जगाच्या पाठीवर कुठेही जा, जिथे कलह नाही, असे होणार नाही. माणूस म्हटले की, ' कलह ' निर्माण होण्यास अगदी क्षुल्लक कारणही पुरेसे असते. काही
वेळेस निर्माण झालेले हे कलह पेल्यातील वादळाप्रमाणे
पुन्हा शांतही होतात . पण काही कलहाने उग्र रूप धारण
केले की परिस्थिती हाताबाहेर जाते आणि सारेच कठीण
होऊन जाते.
' कलह ' हे अनेक प्रकारचे असू शकतात. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीशी होणारा वाद, सामाजिक कलह, कौटुंबिक कलह, पती - पत्नीतील
कलह, एवढेच काय पण स्वतःचा स्वतःशीच होणारा कलह, ईश्वरा बरोबर होणारा कलह, असे अनेक प्रकारचे
कलह आपल्याला सभोवताली दिसून येतात.
हे सर्व कलह, वाद, कुरबुरी ह्या सामोपचाराने सोडवल्या गेल्या तर कोणाचेच नुकसान होणार नाही.
आपल्याला बऱ्याच वेळा इतरांचे म्हणणे पटत नाही.
जिथे आपण काम करत असतो तेथील सहकाऱ्यांशी आपले मतभेद निर्माण होऊ शकतात. हे मतभेद एकमेकांच्या विचारांचा आदर करून सोडवणे गरजेचे असते, म्हणजे गोष्टी विकोपाला जात नाही.
पती - पत्नीच्या नात्यांत कलह हा ठरलेला असतो.
पण ह्या भांडणातूनच त्यांची प्रेमाची, संसाराची गोडी
वाढत असते. ते म्हणतात ना, तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना ! अगदी तसंच. खरे तर पती - पत्नी
दोघांनीही त्यांचे त्यांचे व्यक्ती स्वातंत्र्य जपले पाहिजे. एकमेकांवर हक्काने रागावले तरी दोघांनीही पुन्हा
तितक्याच प्रेमाने एकमेकांस माफही केले पाहिजे. जीवनभर एकमेकांना ते पूरकच असले पाहिजे. तेव्हाच
ती साथ आजन्म टिकू शकते. एकमेकांवर कुरघोडी करणे, वर्चस्व गाजवणे सोडून दिले पाहिजे.
कौटुंबिक कलह तर आपणास नेहमीच ऐकण्यास , पाहण्यात येतात. संपत्तीच्या कारणावरून, अधिकाराच्या
कारणावरून परिवारात असे वाद निर्माण होत असतात.
कधी कधी तर हे वाद इतके टोकाचे असतात की एखाद्याचा जीव घेण्यासही मग कोणी मागेपुढे बघत नाही.
पुढे कोर्ट - कचेऱ्या , हेवेदावे ह्या साऱ्यातच माणूस अडकून जातो आणि स्वतः बरोबर परिवारातील साऱ्यांचेच नुकसान करून घेतो. ह्या सर्व गोष्टी घडत असताना नाहक वेळ, पैसाही वाया जातो शिवाय अब्रूही
चव्हाट्यावर येते. म्हणून शक्यतो असे कलह निर्माण होणार नाही याची सर्वांनीच काळजी घेतली पाहिजे.
समाजात घडणाऱ्या घटना, अनागोंदी कारभार, सत्तेचे राजकारण , जातीवाद , हिंसा, लोकांचे शोषण, स्त्रियांवरील बंधने, अत्याचार या साऱ्या गोष्टींमुळे लोकांमध्ये आपल्या व्यवस्थेविषयी मनात संभ्रम निर्माण
होतो. ह्याचा फायदा घेऊन काही मंडळी स्वतःचा स्वार्थ साधून घेतात. पण सामान्य माणूस ह्यात भरडला जातो.
शेवटी हाती काहीच लागत नाही. म्हणून शक्यतो सर्वांनीच
सजग राहणे गरजेचे आहे. अफवांना बळी कोणी पडता कामा नये. आपापसातील मतभेद मिटावे याकरिता सर्वांनी एक एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. तेव्हाच सुखाचे जीवन जगता येईल.
कधी माणसाचा स्वतःशीच कलह निर्माण होतो. माणूस द्विधा मनस्थितीत सापडतो. मी हे करू का, नको ? , मी जे बोलते ते चूक की बरोबर, मी चांगला की वाईट इत्यादी अनेक विचार माणसाच्या डोक्यात येऊन
स्वतचं मन स्वतःशी भांडत असतं. अशा वेळेस एकाग्र चित्त होऊन आपले अंतर्मन जे सांगते व जे आपल्या
बुद्धीस पटेल तसेच वागावे म्हणजे मनातील कलह कमी
होण्यास मदत होईल.
माणसांबरोबर आपण वाद घालतोच पण आपण ईश्र्वरासही त्यातून सोडत नाही. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी झाली नाही की सारे आपण देवावर ढकलून
मोकळे होतो. ' तुझ्यामुळे असे घडले, तुला आमचे सुख पाहवले नाही ', असे काही बाही माणूस बरळून जातो.
खरे तर हे पूर्णतः चुकीचे आहे. आपल्याला आपल्या
कर्मानुसारच फळ मिळत असते. मग देवाला दोष का द्यावा ? देवावर विसंबून राहण्यापेक्षा आपल्या कृतीतून,
आचरणातून हवे ते साध्य करावे. देव हा आपल्या पाठीशी
कायमच असतो, असणार आहे. ती एक आंतरिक शक्ती
आहे. जी आपल्याला प्रेरणा देत असते.
कोणतेही वाद, कलह हे विकोपास जाणार नाहीत
याकडे जर लक्ष दिले तर माणसासमोर असणाऱ्या समस्या सहज सुटून जातील. माणूस निखळ, सुखी जीवन
जगू शकेल.
सौ. राजश्री सुहास जाधव.