Tuesday, 14 December 2021

देवा मला क्षमा कर...



एक गाव होतं. गावाचं नाव होतं नर्मदापुर. नर्मदा नदी काठी वसलेलं. छान कौलारू घरांचं गाव. गावातील लोक खूप धार्मिक होते. गावामध्ये विठ्ठलाचे छोटे पण सुंदर असे मंदिर होते. त्या मंदिरात रोज सकाळ, संध्याकाळ भजन, किर्तन, प्रवचन होत असे. स्त्रिया , पुरुष मंडळी, मुले बाळे नेहमीच मंदिरात गोळा होत आणि भजन, किर्तन, पुजाअर्चा करीत.
          त्याच गावामध्ये एक  'नागोजीराव' नावाचा इसम देखील रहात होता . हा नागोजीराव अत्यंत रागीट स्वभावाचा आणि नास्तिक होता . त्याचा देवावर , भजन , पुजाअर्चा या सर्वांवर अजिबात विश्वास नव्हता. त्याला
ते सारे थोतांड वाटायचे . सकाळी , संध्याकाळी  बाया  बापड्या मंदिरात जायला निघाल्या की तो त्यांना चिडवायचा , ओरडायचा , " कशाला जाता त्या मंदिरात? फुकट वेळ घालवता, विठ्ठलाला प्रसाद अर्पण करता ; तो दगड काय तुमचा प्रसाद खाणार आहे का ?" मग  बायका
बिचाऱ्या मुकाट्याने काहीच न बोलता खाली मान घालून देवळात निघून जायच्या. गावातील सारी माणसे या नागोजीरावामुळे खूप वैतागली होती. पण भितीपोटी कोणीच काही बोलत नव्हती.
          एक दिवस नागोजीराव मनात काहीतरी ठरवतो आणि मनोमन खूप खूश होतो. त्यादिवशी  रात्री खूप जोराचा पाऊस पडत असतो. रात्र झाल्याने आणि बाहेर पडणाऱ्या धो  धो पावसामुळे  गावातील लोकंही झोपलेली असतात. मध्यरात्र होते , पावसाची रिपरिप सुरूच असते आणि अशा पावसात , भयान काळोखात नागोजीराव एका हातात छत्री व लोखंडी पाईपासारखे काहीतरी घेऊन घराबाहेर पडतो. जाताना घराचे दार लोटून घेतो . घरात त्याची बायको शांत झोपलेली असते.
नागोजीराव मंदिराच्या दिशेने चालत निघतो . एक आसुरी हास्य त्याच्या चेहऱ्यावर झळकते. मनातल्या मनात तो बोलतो, " आज काही मी हे मंदिर आणि ह्या मंदिरातील विठ्ठलाला सोडणार नाही . त्या दगडाला कशाला हवे दागदागिन! कशाला हवे हार- फुले आणि नैवद्य!"
असे पुटपुटत तो मंदिराजवळ येऊन पोहोचतो आणि मंदिराच्या दारातून आत प्रवेश करतो. त्याच्या ह्या कृत्याचा पाऊस साक्षीदार असतो. सगळेच खूप भयान वाटू लागते.             
          नागोजीराव मंदिराच्या गाभाऱ्यात येतो आणि मुर्तीवर घाव घालणार तेवढ्यात..... विजेचा कडकडाट होतो आणि त्या लख्ख प्रकाशात नागोजीरावाला विठ्ठलाच्या मूर्तीच्या पायापाशी काहीतरी चमकताना दिसते . नागोजीराव पुढे जातो व मनाशी म्हणतो,
" विठ्ठलाचे दागदागिने तर आपण घेऊच पण आधी त्याच्या पायापाशी असलेले ते तांदूळ पण घेऊ ." 
तो पुढे येऊन पाहतो तर काय! विठ्ठलाच्या पायापाशी
ताटभर तांदूळ ठेवलेले त्याला दिसतात आणि तेच तांदूळ
चमकत असतात . नागोजीराव म्हणतो , " विठ्ठलाला
कशाला हवेत तांदूळ? तो काय खरेच खाणार आहे का ? 
त्यापेक्षा आपण हे तांदूळ घरी नेले तर त्याच तांदळाचा
भात तरी करून खाऊ." असे म्हणून नागोजीराव बरोबर आणलेल्या पिशवीत ते तांदूळ भरू लागतो आणि काय आश्चर्य! विठ्ठलाच्या पायापाशी पुन्हा तेवढेच तांदूळ त्याला दिसतात. नागोजीरावला ते पाहून खूप आनंद होतो.  तो मंदिरात शोधाशोध करून एक पोते आणतो व सर्व तांदूळ त्या पोत्यात भरतो तर पुन्हा तेवढेच तांदूळ त्याला ताटात दिसतात . मग नागोजीराव विचार करतो," आपण आधी हे तांदूळ घरी ठेऊन येऊ आणि परत येताना बायकोलाही बरोबर घेऊन आणखी पोती भरून तांदूळ सकाळ  होण्याच्या आधी घरी आणू ".असे ठरवून नागोजीराव तांदळाचे पोते डोक्यावर घेऊन घरी येतो आणि बायकोस आवाज देऊन उठवतो. नागोजीरावची बायको 'उमा ' त्याच्याकडे व  त्याने आणलेल्या पोत्याकडे पाहून आश्चर्यचकित होऊन विचारते ," एवढ्या रात्री तुम्ही हे काय घेऊन आलात? " त्याबरोबर  नागोजीराव  तिच्यावर  खेकसतो व त्याचा हेतू तिला सांगतो. उमाला फार वाईट वाटते, पण नागोजीराव तिचे काहीच ऐकत नाही. तो तिला म्हणतो , "आपण दोघं आणखी पोती घेऊन मंदिरात जाऊ आणि सकाळ होण्याआधी सर्व तांदूळ, दागदागिने घेऊन घरी येऊ." नागोजीराव त्याने आणलेले तांदळाचे पोते डोक्यावरून खाली उतरवतो तर काय आश्चर्य! आणखी एक तांदळाचे पोते त्याच्या डोक्यावर तयार होते . त्याला व त्याच्या बायकोस खूप नवल वाटते .सुरुवातीस  नागोजीरावला खूप आनंद होतो. तो पोते खाली ठेवतो तर पुन्हा डोक्यावर नविन तांदळाचे पोते तयार होते. आता मात्र नागोजीराव घाबरतो, कारण पोते उतरवले की डोक्यावर नविन तांदळाचे पोते तयार होत होते.  त्यामुळे नागोजीरावची खूप दमछाक होते. तो अर्धमेला होतो.  उमा त्याला म्हणते , "तुम्ही हे वाईट कृत्य केले म्हणूनच देवाने तुम्हाला ही शिक्षा केली आहे."  यावर नागोजीराव तिच्यावर  खेकसतो आणि म्हणतो, " हे बघ मी आता काही जगणार नाही असे मला वाटते, पण मरण्याआधी मला ह्या तांदळाचा भात करून खाऊ घाल." उमा धावत पळत स्वयंपाक घरात जाते आणि पटकन भात शिजवून आणते व त्याच्या पुढ्यात ठेवते . नागोजीराव तिला भाताचा घास खाऊ घालण्यास सांगतो . उमा त्याला भाताचा एक घास भरवते. नागोजीराव तो घास खातो तेवढ्यात त्याच्या तोंडात पुन्हा भाताचा घास तयार होतो . आता मात्र नागोजीराव पुरता हतबल होतो, कारण तोंडात घास आणि डोक्यावर तांदळाचे पोते तयारच होत असते . भात खाऊन खाऊन त्याचे पोट फुगते. त्याला खूप त्रास होऊ लागतो. आता त्याला त्याने केलेल्या पापाची जाणीव होते. उमा त्याला देवाची माफी मागण्यास सांगते. नागोजीराव मनापासून देवाचा धावा करतो आणि म्हणतो ," देवा मला क्षमा कर. मी चुकलो, मी चुकलो ." आणि काय आश्चर्य!  त्याच्या तोंडातील घास नाहीसा
होतो तसेच डोक्यावरील पोतेही नाहीसे होते. नागोजीरावची शुद्ध हरपते.
          दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमी प्रमाणे गावातील लोक मंदिरात पूजेसाठी येतात आणि समोरील दृश्य पाहून 
त्यांना नवल वाटते. कारण मंदिरात नागोजीराव देवाची पूजा करत असतो. त्याला पाहून सगळे खूप आनंदी होतात. नास्तिक नागोजीराव आता आस्तिक झालेला असतो. त्या दिवसापासून नागोजीराव नियमाने सर्व गावकऱ्यांसोबत मंदिरात पूजा-अर्चा, भजन, किर्तनात सहभागी होतो. सारा गावही गुण्या गोविंदाने नांदू लागतो.

सौ. राजश्री सुहास जाधव.
























       


5 comments:

  1. खुपच सुंदर कथालेखन शैली आहे तुमची.... ✍️✍️🙏🏼🙏🏼👌👌

    ReplyDelete
  2. खूप छान राजश्री 🌹🌹साधू बने तो मोहमाया छूटे,
    वैरागी बने तो छूटे तन,
    हरि तेरे से सच्चा प्रेम हो जाए तो
    तभी छूटे सारे मोह माया के बंधन

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर कथा...आणि खूपच सुंदर लेखन. अप्रतिम👌👌👌👌💐

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...