Thursday, 28 April 2022

माझ्यातील मी

बऱ्याचदा माझ्याच मी ला शोधत असते 
नित्य ह्या मनाच्या लपाछपीत हरवून जाते
भासते कधी अंतर्मुख तरी कधी निर्विकार, 
कशी आहे मी ? माझेच मला न गवसते .....

कधी होऊनी जाते खूपच चंचल, 
उमटती मनात भावना त्या तरल 
कधी होऊनी जाते खूपच संयमी, 
अन् आखते धोरण साचेबद्ध जीवनी.....

खरेच माझ्यातील मीस पाहायचे आहे शोधून!
अहंकार, दुजाभाव, कपट अन्  लोभासी त्याज्य करून 
जमेल का मला ह्या साऱ्यांना वगळून?,
महत प्रयासाने होईल साध्य, सांगते मी मनास बजावून....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

गझल १७, लेक

आनंदकंद वृत्त :- मात्रा २४

का भेद हा मुलीने झेलायचा कळेना 
इथल्या समानतेशी संबंधही जुळेना ...

जन्मास लेक आली हा काय दोष माथी 
का भोग हे तिच्या रे नशिबी कसे टळेना ...

ध्येयास पंख द्यावे देऊन तिस दुजोरा 
का भाव मानवाच्या हृदयात तो रुळेना ...

गोठून आज गेल्या  साऱ्याच वेदना त्या 
डोळ्यांत आसवांची का धार ही गळेना ...

जखडून बंधनाची का घालतात बेडी 
का बेगड्या रिती या जळताच रे जळेना ...

सौ. राजश्री सुहास जाधव.

Tuesday, 26 April 2022

अलंकार

अलंकार 
स्त्रीच्या सौंदर्यात भर घालणारे, स्त्रियांच्या अगदी आवडीचा आणि अविभाज्य घटक म्हणजे वेगवेगळे अलंकार. जे घालून मिरवण्यास स्त्रियांना अतिशय आवडते.चार चौघीत आपले कौतुक व्हावे, सगळ्यांत
आपण उठून दिसावे ही त्या मागची भावना असते. 
            फार पूर्वीपासून स्त्रियांच्या जीवनात दागिन्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे आणि सोन्याचे वा चांदीचे दागिने घालणे हे आरोग्य दृष्ट्याही चांगले असते. स्त्री काय किंवा पुरुष काय दोघेही त्याचा वापर करतात. 
हे धातू शरीरातील उष्णता कमी करतात. शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यास त्याने मदतही होते. हे सर्व जरी खरे असले तरी आजच्या युगात असे दागिने घालून मिरवणे धोकादायकही आहे. या दागिन्यांपायी कधी कधी जीवासही मुकावे लागते. ज्याची ऐपत नसते ते लोक मग खोटे दागिनेही घालतात आणि त्यात समाधान मानतात. पण कधी कधी असे खोटे अलंकार शरीरास घातक 
ठरतात. 
            जसजसा काळ बदलला गेला तसे मुलींमध्ये दागिने वापरण्याची क्रेझ पूर्वीपेक्षा कमी झाली आहे आणि त्यामागे तथ्यही आहे. हे सगळे जरी खरे असले तरी दागिने हाच खरा अलंकार आहे का? त्यानेच फक्त स्त्रीचे सौंदर्य खुलून येते का ? तर नाही, माणसाचे मन हे निर्मळ असले पाहिजे, त्याच्यामध्ये सद्भाव असला पाहिजे, स्वतःच्या आरोग्याविषयी माणूस जागरूक असला पाहिजे. तेव्हाच तो खरा माणसाच्या आयुष्यातील अलंकार ठरेल आणि त्याच्या मनाच्या सौंदर्याला सोन्याप्रमाणे झळाळी येईल. तोच दागिना माणसाला खरा शोभून दिसतो आणि आजन्म तो त्याच्याबरोबर राहतो.  बाह्य सौंदर्यापेक्षा अंतरंग माणसाचे जर निर्मळ असतील तर कृत्रिम अलंकारांची त्याला गरज भासत नाही. लोकांच्या मनावरही अशीच माणसे अधिराज्य करू शकतात. या सर्व गुणां बरोबर माणसात कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे, काहीतरी करून दाखवण्याची धमक माणसाच्या अंगी असली पाहिजे तेव्हा हेच सर्व अलंकार त्याच्या देहावर शोभून दिसतील. माणूस खऱ्या अर्थाने जीवनात यशस्वी होऊ शकेल.
        बाह्य अलंकार घालून कोणी सुंदर दिसू शकत नाही त्यापेक्षा माणसाचे मन हे शुद्ध असेल तर  तो खरा सुंदर. यावरून एक गोष्ट आठवली चला तर मग वाचूया गोष्ट.....
           फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे ही. एका राज्यात एक राजा आणि राणी, त्याच्या राजपुत्रासह राहत होती. राजाचे त्याच्या प्रजेवर अतिशय प्रेम होते. एक प्रेमळ राजा म्हणून त्याचा नावलौकिक होता. सर्व प्रजा त्याच्या राज्यात गुण्यागोविंदाने नांदत होती. तरीही राजा,राणी दोघेही दुःखी होते. त्यांच्या दुःखाचे कारण म्हणजे त्यांचा वयात आलेला राजपुत्र लग्न करण्यास नकार देत होता.
राजा, राणीनं खूप समजावूनही त्याला काही पटत नव्हते. शेवटी राणीने जेव्हा अन्न त्याग  करायचे राजपुत्रास सांगितले तेव्हा कुठे राजपुत्राने विवाह करण्यास संमती दर्शवली पण त्याने एक अट घातली. राजा, राणीनेही त्याची अट मान्य केली. ते दोघे अत्यंत खूश झाले. राजपुत्राची अट अशी होती की, 'जी मुलगी सर्वात सुंदर,
जिचे हात सर्वात सुंदर असतील अशा मुलीशीच मी लग्न करणार.'
          साऱ्या राज्यात राजाच्या आज्ञेनुसार दवंडी पिटवली गेली, 'जी मुलगी सर्वात सुंदर, जिचे हात सर्वांत सुंदर अशा राजकन्येशी राजपुत्र विवाह करील.' ही वार्ता सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. आजूबाजूच्या राज्यातही ही बातमी समजली. जो तो राजा त्याच्या राजकन्येचा विवाह
राजपुत्राशी व्हावा ही इच्छा बाळगून त्यानुसार तयारी करू लागला. 
           अखेर तो दिवस उजाडतो ज्या दिवशी राजपुत्र त्या मुलीची निवड करून तिच्याशी विवाह करणार असतो. दूर दूर राज्यातून अनेक राजे त्यांच्या राजकन्येस घेऊन दरबारात हजर होतात. एकाहून एक सुंदर अशा मुली त्या दरबारात हजर असतात. सर्वांनी उंची वस्त्र, सोन्या,मोत्याचे अलंकार घातल्याने त्या सर्वच राजकन्या अतिशय सुदंर दिसत होत्या. तसेच आपण आणखी सुदंर 
कशा प्रकारे दिसू याची त्या राजकन्या काळजी घेत होत्या. काहींनी त्यांच्या हाताचे सौंदर्य खुलून यावे म्हणून हातावर सुंदर मेहंदी काढली होती, कोणी अतिशय सुंदर कला कुसर असलेले कंगण हातात घातले होते, कोणी रत्नजडित बांगड्या हातात घातल्या होत्या, जेणेकरून राजपुत्र आपलीच निवड करील  असे त्यांना वाटत होते.
           राजाच्या त्याच राज्यात एक शेतकरी राहत होता. त्याला एक मुलगी होती. अतिशय मनमिळाऊ आणि सुशील अशी स्वभावाने होती. तिचेही लग्नाचे वय झाले होते. शेतकऱ्यास वाटते, जर राजपुत्राने आपल्या मुलीस पसंद केले तर किती भाग्याची गोष्ट असेल.  तो तसे त्याच्या मुलीस सांगतो. शेतकऱ्याच्या मुलीस ते पटत नाही. ती काहीच न बोलता नेहमीप्रमाणे वडिलांबरोबर शेतात काम करण्यास जाते, त्याआधी ती घरात असलेल्या तिच्या आजारी आईला हवं ते सर्व बघते. शेतकरी त्याच्या मुलीस गळ घालतो की 'निदान तो सोहळा पाहण्यास आपण शेतातील काम संपले की जाऊया.' शेतकऱ्याच्या मुलीला वडिलांचे मन मोडणे बरोबर वाटत नाही म्हणून ती त्याला होकार देते. सर्व शेतातील काम आटोपून ते दोघे दरबारातील सोहळा पाहण्यास जातात.
                दरबारात सर्व राजकन्या आसनावर विराजमान झालेल्या असतात . राजपुत्र प्रत्येकी जवळ जाऊन तिचे हात आणि राजकन्येस पाहू लागतो पण त्याला त्याच्या मनासारखी कोणी आवडत नाही. सर्व राजकन्या आतुरतेने वाट बघत असतात की राजपुत्राने
आपली निवड करावी पण तसे काही होत नाही. शेवटी तिथे एका बाजूला तो शेतकरी आणि त्याची मुलगी जिथे उभी असते तिकडे राजपुत्र येतो आणि त्या मुलीस न्याहाळू लागतो. अतिशय साधी, रंगाने सावळी जरी ती होती तरी तिच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज चमकताना
राजपुत्रास जाणवते. तो त्या मुलीस तिचे हात पुढे करण्यास सांगतो तेव्हा ती मुलगी तिचे दोन्ही हात पुढे करते. उन्हाने तिचे दोन्ही हात रापलेले असतात. तळहातावर त्याला काही घट्टेही त्यास दिसतात. तिने ना कसले दागिने घातले असतात ना चांगली वस्त्र परिधान केलेली असतात. राजपुत्र तिच्या हाताला असे काय झाले? हे शेतकऱ्यास विचारतो तेव्हा शेतकरी त्याला सांगतो की माझी मुलगी मला मदत करण्यास रोज शेतात येते तेही तिच्या आजारी आईची सर्व देखभाल करून.
यावर राजपुत्र मनात काहीतरी विचार करतो आणि राजास सांगतो की, ही मुलगी मला पसंद आहे.
हीच खऱ्या अर्थाने खूप सुंदर आहे. राजाला राजपुत्राचे म्हणणे मान्य करावे लागते. तो त्या शेतकऱ्याच्या मुलीचा आणि राजपुत्राचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून देतो. 
सगळ्या राज्यात आनंदाचे वातावरण पसरते. अशा तऱ्हेने खरे सौंदर्य कशात आहे, हे त्या राजपुत्राला समजलेले असते.
              आपल्यालाही खरा अलंकार कोणता आहे हे समजले पाहिजे नाही का !

सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 22 April 2022

आतुरता

मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :

आतुरता : 
                 डोळ्यांत या आस तुझी
                  दाटूनी येई आसवांचा पूर
                 उठे हृदयी माझ्या काहूर 
                भेटीस तुझ्या झाले मी आतुर....
एका प्रेयसीचे मनातील गुज आहे, जीला तिच्या सख्याच्या भेटीची ओढ लागलेली आहे, ती आठवणीने त्याच्या व्याकूळ झालेली आहे. अशी आतुरता प्रत्येकालाच कशा ना कशाची लागलेली असते. एखादी गोष्ट मनापासून मिळावी, अशी उत्कंठा माणसाला नेहमीच असते. त्यासाठी तो त्याच्या मनाची हवी ती तयारी करतो कारण ती आतुरता त्याला शांत बसू देत नाही.
             माणूस कशासाठी आतुर होईल, ह्याचा काही नेम नाही. कधी कोणाला भेटण्याची आतुरता असते, विद्यार्थ्यांस परीक्षेचा निकाल जाणून घेण्याची, नववधूला तिच्या मिलनाची ओढ लागलेली असते. एखाद्या मातेस तिच्या आई होण्याची आतुरता लागलेली असते. तर 
कोणाला गावी जाण्याची, कोणास सैन्यात भरती होण्याची, बळीराजाला दमदार पावसाची ओढ लागलेली असते, तसेच जे परंपरेनं चालत आलेले सण आहेत, त्याचीही आतुरता माणसांना खूप असते. एकंदरच माणसाचा स्थायी स्वभाव आहे तो, कशाचीही ओढ त्यास लागू शकते. 
                एवढेच काय पण ह्या चराचरातील सारेच कशा न कशाने व्याकूळ होत असतात. ग्रीष्माने तप्त झालेली वसुंधरा पावसाच्या एका थेंबासाठी आतुर झालेली असते. जेव्हा पावसाच्या सरी बरसू लागतात तेव्हा ती वसुंधरा तृप्त होते आणि त्याचे जणू  प्रत्युत्तर म्हणून सारी सृष्टी  हिरवा साज चढवते, नद्या नाले दुथडी भरून वाहू लागतात. नवचैतन्याने सृष्टी खुलून जाते. ही सारी कमाल आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्या पावसाच्या आगमनाने झालेली असते. कोकीळ, चातकही पावसाची आतुरतेने वाट पाहत, सूर आळवत बसलेला असतो. पावसास येण्यासाठी साद घालत असतो. 
            आतुर होणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. ती मनातील उत्कंठा माणसाच्या भावना जागृत ठेवते आणि आपल्याला हवे ते मिळवण्याची एक धुंदी माणसाच्या मनावर चढते. प्रेमात व्याकूळ झालेली प्रेयसी,प्रियकराच्या एका कटाक्षासाठी वेडी होते. त्यासाठी ती त्याच्या आवडीनुसार स्वतःस बदलते, आपल्याकडे आकर्षित 
करण्यासाठी सजते, सवरते. हे सर्व त्या एका ओढीने तिच्याकडून ते आपोआप होत असते. 
          मातृत्वाची जेव्हा एखाद्या स्त्रीला चाहूल लागते, तेव्हा तिच्या बरोबरच परिवारातील सारेच त्या छोट्या पाहुण्याची आतुरतेने वाट पाहू लागतात. त्याच्या स्वागतची जय्यत तयारी सुरू करतात. त्या होणाऱ्या बाळाच्या आईची काळजी घेऊ लागतात, तिचे सर्व लाड पुरवतात. घरातील वातावरण त्यामुळे खेळीमेळीचे होऊन जाते. सर्वांस बाळाची ओढ लागलेली असते. 
           जीवन आहे तिथे ओढ आहे. जिथे ओढ आहे तिथे काळजी, प्रेम आहे. मग ती माणसे असो वा प्राणी-पक्षी किंवा हा निसर्ग. आतुरता ही सगळीकडेच दिसून येते. 
             
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Thursday, 21 April 2022

जाणीव सत्याची

सत्य हेच आहे, 
कोणाला कोणाचे, 
नसते काहीच देणे घेणे
आवडते साऱ्यांनाच इथे
स्वतःचा उदो उदो करणे....

जाणत नाही सत्य ते 
काय सांगावे !
आज आहे जीवन
तर उदया असेल मरण....

मोह मायेच्या जंजाळात 
अडकतो माणूस,
तुझे माझे करता करता
जातो जीव हकनाक,
करत नाही कोणीही साधी विचारपूस ....

धरशील जर सदैव सत्याची कास,
मिळेल माणसा, यश तुजला हमखास
कर दुजांच्याही भावनांची कदर, 
आहे जोवरी श्वासात तुझ्या श्वास ......

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Wednesday, 20 April 2022

नव्याने भेटले मला

आज मी पुन्हा भेटले,
माझ्याच स्वतःच्या अस्तित्वाला
माझ्यातच होते ते लोपलेले,
ठेविले होते मी बंदिस्त त्याला....

साठला होता मनात माझ्या,
न्यूनगंड हा खूप
स्वतःस स्वतःला लेखीत होते,
जणू काहीच नाही माझ्यात अनुरूप.....

वाटे मज नाही मी कशातच हुशार,
साऱ्यांसाठी आहे मी फक्त एक भार
साऱ्या माझ्या मनाच्या कल्पना,
जाणले मी त्यास तेव्हा,
दिला मज ह्यांनी आधार जेव्हा .....

म्हणाले मज हे, " आहे तू साऱ्यांहूनी देखणी,
शोभूनी दिसे हाती तुझ्या लेखणी"
त्यांच्याच प्रेरणेने घेतली हाती लेखणी,
भेटले पुन्हा मला मी नव्याने,
अस्तित्वाला माझ्या गवसली पर्वणी .....

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Tuesday, 19 April 2022

भविष्य आपुले..

केली जरी पृष्ठांवर उत्तरे चिन्हांकित
त्यासाठी करावे लागते अध्ययन स्वयंप्रेरीत
अन् असले जरी भविष्य आपुले अधोरेखीत
परी स्वकष्टाने भविष्य घडविणे,
हेच खरे आहे आपुले संचित

का अवलंबून राहावे भविष्यावर ?
असेल जर प्रेम आपुले जीवनावर
तर ठेवावा विश्वास स्वतःवर ,
अन् जगावे स्वबळावर 

करावे कर्म नेकीने, अन् लढावे जिद्दीने
नसावे मिंधे कधीही, जगावे स्वाभिमानाने
हुरळून जाऊ नये यशाने
अन् खचून जाऊ नये अपयशाने

दिले जरी संकेत भविष्याने असावे निडर मनाने
आहे आपुल्याच हातात आपुले भविष्य घडविणे......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 18 April 2022

एकतर्फी प्रेम

मनातील डायरीचे पान 🌿🌿: अंतर्गत विषय:-
एकतर्फी प्रेम
'प्रेम' ही सुंदर अनुभूती आहे. प्रेमाची व्याख्या शब्दांत मांडणे जितके कठीण, तितके निर्व्याज प्रेम अलीकडे दिसून येत नाही. आजच्या युगात असा कृष्ण, राधा होणे हे अशक्यप्राय गोष्ट. प्रेम म्हणजे स्वतःपेक्षा जिच्यावर प्रेम आहे, त्या व्यक्तीच्या सुखाचा, तिच्या भावनांना विचार नेहमी मनात करणे. न बोलताही त्या व्यक्तीच्या मनातील गोष्ट समजून घेणे. तिच्या सुखातच आपले सुख मानून घेणे, हे खरे असते प्रेम.
         आता मूळ विषयावर येते, ' एकतर्फी प्रेम ', जी व्यक्ती करते ती स्वतःचे आयुष्य तर दुःखात लोटते पण त्या बरोबर दुसऱ्या व्यक्तीसही त्याचे परिणाम भोगावे लागतात. प्रेम कोणावरही होऊ शकते त्यात काही गैर नाही. पण असे प्रेम काय कामाचे जिथे त्या व्यक्तीचे प्रेम समोरील व्यक्तीस मान्य नसेल किंवा ते शक्य नसेल, तिचे प्रेम नसेल किंवा ती व्यक्ती आधीच तिच्या आयुष्यात सुखी असेल. मग असे एकतर्फी प्रेम करण्यात काय साध्य होणार? पण अशा प्रेमात अडकलेला माणूस कसलाही विचार न करता सतत त्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीस त्रास देत असेल तर  त्यातून मानसिक त्रास दुसऱ्या व्यक्तीस सहन करावा लागतो. प्रेम करणारी व्यक्ती हे समजून घेत नाही की  स्वतःचे वागणे चुकीचे आहे, ह्यामुळे स्वतः बरोबर दुसऱ्याच्या आयुष्याचेही नुकसान करून घेत आहे. 
           एकतर्फी प्रेमातून कधी कधी अतिशय गंभीर 
घटना घडलेल्या आपण ऐकलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, प्रेमास नकार दिल्याने तरुणीवर अत्याचार, खून, ॲसिड हल्ला, अशा कितीतरी घटना आजुबाजूस 
घडत असतात. कित्येक मुलींचे आयुष्य त्यात उध्वस्त झालेले आढळून आले आहे. अजूनही परिस्थिती फार वेगळी नाही अशा घटना घडताना लोक फक्त बघ्याची 
भूमिका बजावतात, अशा गोष्टीचे भांडवल करतात. पण जी पीडित व्यक्ती आहे तिला न्याय मिळणे तर दूर पण त्यातून तिच्यावर मग सगळ्यांची नजर रोखली जाते, मग वर्षानुवर्षे खटले चालू राहतात आणि त्या व्यक्तीचे आयुष्य नाहक पणाला लागते. 
        प्रेम आहे तर त्या व्यक्तीस सांगा तिला ते पटवून द्या. जर तिने तुमचे प्रेम स्वीकारले तर चांगलीच गोष्ट आहे. जर तिला मान्य नसेल तर तुमच्या डोक्यातून तिचे विचार बाजूला सारा आणि नव्याने आयुष्य जगा. नाही ना तिचे प्रेम, पण निःस्वार्थ मैत्री तर असू शकते ना. तिच्या मताचा आदर करा. 
         प्रेम नाही म्हणजे आयुष्य संपले का? अहो आयुष्यात प्रेमाशिवाय करण्यासारखे खूप आहे, ज्यातून तुम्हाला समाधान मिळेल, लोक तुम्हाला नावाजतील. दुसऱ्यास सुख कसे मिळेल हा विचार जर माणसाने केला तर तो ही आपसूक सुखी होईल.
        एकदा नक्की विचार करून पाहा, एकतर्फी प्रेम करायचे की ती व्यक्ती आपल्या जीवनात हवी असेल तर तिच्याशी निस्वार्थ मैत्री करायची, तिच्या मताचा आदर करायचा. स्वतः आनंदात राहायचे आणि दुसऱ्यासही आनंदात राहू द्यायचे.

सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 15 April 2022

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

मनातील डायरीचे पान🌿🌿🌿 :- अंतर्गत विषय :-

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती

'प्रवृत्ती' म्हणजे स्वभाव, माणसाच्या वागण्याच्या तऱ्हा. जन्मास येणारा प्रत्येक माणसाच्या स्वभावाचे काही ना काही वेगळेपण, वैशिष्ट्य असते. त्याच्या त्या स्वभावाने तर त्याच्या व्यक्तिमत्वाची चांगली किंवा वाईट छाप पडत असते. उदाहरण द्यायचे झाले तर एखादी घटना घडलेली पाहून तिथे असणारी प्रत्येक व्यक्ती ही त्या घटने संदर्भात निरनिराळे तर्क वितर्क लावते. एखादा त्या घटनेविषयी हळहळ व्यक्त करील, तर एखादा त्याकडे दुर्लक्ष करील, तर एखादा त्या घटनेची खोलात जाऊन चौकशी करील, तर एखादा ती घटना पाहून घाबरून जाईल. असे माणसाचे स्वभाव असतात, वागण्याच्या तऱ्हा ह्या
तो त्याच्या सोयीनुसार बदलत असतो, जरी मूळ स्वभाव कसाही असला तरी.
                एखादी व्यक्ती ही अतिशय बडबडी असते, तर एखादी एकदम अबोल,भिडस्त स्वभावाची असते. एखादा चटकन राग व्यक्त करतो तर एखादा माणूस तो मनातच ठेवतो.काहींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो तर काही व्यक्ती ह्या सतत नकारात्मकच विचार करत राहतात. काही व्यक्तींना बिनधास्त आयुष्य जगणे पसंद असते, तर काही व्यक्ती सतत कोणत्या ना कोणत्या दडपणाखाली वावरत असते. अशी एकंदर भिन्न स्वभावाची माणसे आपल्या अवतभोवती सतत असतात. त्यांच्याशी आपल्याला
जुळवून घेता आले पाहिजे. भिन्न स्वभाव असेल तर आपसांत खटके उडू शकतात पण जर नाते टिकवायचे असेल तर स्वतःच्या अहंभावास बाजूला सारून समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकले, त्याच्या विचारांना समजून घेतले तर नाते टिकू शकते.
         माणसाचा स्थायी स्वभाव हा कधी बदलत नाही परंतु  त्याच्या व्यक्तिमत्त्वात प्रयत्न केले तर नक्कीच बदल घडू शकतात. एखाद्या व्यक्तीस लहानपणापासून जर चोरी करायची सवय असेल पण त्याने मनाचा निग्रह केला, चांगले विचार जर सतत त्याच्या मनावर बिंबवले गेले तर त्या माणसाची सवय ही नक्कीच जाऊ शकते.
         कधी कधी माणसे मुखवटे धारण करून जगात वावरत असतात. त्या मुखवट्यामागील खरा चेहरा ओळखायचा असेल तर त्या माणसाशी आपणास जमवून घेतले पाहिजे, त्याच्या अंतरंगात डोकावता आले पाहिजे. तर खरा माणूस काय आहे ते आपणास समजून जाईल.
           माणसाचा स्वभाव हा काहीवेळेस तात्काळ समजून जातो तर कधी कधी माणसाच्या स्वभावाचा थांगही लागत नाही कारण माणूस हा त्याचे वागणे हे परिस्थितीनुरूप बदलत असतो. हे जरी खरे असले तरी मूळ स्वभाव हा मात्र तसाच खोलवर रुजलेला असतो.
                              'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती
                              माणसाच्या स्थायी किती
                             जुळवूनी घेतले जर परस्परांशी
                               चिरंतन राहतील ती नाती' .....
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

           
                            


Tuesday, 12 April 2022

गझल :-१८

आनंद कंद वृत्त , मात्रा : २४

खोटीच आसवे ती, डोळ्यांत आज आहे
लोभास भाळुनी का विकलीस लाज आहे ....

न्याराच डौल त्याचा, लोकांस दावताना 
धुंदीत चेवलेला मदमस्त माज आहे ....

आगीत तेल ओती, कपटीच जात त्याची 
अंगात माणसाच्या भिणलीच खाज आहे ....

वाणीत गोडवा तो, पेराल साखरेचा 
बेरंग जीवनाचा रे तोच साज आहे ....

हरवून काय जातो, इतक्यात तूच वेड्या
हासून दावलेल्या दुःखात राज आहे ....

सौ. राजश्री सुहास जाधव.

ती कळी...

 


मोजताना फुले बागेतली

एक कळी खुदकन हसली

देखुनी त्या कळीस,
मनात अलवार भावना जागली

मोहक तिचे रूप ,
साठवले मी डोळ्यांत
केव्हा खुलेल कळी ती फुलात ?
उमटले सहज भाव ते अंतरंगात ....

दडली होती जरी ती पानाआड 
न होऊ दिले तिस मी नजरेआड
आला हळुवार एक कवडसा किरणाचा
स्पर्शून त्या कळीस, केले प्रेम जीवापाड
अन् झाले कळीचे फूल क्षणात
पाहुनी त्या आविष्कारासी,
भिणला आनंद रोमारोमात ....

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 11 April 2022

सोबती

प्रेम असो वा मैत्री 
असावी तिथे खात्री 
जीवनाच्या  वाटेवरी, 
असावा सोबती
जो निभावेल खरी मैत्री ....

खऱ्या मैत्रीत नसावा दुस्वास 
ठेवावा परस्परांवरी विश्वास 
प्रेम वा मैत्रीचा हा सहवास
जोडुनी ठेवितो हृदयास ....

कितीही घ्या प्रेमाच्या आणाभाका !
कितीही व्हा मैत्रीत व्यक्त !
नसेल जर त्यात आत्मीयता,
कदापि ठरत नाही, नाते ते सशक्त ....

असते गरज साऱ्यांनाच सोबतीची
जी काढते भरून उणीव आयुष्याची 
सहवासात तिच्या नसते जाणीव दुःखाची 
असते गरज फक्त एकमेकांस समजून घेण्याची ...

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

सौ. राजश्री सुहास जाधव.

Saturday, 9 April 2022

बापाच्या मनाची व्यथा..

मनातील डायरीचे पान 🌿🌿:- अंतर्गत विषय:-

बापाच्या मनाची व्यथा :-
        
            आई म्हटले की एक वात्सल्य मूर्ती समोर येते कारण घराला घरपण तिच्यामुळे येते आणि वडील म्हटले की एक शिस्तप्रिय, कठोर व्यक्तिमत्त्व डोळ्यांसमोर येते. जणू आपण ते गृहितच धरलेले असते. पण एका बापालाही तितकेच हळवे मन असू शकते जितके एखाद्या स्त्रीचे असते. पुरुषांनी रडलेले हे मात्र फारसे कुणाला रुचत नाही. जर त्याच्याकडून तसे झाले तर त्याला नावं ठेवली जातात. का, त्याला रडण्याचा हक्क नाही का ? कितीही आघात झाले तरी त्याने ते आतल्या आत सहन करणे योग्य आहे का ? साऱ्यांना खंबीरपणे साथ देणे
एवढेच त्याचे कर्तव्य आहे का ? त्यालाही त्याच्या आवडी निवडी प्रमाणे हवे ते घेण्याचा, स्वतःसाठी जगण्याचा अवधी नको का? हे प्रश्न खरोखर एकदा जाणून
घेतले तर पुरुषांच्या मनाची व्यथा सहज लक्षात येईल.
              
           एक स्त्री घरासाठी जितकी राबते, तितकेच एक पुरुष बाहेरील सर्व जबाबदारी नेटाने पेलतो. आयुष्यभर घरासाठी झटत असतो. बाहेर जाऊन, पडेल ते काम करून, प्रसंगी वरिष्ठांकडून होणारा अपमान सहन करून तो पैसे मिळवतो आणि घरातील सर्वांच्या गरजा भागवत असतो. तो कमावून आणून देतो म्हणून घरातील स्त्री सगळ्यांसाठी खाण्यास बनवू शकते. त्याला होणारा त्रास तो कधी दाखवत नाही .खरे तर जास्त मानसिक त्रास हा
पुरुषच सहन करत असतो. स्त्री रडून, दुसऱ्याशी बोलून स्वतःचे दुःख हलके करते पण पुरुष मात्र रात्री झोपताना छताकडे पाहून, कधी शून्यात नजर लावून बसलेला बऱ्याच जणांनी पाहिले असेल. त्याच्यापुढे संपूर्ण आयुष्याची घडी कशी नीट बसेल, महिना संपत आला की, खर्चाचा ताळमेळ कसा बसवावा, मुलांचे शिक्षण मुलीचे लग्न, हे सारे प्रश्न उभे ठाकलेले असतात. तो कधी ते बोलून दाखवत नाही.
              
                    एक वडील म्हणून ते मुलांना चांगल्या शाळेत घालतात भले त्यांची ऐपत नसेल तरीही आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घेतले पाहिजे याकरिता ते कर्ज काढून, मोठ्या कष्टाने मुलांना शिकण्यास प्रोत्साहन देत असतात. त्यांना हवे ते खाणे, पिणे, कपडालत्ता, सर्वांच्या सुखाचा एक वडील आधी विचार करतात. बायको, मुलांसाठी हवं ते खरेदी करतील पण स्वतः मात्र कधी काही घेत नाही. मुलांना महागडे मोबाईल खरेदी करून देतील, त्यांना हवे तेव्हा पैसे देतील , स्वतः मात्र काटकसर करून जगतील. बहुतेक असेच चित्र सर्वत्र पाहण्यास मिळते. आपण मदर्स डे जितका दणक्यात साजरा करतो तितका फादर्स डे साजरा करत नाही. हेही तितकेच खरे आहे. आईच्या वात्सल्याचे नेहमीच कौतुक होत असते पण वडीलही आपल्या मुलांवर निस्सीम प्रेम करत असतात. त्यांच्या प्रेमाविषयी मात्र एवढे एवढे बोलले जात नाही. वडील हे कायम दुर्लक्षित राहतात. 
                
                  मोठ्या मोठ्या संकटांना धीराने पेलणारा, दीपस्तंभासम असतो एक बाप. त्याच्या मनाची व्यथा जर समजून घेतली तर आणखी दहा हत्तीचे बळ त्याच्यात संचारेल व कोणतेही संकट तो  सहज पार करील.
               
                   मी माझ्या वडिलांवर एक कविता लिहिली आहे, तुम्हाला नक्की आवडेल. त्यांच्या प्रेमाला कसलीच तोड नाही.
                         
       
साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
लावला जीव अपार आम्हां लेकरांवरी 
पाहत आले मी बालपणापासुनी
सांभाळले आम्हांस तळ हाताच्या फोडापरी.....

नसे कसलेच व्यसन अन् सवयी
असे त्यांची साधी अन् सरळ राहणी
आहेत ते प्रेमळ अन् सुंदर विचारांचे धनी
हीच दिली आम्हा मुलांना शिकवणी.....

येता अनंत अडचणी,
जाणवू न दिल्या आम्हाला कधी
पेलत राहिले एकटेच आपल्या बाहुवरी
पाहिले साऱ्यांचे सुख आधी .....

सर्वांचे सर्व केले, ज्याला त्याला मार्गी लावले
परिस्थितीशी दोन हात त्यांनीच केले
नाही ठेवली अपेक्षा कोणाकडूनही,
न जगता स्वतःसाठी, आम्हा मुलांसाठी झिजले ......

पोहोचू दिली नाही कधीच आम्हास झळ
होते जणू अंगात त्यांच्या,
दहा हत्तींचे बळ
ओढत राहिले संसाराचा गाडा
सोसूनी अंतरी वेदनेची कळ ....

अजूनही माहेरी गेल्यावरी,
हवे काय, काय नको मज पाहतात सर्वतोपरी
भासू न देती यत्किंचतही उणीव मातेची
जणू घेतलाय जन्म लेकरांसाठीच त्यांनी भूवरी .....

सदैव काळजी असते आम्हा लेकरांची
बसवण्यास घडी प्रपंचाची,
परिश्रमासवे असते जोड त्यांच्या आर्थिक धोरणांची
कर्तव्यदक्ष, कुटुंबवत्सल सावली जणू आभाळाची.....

थकले असती आता जरी
सळसळते चैतन्य असे तरुणापरी
त्यांच्या आचार-विचारांची,
जपली आहे शिदोरी अंतरी.....

साऱ्या जगात बाबा माझे आहेत भारी
सदैव राहिल ऋणी त्यांची मी
करते मी ईश्वरचरणी विनवणी,
लाभो मज हेच पिता जन्मोजन्मी...... 💐💐🙏

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

Thursday, 7 April 2022

अंतर्मन (आत्मपरीक्षण)

मनातील डायरीचे पान 🌿🌿🌿:- अंतर्गत विषय
अंतर्मन ( आत्मपरीक्षण )
       'पाहिलं जर अंतर्मनात डोकावून,
       खूपकाही जाल सहज उमजून
       प्राप्त करण्यास आत्मसुख,
      ओळखावे स्वतःस आत्मचिंतनातून'....

                  जीवन जगत असताना, माणूस  स्वतःच्या 'मी'पणात इतका गुरफटलेला असतो की तो कधी स्वतःचं आत्मपरीक्षण करतच नाही. खरे तर बाह्यमन आणि अंतर्मन ही मनाचीच रूपे आहेत. आपण जे विचार सतत करत असतो तेच कुठेतरी अंतर्मनात खोलवर रुजतात आणि नंतर ते स्वीकारून बाह्य मनाद्वारे बाहेर पडतात.
जर आपले विचार हे सकारात्मक, विनयशील असतील तर जीवनात आपल्याला ऊर्जा, यश हे हमखास मिळते. पण आपण अंतर्मनात सतत नकारात्मक, आत्मघातकी, वाईट विचार करत राहिलो तर मग जीवनात तसेच घडत जाते, अपयश पदरी पडते. जीवन नैराश्याने ग्रासले जाते.
म्हणून स्वतःचे अंतर्मन हे सदैव निकोप ठेवा कारण अंतर्मन हे वाईट, चांगले दोन्हीही स्वीकारत असते, तेव्हा अंतर्मनावर जेवढे चांगले विचार बिंबवता येतील तितके बिंबवा.
           माणूस दुसऱ्यांचे दोष काढण्यात कायम तत्पर असतो. 'हम करे सो कायदा' अशीच त्याची वृत्ती असते. त्याला स्वतःचेच म्हणणे खरे करायचे असते. दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून, समजून घेण्याची त्याची वृत्तीच नसते. कधी
कधी समोरच्या व्यक्तीचेही बरोबर असू शकते. ही गोष्ट कधी आपल्या लक्षातच येत नाही. दुसऱ्यांच्या मतासही तितकेच महत्त्व द्या जितकं तुमच्या मतास इतरांनी
द्यावे, असे आपणास वाटत असते.
          स्वतःच स्वतःला आधी ओळखण्यास शिकले पाहिजे. प्रत्येक वेळेस आपणच बरोबर असू शकत नाही. दुसऱ्यांच्या भावनांची कदर करण्यास शिका. स्वतःमधील
राग, मत्सर हे दूर सारून जर आत्मचिंतन केले तर मनास एक वेगळेच समाधान प्राप्त होऊ शकते.  कारण जर आपण आपल्या आत डोकावून पाहिले तर तिथे सर्वात
जास्त दुसऱ्या विषयी असूया, तिरस्कारच आपल्याला आढळून येईल. ही मनात साठलेली जळमटे फेकून देऊन मन हे सद्विचाराने भरले पाहिजे. आत्मपरीक्षणाणे माणूस स्वतःची चूक मान्य करू शकतो, दुसरे जर चुकले असतील तर त्यांस मोठ्या मनाने माफ करू शकतो.
आणि ह्यामुळे परस्परांची नातीही दृढ होण्यासाठी मदत होते. नात्यात कोणताही दुरावा निर्माण होऊ शकत नाही.
              आत्मपरीक्षण करण्याने माणसाला स्वतःच्या क्षमतांची जाणीव होते. स्वतःतील गुण, दोष सहज लक्षात येतात. त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकासास आत्मपरीक्षण हे मोलाचे काम करते. स्वतःस कशाची आवड आहे, कोणती गोष्ट आपण सहज करू शकतो, हे जर ओळखता आले तर जीवनात माणसाला यश हे नक्कीच मिळू शकते. करिअर घडविण्याच्या दृष्टीने आत्मपरीक्षण हे करताच आले पाहिजे. इतर सांगतात म्हणून आपण त्याच वाटेने जाणे हे  कितपत योग्य आहे? त्यापेक्षा स्वतःतील गुण शोधा, कोणते काम तुम्ही जास्त आवडीने आणि योग्य रित्या करू शकता, कोणत्या गोष्टीत आपली रुची आहे , हे जर माणसाने जाणले तर त्यास यश हे हमखास मिळणार, यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे दुसऱ्यास काय वाटेल ? याची चिंता करत बसू नका, तुमचे मन काय सांगते , त्याचा आधी विचार करा. कधी कधी नाही म्हणण्यास शिका कारण लोक गैरफायदा घेण्यास टपूनच बसलेले असतात.
              माझ्या बुद्धीला जे उमगले ते विचार इथे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकले असल्यास
क्षमस्व.🙏
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

सौ. राजश्री सुहास जाधव.

















           

     


Monday, 4 April 2022

रहस्यमय जीवन

माणसाचे मन म्हणजे रहस्यमय जीवन
किती अन् काय काय दडले आहे त्यात!
नेहमीच प्रश्न पडतो मज गहन, 
जाता उलगडण्यास ते गुंतून जाई आपणच त्यात ....

रहस्य असतात मनातील खूपच गूढ अन् अनाकलनीय
अंदाज बांधणे  ठरते नेहमीच अविश्वसनीय, 
खूप काही विचित्र अन् तितकेच अद्भुत 
लागत नाही ठाव कदापि त्याचा असतात ती अतुलनीय ...

रहस्यमयी मनावर असते घातलेले गारुढ विचारांचे,
कधी असतात विचार ते मवाळ तर कधी प्रखर, 
तर कधी असतात ते सोज्वळ तर कधी घातकी, 
लागत नाही कधीच थागं त्याचा, 
दडलेली असतात रहस्य ती खोलवर ....

घ्यावयाचे असेल जर रहस्य दुसऱ्याचे जाणून,
तर करावा लागेल विश्वास संपादन
देऊनी त्यास दुजोरा, करावे लागेल समर्थन 
जिंकले जर प्रेमाने तरच रहस्याचे होईल निवारण .....

🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.

Friday, 1 April 2022

गझल:- २०

गझल ,वृत्त :- आनंदकंद

डोळ्यांत आज त्याच्या अंगार फार आता 
हृदयात भावनांचा भलताच भार आता ....

प्रेमास तो भुकेला व्याकूळ रे किती हा 
सोडून संयमाला केलेस पार आता ....

क्रोधात जाळतोया जीवास तू सदा रे 
जाणीव यातनांची केलीस गार आता ....

भाषेत गोडवा तो नाहीच रे कधीही 
बोलून ते विखारी करतोस वार आता ....

विसरू नकोस वेड्या माणूसकी जरा ही
घे ना तुझ्या मनाशी जोडून तार आता ....

सोसून  डंख सारे  लढशील तू नव्याने 
गवसेल जीवनाचे  परतून सार आता .....

येतील पाखरे ती फांदीवरी बसाया 
लावू नको कधीही हृदयास दार आता ....


सौ. राजश्री सुहास जाधव.

ध्येयासक्त..

आता कुठे उमजत आहे 
मळभ मनातील सरत आहे 
काळोखास भेदून 
आशेचा किरण डोकावत आहे
नवपालवी मनास या फुटत आहे
संस्काराचे बीज मनी रुजत आहे 
ध्येयासक्त होऊन मी ,
उमेद मनात जागवत आहे 
खूप काही करायचे आहे 
हे मनावर माझ्या बिंबवित आहे 
त्याच दिशेने पाऊल माझे पडत आहे 
जणू  आभाळच  सारे कवेत माझ्या ! 
हीच जाणीव मनास माझ्या सुखावत आहे 
ध्येयवेडी मी, माझ्या काव्यातून सारे मांडत आहे .....🌟🌟

सौ. राजश्री सुहास जाधव.

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...