारे बाहेर पडतात.
जर आपले विचार हे सकारात्मक, विनयशील असतील तर जीवनात आपल्याला ऊर्जा, यश हे हमखास मिळते. पण आपण अंतर्मनात सतत नकारात्मक, आत्मघातकी, वाईट विचार करत राहिलो तर मग जीवनात तसेच घडत जाते, अपयश पदरी पडते. जीवन नैराश्याने ग्रासले जाते.
म्हणून स्वतःचे अंतर्मन हे सदैव निकोप ठेवा कारण अंतर्मन हे वाईट, चांगले दोन्हीही स्वीकारत असते, तेव्हा अंतर्मनावर जेवढे चांगले विचार बिंबवता येतील तितके बिंबवा.
माणूस दुसऱ्यांचे दोष काढण्यात कायम तत्पर असतो. 'हम करे सो कायदा' अशीच त्याची वृत्ती असते. त्याला स्वतःचेच म्हणणे खरे करायचे असते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून, समजून घेण्याची त्याची वृत्तीच नसते. कधी
कधी समोरच्या व्यक्तीचेही बरोबर असू शकते. ही गोष्ट कधी आपल्या लक्षातच येत नाही. दुसऱ्यांच्या मतासही तितकेच महत्त्व द्या जितकं तुमच्या मतास इतरांनी
द्यावे, असे आपणास वाटत असते.
स्वतःच स्वतःला आधी ओळखण्यास शिकले पाहिजे. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असू शकत नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्यास शिका. स्वतःमधील
राग, मत्सर हे दूर सारून जर आत्मचिंतन केले तर मनास एक वेगळेच समाधान प्राप्त होऊ शकते. कारण जर आपण आपल्या आत डोकावून पाहिले तर तिथे सर्वात
जास्त दुसऱ्या विषयी असूया, तिरस्कारच आपल्याला आढळून येईल. ही मनात साठलेली जळमटे फेकून देऊन मन हे सद्विचाराने भरले पाहिजे. आत्मपरीक्षणाणे माणूस स्वतःची चूक मान्य करू शकतो, दुसरे जर चुकले असतील तर त्यांस मोठ्या मनाने माफ करू शकतो.
आणि ह्यामुळे परस्परांची नातीही दृढ होण्यासाठी मदत होते. नात्यात कोणताही दुरावा निर्माण होऊ शकत नाही.
आत्मपरीक्षण करण्याने माणसाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते. स्वतःतील गुण, दोष सहज लक्षात येतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासास आत्मपरीक्षण हे मोलाचे काम करते. स्वतःस कशाची आवड आहे, कोणती गोष्ट आपण सहज करू शकतो, हे जर ओळखता आले तर जीवनात माणसाला यश हे नक्कीच मिळू शकते. करिअर घडविण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण हे करताच आले पाहिजे. इतर सांगतात म्हणून आपण त्याच वाटेने जाणे हे कितपत योग्य आहे? त्यापेक्षा स्वतःतील गुण शोधा, कोणते काम तुम्ही जास्त आवडीने आणि योग्य रित्या करू शकता, कोणत्या गोष्टीत आपली रुची आहे , हे जर माणसाने जाणले तर त्यास यश हे हमखास मिळणार, यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे दुसऱ्यास काय वाटेल ? याची चिंता करत बसू नका, तुमचे मन काय सांगते , त्याचा आधी विचार करा. कधी कधी नाही म्हणण्यास शिका कारण लोक गैरफायदा घेण्यास टपूनच बसलेले असतात.
माझ्या बुद्धीला जे उमगले ते विचार इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास
क्षमस्व.🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿
सौ. राजश्री सुहास जाधव.
Monday, 4 April 2022
रहस्यमय जीवन
Friday, 1 April 2022
गझल:- २०
ध्येयासक्त..
बोनस
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
-
सत्ता, संपत्तीच्या हव्यासापायी मनुष्य रचतो कूटनीति त्यातुनी नाना समस्या त्या उद्भवती स्वार्थापोटी त्यांच्या, निरपराध ते होरपळती शोषण क...
-
बोनस : आजकाल माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...
-
नाते मग ते कोणतेही असो , बहिण भावाचे, आई वडिलांचे , पती पत्नीचे, मित्र मैत्रिणींचे , प्रियकर प्रेयसीचे ; त्या नात्यांना जर जखडून ठेवले तर मग...