Saturday, 4 December 2021

सार्थक

आज सकाळपासूनच खूप अस्वस्थ वाटत होते. कधीपासून मनात जे ठरवले होते ते आज मी करणार होते. फायनली आज मी माझा तेरा वर्षांचा संस्थेतील प्रवास संपवणार होते. काही वैयक्तिक अडचणींमुळे
मी हा निर्णय घेतला होता.
           आज मी माझा राजीनामा दिला होता. या एवढ्या कालावधीत खूप सारे ऋणानुबध जुळले होते. जेव्हा फॉर्मवर सही करत होते तेव्हा नकळत डोळे भरून आले. आमच्या वरिष्ठ मॅडमना तर मान्यच नव्हते की राजीनामा द्यावा. पण निर्णय माझा होता. त्यांनी मला सांगितले की ' तू कधीही फोन कर, तुला आम्ही कायमचे बाय केले नाही , तू पुन्हा जॉईन होऊ शकतेस. आम्हाला जुनी माणसं हवी आहेत.' या त्यांच्या बोलण्याने मला खूप हायसं वाटलं.
            घरी परतताना डोळ्यांसमोर माझा संस्थेतील सारा प्रवास तरळून गेला. आम्हाला योग्य ते प्रशिक्षण देऊन कॉर्पोरेशन मधील शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी तील मुलांचा वाचनाचा पाया पक्का व्हावा याकरिता शाळेत संस्थेमार्फत वाचनतास घेण्यास रुजू केले जात असे.
            सुरुवातीस मला थोडे कठीण वाटले . एवढी छोटी मुले, त्यांची जबाबदारी आपल्यावर. आपल्याला नीट जमेल का ? पण जमले. इयत्ता पहिलीच्या वर्गात
तर सुरुवातीचे १-२ महिने त्या मुलांना आपली सवय लागावी, ओळख व्हावी , एका जागी मुलांना बसण्याची सवय लागावी म्हणून गंमत शिबिरातून वेगवेगळ्या सृजनशील कृती  उदाहरणार्थ चिकट काम, कोलाज काम , आवाज ओळखणे,चित्र रंगवणे,  गाणी , गोष्टी मुलांबरोबर घेत असे. पण जेव्हा मुलांशी माझी चांगली ओळख झाली तेव्हा मुले वाचनतासाची आतुरतेने वाट पाहत असे.
           प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना वहीत लेखनाचा , वाचनाचा सराव दिला की मुले तो अभ्यास आवडीने करत असे. ते करतानाच जर एखादा मुलगा किंवा मुलगी अबोल असेल तेव्हा त्याला बोलते करण्यासाठी त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेऊन त्या दृष्टीने त्या मुलाला हाताळले की ते मूल आपोआप बोलते व्हायचे. एकंदरच मुलांना माझा, माझ्या बरोबरील सहकाऱ्यांचा खूपच लळा लागला होता.
          या तेरा वर्षांत जवळ जवळ ५ ते ६ शाळांमधून वाचनतास घेण्याचे काम केले. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे अनुभव आले. पण मुलांचे प्रेम मात्र तेच होते.
          सुरुवातीस मुलांच्या शाळेत जेव्हा वाचन तास घेण्यास जात होते. तेव्हा बहुतेक मुले ही वस्तीत राहणारी, प्रत्येकाचे घरचे काही ना काही प्रोब्लेम होते. अशा वातावरणात वाढलेली ही ३ री, ४ थी ची मुले वर्गात माझे अजिबातच ऐकत नसायची. मी नविन असल्याने आमच्या
बरोबर आमच्या ताई असायच्या पण त्या दुसऱ्या वर्गातही जायच्या त्यामुळे माझ्या एकटीवरच त्या मुलांना शांत बसवून वाचन घेण्यासाठी माझे कसब पणाला लावावे लागत होते.  सकाळी मुलींच्या विभागात मात्र अजिबात
त्रास पडायचा नाही. मुली शांत बसून सर्व काही सांगितलेले, फळ्यावर दिलेला अभ्यास व्यवस्थित करत असे. मुले मात्र वर्गात खूप गोंधळ घालत असे. फक्त गाणे, गोष्ट ऐकताना तेवढी शांत बसत असे. फळ्यावर अभ्यास
दिला की त्यांचा गोंधळ सुरू व्हायचा. त्यामुळे हा तास कधी संपेल असे मला व्हायचे. एकदा दोनदा तर मी रडायचीच बाकी होते. पण तरीही मी तितक्याच तळमळीने मुलांचा वर्ग घ्यायचे.
          एकंदरच मला शाळेत शिकवण्याची व मुलांनाही वाचनाची गोडी लागली होती. एकदा वर्गात पाऊल ठेवले की मग कसलेच विचार डोक्यात यायचे नाही. फक्त वर्ग आणि वर्गातील मुले एवढेच माझे विश्व असायचे.
         कधी कधी तर चौथीच्या किंवा मोठया  वर्गातही अशी मुले असायची की त्यांना एकही मुळाक्षर वाचता, लिहिता येत नसे. तेव्हा ते तर आमच्यासाठी एक चॅलेंजच असायचे. मग सर्वतोपरी त्या मुलाला मार्गदर्शन करून, शैक्षणिक साधन साहित्यातून, वहीत सराव देऊन, पालकांचा सहभाग घेऊन त्या मुलास वाचनाच्या प्रवाहात आणायचे हेच ध्येय डोळ्यासमोर असायचे. जेव्हा त्या मुलांना वाचता, लिहिता येऊ लागले की मनाला खूप समाधान वाटायचे. आपल्या कामाचे सार्थक झाले असेच वाटायचे. कळत नकळत शाळेतील मुलामुलींशी एक
आपुलकीचा बंध निर्माण झाला होता.
           एके दिवशी मी अशीच दुसऱ्या शाळेत जायचे म्हणून बस स्टॉपवर उभी असताना २ मुले माझ्याजवळ आली. त्यातील एक मुलगा माझ्या पाया पडला आणि म्हणाला , ' मॅडम आशीर्वाद द्या, आज माझा दहावीचा
पहिला पेपर आहे. मी त्याच्याकडे पाहिले, मला चेहरा लक्षात आला पण नाव पटकन लक्षात आले नाही. मग त्यानेच त्याचे नाव सांगितल्यावर लक्षात आले. तो माझ्या आधीच्या शाळेतील चौथी इयत्तेतील विद्यार्थी होता. जो
वर्गात अतिशय त्रास द्यायचा. पण आज तो माझा आशीर्वाद घेऊन मला म्हणाला, ' मॅडम तुम्ही मला वाचायला शिकवले.' तेव्हा मनाला खूप आनंद झाला. जीवनाचे सार्थक झाल्यासारखे वाटले.
         अजूनही कुठेही, कधीही काही विद्यार्थी भेटतात, आवर्जून ओळख देतात, कृतज्ञता व्यक्त करतात. तेव्हा होणारा आनंद हा अद्वितीयच.
         परिस्थिती सारखी बदलत असते. मध्यंतरी ह्या करोनाच्या काळामध्ये सर्व चित्र पालटले. मुलांबरोबरचा संवाद खुंटला. ऑनलाईन शिक्षण चालू असले तरीही त्याला मर्यादा आल्या आणि मलाही काही कारणास्तव
राजीनामा देण्याचा निर्णय घ्यावा लागला.
          जे घडते ते चांगल्यासाठीच घडते, असे म्हणायचे आणि आपली वाट पुढे चालत राहायचे. देवाने आणखी काही तरी चांगले माझ्यासाठी योजले असेल नाही का !
     
     सौ. राजश्री सुहास जाधव.


3 comments:

  1. खूप छान कथा आहे अप्रतिम अप्रतिम 👌👌👌👌

    ReplyDelete
  2. सुंदर लिहिलंय मॅडम!👌
    शिक्षकांची आयुष्यातील सर्वात मोठी कमाई हिच!👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर भावस्पर्शी अनुभव सांगितला सखी ✍️🌟👌👍👌

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...