Monday, 20 December 2021

सुख - दुःख



जीवन हे खूप सुंदर आहे.ते भरभरून जगता आले पाहिजे. जे नाही मिळाले त्यासाठी रडत बसण्यापेक्षा, जे आहे , जे तुमच्या जवळ आहे त्यात सुख मानले पाहिजे. ते आणखीन सुंदर कसे करता येईल, त्यादृष्टीने आपण प्रयत्न केले पाहिजे.
       दुःख आहे म्हणून सुखाचे महत्व आपल्याला समजते. जगाच्या पाठीवर पूर्णतः सुखी असा शोधून सापडणार नाही. एखाद्याकडे अमाप पैसा असतो, घरदार सारं असतं पण ते उपभोगण्यासाठी त्याला संतान नसते. हे दुःख त्याला भोगवच लागतं. हेच एखाद्या झोपड्यात राहणाऱ्याच्या पोटी मुलाबाळांची कमतरता नसते.
त्यांचे पालनपोषण करण्याचा भार त्याच्यावर प्रचंड असतो. म्हणजेच काही तरी बेरीज वजाबाकी ही सर्वांच्याच जीवनात सुरूच असते. काही मिळालं
तर काही गमवावं लागतं.
            जीवनात प्रत्येक टप्प्यावर माणसे भेटतात. त्यांच्याशी कोणते ना कोणते भावनिक नाते निर्माण होते. काही तर अनामिक नाती तयार होतात. त्यांच्यातील चांगले गुण घ्यायचे. दोष असतील तर ते त्यास सांगून ते कसे कमी होतील, ह्यासाठी त्यास मदत केली पाहिजे. आपल्याला माहित असते की, काही नाती जन्मभरासाठी नसली तरी त्यांना आठवणीत आपण कायम जागृत ठेवू शकतो. ती नाती आपल्या सोबत नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा जे आपल्या पुढ्यात आहे ते अधिकाधीक  चांगले कसे होईल याकडे लक्ष दिले तर आपल्याला सुख,समाधान नक्कीच गवसेल, जगण्यासाठी नवी दिशा मिळेल.
          जीवनात कधी सुख, कधी दुःख हे येतच राहणार. त्याचा स्वीकार तुम्ही कशा प्रकारे करता ह्यावर सारे अवलंबून असते. कुढत बसायचं की हसत जगायचं, हे सर्वस्वी आपणच ठरवायचं असतं आणि हेच तर खरे जीवन आहे.

सौ. राजश्री सुहास जाधव.



       


3 comments:

  1. खरय......चांगले कसे होईल याकडे लक्ष दिले तर आपल्याला सुख,समाधान नक्कीच गवसेल

    ReplyDelete
  2. खुप सुंदर लेख...सुख आपल्या मानण्यावर असत..!!

    ReplyDelete

बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...