Tuesday, 30 November 2021

शब्द ते दाटले



शब्द ते दाटले
डोळे आज पाणावले
भाव अंतरीचे पुन्हा
पेटून उठले
गौण समजून मुलीस
अस्तित्व तिचे नाकारले
घाव होऊनी हृदयी ते डसले
मुलामुलींच्या भेदात सारे फसले
ना भाव कधी तिच्या मनीचे जाणले
घेण्यास उत्तुंग भरारी,
ना पाठबळ कधी तिला मिळाले
शिक्षण घेऊनही अखेरीस,
चूल, मूल आणि संसारातच तिला गुंतवले
काय तर म्हणे !
' हेच आहे संस्कार  आपले '
तेच आम्ही तुला दिले
राख त्याचे भान तू पहिले
ऐकून हे सारे
मन माझे गहिवरले 
शब्द ते  दाटले
डोळे आज पाणावले.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Sunday, 28 November 2021

हर्ष मनोमनी



कुणी काही का सांगेना
नव्या पिढीला मोठ्यांचं समजावणं रुचेना
अन् जुन्या पिढीला त्यांची मतं पटेना
स्वतःचा हेका दोघेही काही केल्या सोडेना
मनातलं दोघांच्या काही केल्या उमगेना
दुफळी दोघांतील ती मिटेना
म्हणुनी सोडुनी हेका दोघांनी
करावी परस्परांतील विचारांशी हातमिळवणी 
घ्यावे एकमेकांस सांभाळुनी
करावी सुखाची पायाभरणी 
मग होईल हर्ष मनोमनी ........

सौ. राजश्री सुहास जाधव.


बटर चिकन



नमस्कार 🙏
प्रिय सख्यांनो, नुकतीच नवरात्र संपल्याने कित्येकांच्या घरात आता पुन्हा मांसाहार खाणे चालू झाले असेल. आमच्याही घरात श्रावण महिन्यापासून मांसाहार खाणे बंद होते. त्यामुळे आता मात्र मुलांना हवे ते बनवून देणे गरजेचे होते. म्हणून त्यांच्या आवडीचे 'बटर चिकन ' अगदी हॉटेलच्या चवी सारखे बनवले होते. मुलेही खूप खूश झाली आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला ही समाधान वाटले.
      अगदी सोपी अशी पाककृती आहे. चला तर मग पाहूया कसे बनवतात 'बटर चिकन'.....

साहित्य :- ५०० ग्रॅम बोनलेस चिकन, प्रत्येकी २ चमचे आले, लसूण पेस्ट( तुम्ही जास्तही घेऊ शकता ), तिखट १ मोठा चमचा ,गरम मसाला पावडर १ मोठा चमचा, ४ मोठे कांदे, ५ ते ६ टोमॅटो, बटर एक पॅकेट, १५ ते १६ काजूचे तुकडे , कसुरी मेथी १ चमचा , फ्रेश क्रीम २ चमचे तेल, मीठ , साखर .

कृती :-  चिकन स्वच्छ धुऊन त्याला आले, लसूण पेस्ट
करून चिकनला लावून घेणे, त्यात १ चमचा तिखट
घालणे, चवीनुसार मीठ घालणे , आवडत असेल तर २
चमचे लिंबाचा रसही घालणे. चिकन तसेच १५ ते २०
मिनिटे झाकून ठेवणे.
          तोपर्यंत चिकन साठीचा मसाला तयार करणे.
४ मोठे कांदे उभे किंवा हवे तसे चिरून ते कढई गरम
झाल्यावर त्यात परतण्यासाठी घालणे, एक मोठा चमचा
बटरही त्यात घालणे. नंतर टोमॅटो चिरून तेही त्यामध्ये
घालणे. आले ,लसूण पेस्ट घालणे . १ चमचा तिखट, १
मोठा चमचा गरम मसाला पावडर,१५ ते १६ काजूचे तुकडे मीठ चवीनुसार घालून हे सर्व मिश्रण १ ग्लासपाणी घालून १० ते १५ मिनिटे शिजू देणे.आवडत असेल तर एक चमचा साखर त्यात घालणे. ते गार झाले की मिक्सर मधूनअगदी बारीक वाटून घेणे.
           आता चिकन जे आपण मसाला लावून झाकून ठेवले होते ते चिकनचे तुकडे  कढईत  २ चमचे तेल घालून छानपैकी शॅलो फ्राय करून घेणे.  सर्व चिकन शॅलो फ्राय करून घेणे.
       आता गॅसवर कढई ठेऊन तयार केलेले वाटण अगदी थोडे पाणी घालून कढईत शिजवण्यास ठेवणे, त्याला उकळी आल्यानंतर फ्राय केलेले चिकन कढईत घालणे , १ मोठा चमचा बटर घालून १० मिनिटे शिजू देणे. त्यात थोडी कसुरी मेथी, फ्रेश क्रीम घालून नंतर गॅस बंद करणे . 
मीठ आधी घातले असल्याने पुन्हा मीठ घालण्याची गरज नाही. त्यावर कोथिंबीर बारीक चिरून घालणे. मस्त, हॉटेल सारखे 'बटर चिकन ' झाले तयार !
        चपाती, रोटी, परोटा किंवा नान बरोबर तुम्ही खाऊ शकता. एकदा नक्की करून पाहा , अशा पद्धतीने चिकन, तुम्हाला नक्कीच आवडेल.

सौ. राजश्री सुहास जाधव. 








       


Saturday, 27 November 2021

उद्रेक रागाचा



कणभर राग देते मणभर दुःख, येता राग जीवन होते बेचिराख.
         'राग' येणे ही माणसाच्या अंतर्गत असलेली भावना आहे जी उफाळून बाहेर येते. एखादी गोष्ट आपल्या मनासारखी घडली नाही, किंवा एखाद्याने अपमानास्पद वागणूक दिल्याने, किरकोळ कारणावरून, सततच्या उपेक्षेने, परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर, ही सारी राग उत्पन्न होण्याची कारणे आहेत.
          आपण वर्तमान पत्रात नेहमी बातम्यात वाचत असतो, रागाच्या भरात डोक्यात दगड घालून खूण केला, किरकोळ बाचाबाची वरून भांडणं विकोपास, दारू पिऊन रागाच्या भरात पतीची पत्नीस बेदम मारहाण; अशा कितीतरी बातम्या आपल्याला वाचण्यास मिळतात.
        'राग' येणे ही स्वाभाविक गोष्ट आहे. अन्याय जर होत असेल तर तिथे राग हा आलाच पाहिजे. जिथे चुकीचे घडत असेल तिथे राग येणे बरोबर आहे. पण तो  राग      कशाप्रकारे व्यक्त केला पाहिजे तेही तितकेच महत्त्वाचे आहे.
         राग व्यक्त करताना इतरांना त्यापासून हानी पोहोचणार नाही याची काळजी माणसाने घेणे खूप महत्त्वाचे आहे. अति रागाने माणूस समोरील व्यक्तीस मानसिक त्रास तर देतोच शिवाय त्या रागाचा विस्फोट झाला तर स्वतःस व इतरांसही या रागाचे दुष्परिणाम भोगावे लागतात. काहीवेळेस अति राग समोरील व्यक्तीस
शारिरीक इजा पोहोचवू शकतो. माणसाचे एकमेकांचे नाते संबंध रागामुळे दुरावतात.
    कामाच्या ठिकाणी जर तुम्ही सतत चिडचीड, राग राग करत असाल तर तेथील वातावरणात नकारात्मकता निर्माण होऊन त्याचा परिणाम तुमच्या व इतर सहकाऱ्यांच्या कामावर होऊ शकतो. तसेच ते सहकारी तुमच्या पासून दूरच राहतील. 
               काही माणसांना उगाचच सतत चिडचीड, रागवायची सवय असते. त्यामुळे ती व्यक्ती आनंदी राहू शकत नाही व इतरांनाही आनंदी ठेवू शकत नाही. अशा व्यक्तीशी मग इतर लोक बोलण्याचे टाळतात.
          अति रागामुळे व्यक्ती स्वतःचे सौंदर्यही घालवून बसतो. कारण सततच्या रागामुळे त्याच्या कपाळावर सारख्या आठया पडत असतात व त्या आठ्या त्याच्या चेहऱ्यावर कायमस्वरूपी राहतात. त्यामुळे व्यक्तीचा चेहरा निस्तेज दिसू लागतो. परिणामी त्याचे सौंदर्य नाहीसे होते.
         माणसाने स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास हवे. राग आला तर थोडा वेळ डोळे मिटून शांत बसावे. दुसऱ्यांनाही राग येऊ शकतो, हे विचारात घ्यावे. दुसऱ्यांचे म्हणणेही ऐकण्याची सवय ठेवावी. समोरच्या व्यक्ती कडून जास्त अपेक्षा न ठेवावी. स्वतःची चूक असेल तर मान्य करावी. कायम क्षमाशील राहण्याचा प्रयत्न करावा.    
           ह्या गोष्टी जर माणसाने अमलात आणल्या तर माणसाचे रागावर नियंत्रण राहू शकते. माणूस आतून शांत होऊ शकतो.
            आपल्या क्रोधाला लगाम घालण्यासाठी ध्यानधारणा करणे खूप गरजेचे आहे. रोज नियमाने
थोडा वेळ तरी माणसाने एकाग्र चित्ताने ध्यानास बसावे. सर्व नकारात्मक विचार बाजूला सारून सकारात्मक विचारसरणीचा अवलंब करावा. संत साहित्य, श्रवणीय गीत, संगीत ऐकावे, चांगले साहित्य वाचावे. असे अनेक मार्ग माणसाच्या रागावर नियंत्रण ठेवण्यास उपयोगी पडतात.

सौ. राजश्री सुहास जाधव.
.


Friday, 26 November 2021

नको हा परकेपणा



परिस्थिती बदलली की माणसंही बदलतात, त्यांचा दृष्टीकोन बदलतो. जी आपली आपली म्हणणारी माणसं असतात ती ही मग परकी होऊन जातात. दुसऱ्यांच्या दुःखात त्यांना आनंद मिळतो.
             सांगायचंच झालं तर आपण वास्तव जीवनात, आपल्या आजूबाजूला अगदी स्वतःच्या आयुष्यातही हा परकेपणा अनुभवत असतो. एखादं एकत्र सुखी कुटुंब असतं, ज्यात आजी,आजोबा, नातवंडं, नणंद, दीर, काका, काकू असे सर्वजण एकत्र गुण्यागोविंदाने राहत असतात. पण मधूनच बाहेरील व्यक्तीमुळे या सुखी कुटुंबात मिठाचा खडा पडतो. म्हणजे घरातील सुनेच्या
माहेरील व्यक्तींची वाजवीपेक्षा जास्त त्यांच्या कुटुंबात ढवळाढवळ सुरू होते. प्रसंगी ती व्यक्ती त्यांच्या कुटुंबात पाहुणी म्हणून मुक्कामास जाते. घरातील सदस्यांविषयी
त्या सुनेचे कान भरते, खलबते रचते. सूनही त्या व्यक्तीच्या प्रभावाखाली येऊन मग परिवारातील माणसांबरोबर तुटकपणे वागू लागते. आणि माहेरच्या माणसांचे मन, त्यांच्या आवडीनिवडी सांभाळते. स्वतःच्याच घरात कुटुंबियांना मग संकोचल्या सारखे होते, परके वाटू लागते आणि नात्यांना तडा जातो.
   संपत्तीसाठी, पैशांसाठी कधी कधी सख्खे भाऊ पक्के वैरी होतात. मग नात्यात दुरावा निर्माण होऊन परकेपणा येतो. त्यांच्या नात्यातील ओढ, आपुलकी संपून जाते.
भाऊ भाऊ असले तरी एकमेकांची तोंडं देखील पाहत नाही.
         उदाहरण द्यायचे झाले तर नविनच कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्याला त्याच्या वर्गात सुरुवातीला जुन्या विद्यार्थ्यांकडून दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते. नविन येणाऱ्या विद्यार्थ्याला बाकीचे विद्यार्थी स्वतःचा अहंभाव मिरवत त्याच्या नवखेपणाची वारंवार
जाणीव करून देतात. त्यामुळे त्या नविन मुलासही त्या वर्गात आपण वेगळे, परके आहोत असे वाटू लागते. ही भावना त्याला दुःखी करते. ज्या उत्साहाने त्याने प्रवेश घेतलेला असतो तो उत्साह त्याचा नाहीसा होतो. इतरांबरोबर त्याला नविन मैत्री करायची असते, ओळख निर्माण करायची असते, ते सारे मग राहूनच जाते.
           जर त्या नवख्या मुलाशी मैत्री केली, त्याला समजून घेतले तर त्या मुलालाही तिथे आवडू लागेल. त्याच्यात आत्मविश्वास निर्माण होऊन तो आणखी जिद्दीने तिथे शिकू शकेल.
         नोकरीच्या ठिकाणीही नविन कर्मचाऱ्यास अशा परकेपणाची जाणीव होत असते. खरे तर इतरांनी त्याला समजून घेतले पाहिजे, त्यांच्या अनुभवाच्या चार गोष्टी त्याला शिकवल्या पाहिजे. जेणेकरून नोकरीच्या ठिकाणी ती नविन व्यक्ती उत्तम काम करू शकेल. त्यांच्या बरोबरीने, मदतीने कामाचा दर्जा उंचावू शकेल.
          माणूस हा त्याच्या वागणुकीतून दुसऱ्याला परकेपणा दाखवून देत असतो. हा परकेपणा माणसाला आतून पोखरत राहतो. तो नात्यांमध्ये कटुता निर्माण करतो.  म्हणून,
          ' नका देऊ वागणूक परकेपणाची
           नाहीतर होईल ताटातूट नातेसंबंधांची
           सांभाळावी सारी नाती ऋणानुबंधांची .....'

  सौ. राजश्री सुहास जाधव.
        


देवाण-घेवाण

' तुला जे पाहिजे आहे, ते घेऊन जा 'असे उद्गार हे आपल्याला नेहमीच मातापित्यांच्या तोंडून ऐकण्यास मिळतात किंवा पती - पत्नीच्या गोड नात्यांमध्ये हा संवाद घडत असतो.
               आपले जन्मदाते हे कायम आपल्याला देतच असतात. त्यांचे प्रेम, संस्कार, त्यांचा वेळ, त्यांचे धन सारं काही ते मुलाबाळांकरिताच असते. पण त्याच्या बदल्यात ते कधी आपल्या मुलांकडून काही मागत नसतात. त्यांना फक्त देणे माहिती असते. त्यांना जर तुमच्याकडून काही
हवे असेल तर ते म्हणजे चार प्रेमाचे शब्द आणि तुमचं अवधान. हे अवधान जर सर्व मुलामुलींनी आपल्या मातापित्यांना दिलं तर वृद्धावस्थेत उपेक्षेचं जिणं त्यांना भोगावे लागणार नाही.
          आपल्याकडील चांगले विचार, अवगत गुण दुसऱ्याला देऊन त्याच्याकडील चांगले आचार, ज्ञान आपण घेतले तर ह्या देवाणघेवाणीतून आपण इतरांपर्यंतही ज्ञानाचा प्रसार पोहोचवू शकतो. आपल्या सभोवतालीही ज्ञानदीप झगमगता ठेऊन अज्ञानाचा अंधकार नष्ट होण्यास मदत होईल.
           एखाद्या निरक्षरास आपल्याकडील ज्ञानाने साक्षर केले आणि त्याच्याकडील व्यवहार ज्ञान आपणास मिळाले तर दोघांनाही त्यांतून संतुष्टता,आनंदच प्राप्त होईल. बरेच वेळा असे दिसून येते की अगदी निरक्षर असलेल्या व्यक्तीकडे व्यवहार ज्ञानाचे चातुर्य जबरदस्त असते.
             अशा छोट्या, मोठ्या आदानप्रदानाने समाज सुधारण्यास हातभारच लागेल.

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 24 November 2021

गझल :१

मनोरमा वृत्त :- गाल गागा गाल गागा  ,गझल - 1

माणसाची जात आहे
सोबतीला घात आहे

भास आता सारखे हे
वेदनेची रात आहे

श्वास झाले मंद आता
शांत झाली वात आहे

भाकरीची मी भुकेली
आग ही का आत आहे

धुंद झाले मी मनाने
हात हा हातात आहे

सौ. राजश्री सुहास जाधव.


गझल

गझल : २  मनोरमा वृत्त : लगावली :गाल गागा  गाल गागा
घातलेला घाट आहे
जेवणाचा थाट आहे...

डोंब आता पेटले ते
का रिते हे ताट आहे ....

मार्ग सारे बंद झाले
ग्रासलेली वाट आहे ....

रोखणारे खूप येथे
लागलेला नाट आहे....

ढाळते मी आसवांना
वाहणारा पाट आहे ....

सौ. राजश्री सुहास जाधव


Tuesday, 23 November 2021

सवय




सवयींचा न होता गुलाम 

सवयींनाच करा आपुला गुलाम
प्रत्येकासी असती सवयी त्या किती !
न होय त्याची गिणती
सवय ती लेखनाची अन् वाचनाची,
उभारी ती मनाची अन् पडते भर ज्ञानाची
सवय ती मेहनतीची अन् कष्टाची, 
शिडी ती हमखास यशाची
सवय ती सतत शिकण्याची,
विकसित होई क्षमता
बुद्धीची अन् प्रगतीची
सवय ती नित्य सुरेल
गीत, संगीत ऐकण्याची,
मिळे पर्वणी ती
मंत्रमुग्ध होण्याची
सवय ती ध्यानाची अन् ईश्वरसेवेची,
गुरकिल्ली होय मोक्षाची
सवय ती नित्य दानाची,
होई प्राप्ती आशीर्वादाची
सवयी त्या असती चांगल्या, 
त्यासम सवयी त्या असती वाईट
लोटे माणसासी दुःखाच्या खाईत
सवय लागता वाईट व्यसानांची,
होई अधोगती जीवनाची
सवय ती सतत त्रागा करण्याची,
भंग पावते मग शांती मनाची
सवय ती सतत खाण्याची,
होई हानी शरिराची
सवय ती भांडणं-तंट्याची,
तुटती नाती आपुलकीची
सवय ती आळसाची,
ठेवावी तयारी मग पराजयाची
काय चांगले, काय वाईट,
जोखुनी सारे, वाटचाल
करावी वाटचाल त्या सवयींची....

सौ. राजश्री सुहास जाधव.


मर्जी



आसमंती झळके चंद्र, तारे
सृष्टीवरीचे जग हे सारे
सारी असे ईश्वराचीच मर्जी रे
दिले तू आम्हा निसर्गाचे दान रे
घेण्यास श्वास मोकळा तूच कारण रे
होऊनी विश्वविधाता तूच आम्हां रक्षिले
परी लालसेपायी दुराचार, भ्रष्टाचार,
निसर्ग ऱ्हास, स्त्री शोषण करुनी
स्वत्वाचे स्तोम मानवाने माजवले
अन् ईश्वराच्या रागास कारण झाले
अवहेलना सृष्टीची पाहुनी
ईश्वर तो गहिवरे
मर्जीतुनी त्या ईश्वराच्या
मानव उतरे
मग दावुनी कोप सृष्टीचा
धडा शिकवला ईश्वराने मानवाला

सौ. राजश्री सुहास जाधव.


Monday, 22 November 2021

शिदोरी



बालपणीच्या गमती जमती
स्मरणात त्या सदैव असती
खोड्या अन् मस्ती करावी किती!
साथ देण्यास असती सखे सोबती
त्यांच्यासवे दिन ते मजेत जाती
उठणे, बसणे, खाणे,पिणे
शिकणे, खेळणे अन् खिदळणे
नित्य हे संगतीनेच असती
लगोरी, लपाछपी अन् डबा एक्सप्रेस
आट्या -पाट्या, विटी- दांडू
खेळ खेळताना न वाटे कधीच भांडू 
परी तंट्याविना खेळात नसे ती जादू 
स्मरण होता बालपणीचे,
लागते सारे मग आठवू
आदर ज्येष्ठांचा, गुरुजनांचा ,
भाव निखळ मैत्रीचा,
नाना तऱ्हेचे खेळ खेळण्याचा
लहान,सान गोष्टीतही संतोष पावण्याचा,
गरिबीतही मनाची श्रीमंती अनुभवण्याचा
आठवुनी सारे वाटे मनासी,
भाग्यवान किती आमुची ती पिढी !
संस्कारांनी अन् ओसंडत्या चैतन्याने
जणू उभारली ती आनंदाची गुढी 
देईल जी संदेश, नविन पिढीला
आधुनिकतेचा चढविला  साज जरी 
जपावी ही संस्कारांची शिदोरी
सुखाचे टाकील माप ती पदरी .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


परवड


जिथे , तिथे सारे अफवांचेच सारे पेव आहे .
साऱ्यात या मानव तो भरडत आहे .
डोळेझाक करुनी तेच ते गिरवत आहे.
जाणण्या सत्य, ना कोणी धजावत आहे .
फायदा स्वतःचाच हर एक पाहत आहे.
जीवघेणी ती स्पर्धा आहे.
महासागरात लालसेच्या मानवप्राणी डुंबत आहे.
नेण्यास तरूनी त्यांना, तरबेज नाविकाची निकड आहे .
जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी असत्य हे, झाले डोईजड आहे.
साऱ्यात या परवड, गरीबाची होत आहे.
खिसे धनिकांचेच भरभरून भरत आहे.
असत्याच्या या सागरात, शोध सत्याचा
कधी लागणार का आहे ?.......

सौ. राजश्री सुहास जाधव.


Saturday, 20 November 2021

संयम



मनासी घालूनी कुंपण
राखा हो सर्वांनी संयम ||
संयम असावा क्रोधावर
अन् वखवखणाऱ्या लोभावर
संयम असावा आचरणावर
अन् नर-नारीतील भेदावर
मनासी घालूनी कुंपण
राखा हो सर्वांनी संयम ||
संयम असावा एक पत्नीव्रत श्री रामासम
संयम असावा मीरेच्या भक्तीसम
अन् श्री हनुमानाच्या शक्तीसम
मनासी घालूनी कुंपण 
राखा हो सर्वांनी संयम
तरच सुखी होईल जीवन
हाच असे जगण्याचा नियम ||

सौ.राजश्री सुहास जाधव.


प्रेमाचं गाव



असावं आपलं प्रेमाचं गाव
देईल त्याला मी सुंदर नाव
जे घेईल मनाचा ठाव
प्रेमाच्या गावात
नको कोणी दुजा
मी तुझी राणी अन्
तू माझा राजा
जोडीने करू संसार
सुंदर साजेसा
सुंदर त्या गावात
असावा सुंदरसा आरसा 
तूच चालवावा पुढे
सौंदर्याचा वारसा
सुंदर त्या गावात
असावा सुंदरसा दरवाजा
थेट हृदयातुनी होईल
तुझ्या नित्य माझी ये जा
अशा या प्रेमाच्या गावास
न लागावी कोणाचीच दृष्ट
नसे ते आम्हा दोघांसाठी कदापि इष्ट ....


Friday, 19 November 2021

प्रश्न



सर्वांनाच प्रश्न हे पडत असतात. कधी काही जाणून घेण्यासाठी, कधी दुसऱ्याच्या मनातील भाव ओळखण्यासाठी तर ज्यामध्ये नाविन्य वाटते त्याविषयीही आपल्याला खूप सारे प्रश्न पडत असतात. एखाद्याच्या बुद्धीचा कस तपासण्यासाठी देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर कधी विनाकारणच आपल्याला प्रश्न पडत असतात. कधी दुसऱ्याचे लक्ष आपल्याकडे वेधून घेण्यासाठी आपण प्रश्न विचारत असतो.
         हे सारे जरी असले तरी जिथे प्रश्न निर्माण होतात, तिथे उत्तर हे असतेच. पण कधी उत्तर दिल्याने दुसऱ्यांची मने दुखावतात, तर कधी समोरच्याला अपेक्षित असे उत्तर मिळाले की नाते आणखी दृढ होत जाते. ज्याच्याविषयी आपल्याला अंतरातून खूप आपुलकी, काळजी, प्रेम असते. त्याने जर आपल्याकडे दुर्लक्ष केले की मग समोर
खूप प्रश्न उभे राहतात आणि अशा प्रश्नांची उत्तरे माणूस शोधत बसतो. ती उत्तरे जर मिळाली तर समाधान मिळते,नाही मिळाली तर सतत तेच प्रश्न मनात घिरट्या घालत राहतात. अशा वेळी आपणच थोडे समजून
घेतले की एखाद्याला आपल्या प्रश्नाचे उत्तर देणे शक्य नाही तेव्हा राग लोभाचा प्रश्नच उरत नाही.
          लहान मूल फार चौकस असते. त्याच्या भाबड्या स्वभावामुळे ते अनेक प्रश्न विचारत असते त्याची उत्तरे ही आपण दिलीच पाहिजे. त्याला दुर्लक्षित करता कामा नये. कधी लहान मुलाकडूनही अनपेक्षितपणे असा एखादा प्रश्न विचारला जातो, ज्याचे उत्तर देणे आपणास शक्य नसते. पण त्याला न टाळता वेगळ्या पद्धतीने त्याने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आपण जर दिले तर त्याला ते समजून जाईल.
       म्हणून शक्य असेल तर प्रश्नांची उत्तरे आपण आपलीच शोधली पाहिजे, नाही का !

सौ. राजश्री सुहास जाधव.


अनमोल



असावे विचार ते सखोल
न ढळू द्यावा कदापि मनाचा तोल
डळमळता तोल मनाचा
घ्यावे लागतील ऐकुनी
सदैव दुजांचे बोल
त्या परी राखावा
मनाचा समतोल
आहे तो अनमोल
अनमोल ते ज्येष्ठांचे बोल
जे देऊनी जाती अनुभवाचे मोल
आत्मसात करिता अनुभवांचे मोल
कठीण समयी साथ देई ते बहुमोल
बहुमोल ती धरा गोल,
आकाशातील तो चंद्र गोल
मातेच्या हाताची भाकरी गोल
गोल या वर्तुळातील
आपण सारेच अनमोल
अनमोल ह्या साऱ्यांना
जपावं  हृदयात खोल
खोल त्या अर्णवातील
जणू मोती शिंपल्यातले अनमोल .....

सौ. राजश्री सुहास जाधव.


Wednesday, 17 November 2021

गैरसमज सारा.....



'एक क्षण ही तुजवीण कसं राहायचं'?...
गैरसमज असे सारा,
नाही अडत कोणाचे कोणा वाचुनी
आहे जीवनाची हीच तऱ्हा
जन पळभर म्हणतील हाय हाय ..
मी जाता राहिल कार्य काय?
आहे हा मूलमंत्र खरा
म्हणुनी फाटलेल्या नशीबास ना कोसायचं...
साधण्याचा प्रयत्न करत राहायचं ...
प्राक्तन ते भोगायचं ....
नशिबाला ना कोसायचं.....
' येईल एक दिवस माझाही '
ठरवून असं लढायचं ......

सौ. राजश्री सुहास जाधव.


ह्या मनाला काही कळत नाही !



'मन' म्हणजे नेमकं काय ! त्याला विशिष्ट आकार नसतो, रूप नसतं पण प्रत्येकात ते अपरिमित असतं. मन खूप चंचल असतं ते क्षणात इकडे तर क्षणात अत्यंत दूर गेलेलं असतं. एका क्षणात माणसाच्या मनात अगणित विचार चमकून जातात. या मनाचा कधीही ठाव लागत नाही.
           मन म्हणजे आपल्या शरीरातील आत्मा व पचेंद्रियांतील एक महत्वाचा दुवा आहे. त्यामुळे कधी मन खूप आनंदित असते तर कधी मन दुःखी, तर कधी
विस्मयचकित, तर कधी भयग्रस्त, कधी निराश मन होऊन जाते. कधी मन विनाकारणच बैचेन होते.
          अशा ह्या मनाला काही गोष्टी रुचत नाही. कोणी केलेला अपमान सहन होत नाही, तेव्हा मन पेटून उठते. लहान मुलांचंच पाहा ना, त्याला एखादी गोष्ट करू नकोस
असे म्हटल्यावर, ती गोष्ट ते मूल हमखास करणार. त्याच्यातील जिज्ञासा त्याला तसे करायला भाग पाडते. सतत नाविन्याचा शोध घेत असते मन.
       आपल्या वडीलधाऱ्या माणसांनी सांगितलेल्या गोष्टी मनाला कळतात पण वळत नाही. कोणी कितीही सांगितले, समजावले तरी मनाला त्यांचे म्हणणे पटत नाही. कारण मनाचा तसा निग्रहच झालेला असतो. आपलं मन आपल्याला हवं तसेच वागते. ते चूक की बरोबर ह्या पलीकडे ते गेलेले असते. मनाची अशी अवस्था आपल्यालाच समजत नाही. ' करू की नको करू, करून पाहायला काय हरकत आहे, नाही केलं तर काय
होईल?, मीच का बरे करू!, कशासाठी करू, कोणासाठी करू,' असे अनेक प्रश्न एकाच वेळी या मनात चमकून जातात.
          जर ज्येष्ठांनीही छोट्यांच्या मनाचा विचार केला, त्यांना समजून घेतले, परस्परांशी विचारांची देवाण-घेवाण केली तरच दोन पिढीतील अंतर मिटण्यास मदत होईल आणि कोणी काहीही सांगितले तरी मन स्थीर राहिल, भरकटणार नाही. मनाला योग्य दिशा मिळेल.
            तसेच मन स्थीर राहावे त्याकरिता आधी हे सर्व विचार बाजूला सारून एकाग्र चित्त व्हावे लागेल. एकाग्र मन होण्यासाठी ध्यान करावे लागेल. ज्यातून मनात सकारात्मकता निर्माण होईल असे संतांचे, थोर व्यक्तींचे साहित्य वाचनात आणावे लागेल. ईश्वरावर श्रद्धा ठेवावी लागेल. मनात भक्तीभाव रुजवावा लागेल. तेव्हा कुठे मन आपले प्रफुल्लित होईल, एकाग्र होईल, मनास प्रेरणा मिळेल. मनाला खूप सारे प्रश्न पडणार नाही. मन सजग राहिल. मग कुणी काही सांगण्याचीही गरज भासणार नाही.

सौ. राजश्री सुहास जाधव.







       


Sunday, 14 November 2021

गार्गी

 


  

 मनोहर आणि अनघाची 'गार्गी'  ही एकुलती एक मुलगी. ८ , ९ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर झालेली गार्गी अर्थात घरात  सर्वांची लाडकी होती. आजी-आजोबांची तर जणू दुधावरची साय. गार्गीच्या येण्याने सारे घर कसे आनंदून गेले होते. गार्गी चे हवे-नको ते सर्व लाड आजी आजोबा पुरवित होते. आजीची अंगाई ऐकल्याशिवाय गार्गी झोपतही नसे. मनोहर आणि अनघा कामाला गेले की छोटी गार्गी आणि आजी आजोबा घरात खूप धमाल करीत. कधी कधी गार्गी आईची ओढणी गळ्याभोवती
घेऊन खांद्यावर तिची पर्स घेऊन घरभर मिरवीत असे. आजी आजोबांना तिचे खूप कौतुक वाटत असे.
       गार्गी हळूहळू मोठी होत होती तसा तिचा हट्टीपणा देखील कमालीचा वाढला होता. एखादी गोष्ट हवी असली की ती तिला पाहिजेच. आजी आजोबाही तिला लगेच आणून देत असे. अनघाला त्यामुळे कधीकधी खूप राग येत असे. ती सासूबाईंना मग म्हणत असे, "तुम्ही गार्गीला खूप लाडावून ठेवले आहे आणि त्यामुळेच ती हट्टीझाली आहे. पुढे जाऊन खूप अवघड होईल." त्यावर सासुबाईंचे ठरलेले उत्तर असायचे," अगं पोरीची जात, आज नाही तर उद्या  ती आपली सासरी निघून जाणार म्हणून आता तिचे लाड केले तर काय हरकत आहे. "अनघा आणि मनोहर त्यावर काहीच  बोलायचे नाही.
        गार्गी पाच ते सहा वर्षांची असताना अनघा व मनोहर तिला सर्कस पाहण्यास  घेऊन गेले होते. सर्कस पाहताना गार्गीला खूप मजा येत होती. सर्कस मधील हसवणारा जोकर, उंच उंच झोके घेणारी माणसं, सर्कशीतील प्राण्यांचे खेळ पाहून गार्गीला खूप गंमत वाटत होती. सायकल चालवणारा हत्ती जेव्हा  गार्गीने पाहिला, तेव्हा गार्गी "तो हत्ती पाहिजे" असा हट्टच करू लागली. आई-बाबांनी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण गार्गी काही केल्या ऐकेना. मग अनघा व मनोहरला नाईलाजास्तव गार्गीला घरी घेऊन यावे लागले.त्या हत्ती साठी गार्गी रात्रभर रडत राहिली. आजी-आजोबांनीही
तिला खूप समजावले. शेवटी रडत रडतच गार्गी झोपी गेली. दुसऱ्या दिवशी आजोबांनी गार्गी साठी खेळण्यातील चालणारा हत्ती आणून दिला, तेव्हा कुठे गार्गी शांत झाली.
         गार्गी शाळेत जाऊ लागली होती. तिला अभ्यासाचा खूप कंटाळा येत असे. खेळण्याकडे तिचा कल जास्त असे. शाळेतील डायरीमध्ये कायम गार्गीस तिच्या शिक्षकांनी रिमार्क दिलेला असे, कधी गृहपाठ अपूर्ण, तर कधी पुस्तक आणले नाही याकरिता , तर कधी वर्गात शिकवत असताना बडबड करते या कारणाकरिता.
शाळेत महिनाअखेरीस अनघा व मनोहर मिटींगला गेले की, गार्गी बाबत तक्रारी ऐकून दोघांना खूप काळजी वाटत असे.
        गार्गी आता पाचवी इयत्तेत होती आणि घरापासून शाळा अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने गार्गी शाळेत मैत्रिणींसोबत चालत जात असे. गार्गीची परीक्षा सुरू होणार होती. पण गार्गी मात्र अभ्यास काही करत नसे. तिच्या खूप मागे लागून आजी गार्गीला अभ्यास करण्यास बसवत असे. अभ्यासातील प्रगतीत गार्गी जेमतेमच होती. उद्या गार्गीचा इंग्रजीचा पेपर होता म्हणून अनघाने तिचा थोडा सराव घेतला. दुसऱ्या दिवशी अनुभव मनोहर कामाला गेल्यानंतर आजीने गार्गीला नेहमीपेक्षा लवकर उठवले. आज गार्गी चा पेपर होता गार्गी ची शाळा साडेबारा वाजता भरत असे. आजीने गार्गीस
नाश्ता दिला, तिचा डबा दप्तरामध्ये ठेवला आणि आजी म्हणाली, "गार्गी आज तुझा पेपर आहे. मी तुला शाळेत सोडविण्यास येते." पण गार्गीने नकार दिला. ती आपल्या मैत्रिणी बरोबर शाळेत जाण्यास निघाली.
        शाळा भरली, तिच्या शिक्षकांनी सर्वांना पेपर लिहिण्यास दिले पण गार्गी मात्र शाळेत आली नव्हती. शिक्षकांनी नेहाला गार्गी विषयी विचारले तेव्हा नेहा म्हणाली, "मॅडम गार्गीने मला पुढे जाण्यास सांगितले.
म्हणून मी एकटीच शाळेत आले." अर्ध्या तासानंतर गार्गी वर्गात आली तेव्हा तिच्या शिक्षकांनी तिला उशिरा येण्याचे कारण विचारले आणि त्या गार्गी वर जवळ जवळ ओरडल्याच. गार्गी भीत भीत म्हणाली, "मॅडम नेहा आणि मी शाळेत येत होतो तेव्हा आमच्या शेजारील सोसायटीतील आजी मला झाडाखाली बसलेल्या दिसल्या. चेहऱ्यावरून त्यांना बरे नाही असे मला वाटले. मी त्यांना तसे विचारल्यावर कळले की त्या देवळातून घरी चालल्या होत्या पण चक्कर आल्याने त्या झाडाखाली
बसल्या होत्या. मला त्यांचे घर माहित होते म्हणून मी त्यांना त्यांच्या घरी सोडवून आले आणि त्यामुळेच मला शाळेत येण्यास उशीर झाला." गार्गीने सांगितलेले ऐकून शिक्षकांना गार्गी चे खूप कौतुक वाटले. त्यांनी गार्गीस
पेपर देऊन तो सोडविण्यास सांगितले.
       दुसऱ्या दिवशी सकाळीच गार्गीच्या शिक्षकांनी अनघाला फोन करून शाळेत येण्यास सांगितले. अनघा मनातून अस्वस्थ झाली. 'शिक्षकांनी का बरे बोलावले असेल शाळेत?' असा प्रश्न अनघास पडला. अनघा त्या विचारातच गार्गीच्या शाळेत गेली. शिक्षकांनी सगळा घडलेला प्रकार अनघास सांगितला. आणि गार्गीला पुढे बोलावून सर्व मुलांना टाळ्या वाजवण्यास सांगितले. त्यांनी गार्गीचे खूप कौतुक केले आणि शाबासकी दिली. हे सर्व अनघास अनपेक्षित होते. आपल्या लेकीचे झालेले कौतुक पाहून अनघाचे डोळे पाणावले तिने गार्गीस कडकडून मिठी मारली. कारण आज गार्गीने खूप चांगले काम केले होते. आजी-आजोबांना व तिच्या वडिलांना ही गोष्ट समजल्यानंतर त्यांनाही गार्गीचा खूप अभिमान वाटला. गार्गीने सर्व पेपर सोडवले आणि तिला बऱ्यापैकी मार्कही मिळाले. 'आपली गार्गी खूप हुशार नसली तरी
तिच्यात चांगुलपणा आहे,' या विचाराने मनोहर व अनघा दोघेही सुखावले.


Saturday, 13 November 2021

झोकाळलेला चंद्र


'चंद्र ' ही निसर्गाची सुंदर कलाकृती. त्याच्या सौंदर्याचे वर्णन करताना कोणीच थकणार नाही. लेखक, कवींना ही
भुरळ पडते त्या चंद्राची आणि मग चंद्रावर खूप साऱ्या कविता, गोष्टी देखील रचल्या जातात. आकाशातील त्या
चांदोबाला पाहून माऊली आपल्या बाळाला चांदोबाचेच
अंगाई गीत गाऊन जोजवते. मानवाच्या चौकस बुद्धीला
ह्या चंद्राचेच वेध लागल्याने तोही त्याच्या शोधात अंतराळात झेपावला आणि चंद्रावर पाऊल टाकले.
      इतके सारे असूनही हा चंद्रही मेघांच्या छायेत  झोका- लळा जातो. तो कलेकलेने वाढत जातो. आणि पौर्णिमेला तो पूर्णत्वास येतो.  म्हणजेच चंद्राला ही पूर्णत्वास येण्याची वाट पाहावीच लागते. त्यालाही ग्रहण लागते. त्यातून तो संयमाने बाहेर पडतो. आणि आपल्या डोळ्यांना त्याचे जे रूप दिसते ते मग साऱ्यांच्याच मनाचा ठाव घेते.
      तसेच माणसाच्या जीवनाचे आहे. चंद्राप्रमाणे त्याचेही
जीवन हे खाच खळग्यांनी काही काळाकरिता झोकाळले जाते. सुख - दुःखाचा पाठशिवणीचा खेळ आयुष्यात चालूच राहतो. तेव्हा माणसाने संयमाने त्याचा सामना केला तर त्यातून सहज बाहेर पडता येते. स्वतः बरोबर
इतरांनाही तो प्रेरणा देऊ शकतो किंवा इतरांसाठी प्रेरणा बनू शकतो. त्याच्या प्रेमळ छायेची सावली माणूस दुसऱ्यांना देऊ शकतो.
      हाच तो चंद्र जो मानवी मनाशी सांगड घालतो  आणि म्हणूनच काय स्त्रीच्या सौंदर्याला चंद्राची उपमा दिली जाते. एक नवी जाणीव प्रियकर आणि प्रेयसीच्या मनात
त्या चंद्राला पाहून निर्माण होते. काही कालावधीसाठी जरी ते दोघे विरह सहन करत असले तरी नंतर त्यांना एकमेकांच्या साथीनेच पुढे आयुष्य जगायचे असते, ही भावना  त्या आकाशातील चंद्राचे रूप पाहिल्यावर , मनाला सुखावून जाते.
       आपण जे काही काम हाती घेऊ किंवा आपल्या नात्यांना कधी कधी विरोध दर्शविणारे खूप भेटतील, अशीही वेळ येईल की कुठलाच मार्ग समोर दिसेनासा होईल, पण ते काही चिरकाल टिकेल असे अजिबात नसते. काही काळ त्यासाठी जाऊ देणे गरजेचे असते. अवधान राखून निकराने आहे त्या परिस्थितीला सामोरे गेले की मग जे मळभ साठलेले असते ते आपसूक दूर होते आणि आपल्याला हवे ते साध्य करता येऊ शकते. 
म्हणूनच असू दे कितीही झोकाळलेला तो चंद्रमा, येईल
एक ना एक दिवस बहर माझ्याही जीवना.

सौ. राजश्री सुहास जाधव.
     


कितीदा सांगायचं....


कितीदा सांगायचं रे  मना तुला
न द्यावा थारा मिथ्या अहंकाराला
कितीदा समजावयाचं रे माणसा तुला
असंगाशी संग नाही येत कामाला
कितीदा सांगायचं रे लेकरा तुला
न द्यावं अंतर कदापि मायबापाला
कितीदा समजावंयाचं रे पुरुषा तुला
न लेखावं  गौण कदापि स्त्री जातीला
कितीदा समजावयाचं रे मानवा तुला
होऊ नकोस कारणीभूत निसर्गाच्या ऱ्हासाला
समजावण्यालाही येतात  ना मर्यादा
ध्यानी असू द्यावे हे सदा सर्वदा
भाव असतील जर निर्मळ
तरच होईल जीवन सफल  ......

सौ. राजश्री सुहास जधव.


Tuesday, 9 November 2021

अनामिक नाती


   


      

प्रत्येक व्यक्ती हा कुठल्या ना कुठल्या तरी नाते संबंधात बांधलेला असतो. आई, वडिलांचे, मुलांचे  भावा-बहिणींचे, दिर- नणंदा, मित्र-मैत्रिणी, प्रियकर- प्रेयसी, पती-पत्नी, सहकारी, ही सर्व नाती आपणास पाहायला मिळतात. अशी नाती आपल्याला प्रेरीत करत असतात. त्यांच्याशी आपले जिव्हाळ्याचे ऋणानुबंध निर्माण होतात. ही नाती आपल्याला कधी सल्ले देतात, कधी मदतीचा हात पुढे करतात, कधी भांडतात, रुसतात, कधी हसवतात, कधी रडवतात. ह्या नात्यांमध्ये माणूस स्वतःला गुरफुटून घेतो. परिणामी माणसाला त्याच्या चांगल्या-वाईट परिणामांना सामोरे जावे लागते. 
         ह्या साऱ्या नात्यांहूनही वेगळी अशी नाती असतात. ती शोधून पहिली तर ती आपल्याला आजुबाजूस, सर्वत्र आढळू शकतात. पण तशी दृष्टी पाहिजे. अंतर्मनातून अशी नाती ताडता आली पाहिजे.
           खरे तर प्रत्येक माणसाने माणसाशी माणुसकीचे नाते निर्माण केले पाहिजे. ते नाते अनामिक असले तरी त्याची ओढ कायम ठेवली पाहिजे.
           ही सृष्टी, हा निसर्ग, भूतलावरील प्राणी-पक्षी, चराचर आणि ह्या सर्वांचा कर्ता करविता तो ईश्वर, ह्या सर्वांशी आपण एका अनामिक नात्याने जोडलेले असतो.
          पहाटेच्या रम्य प्रहरी, निसर्गाच्या सान्निध्यात, पक्ष्यांच्या सुमधूर किलबिलाटाने माणसाला सुंदर अनुभूती प्राप्त होत असते. तसेच नित्य ईश्वर स्तवनात त्याला आत्मसुख लाभत असते. एक प्रकारे माणसाचे एक अनामिक नातेच या सर्वांशी जोडले जाते. म्हणूनच सकाळ, दुपार, संध्याकाळ झाली, हे माणसाला, प्राणी-पक्ष्यांनाही बरोबर समजते व त्यानुसार मग सर्वजण आचरण करतात. 
          अगदी उदाहरण द्यायचे झाले तर आपल्या घरातील पाळीव प्राणी, पक्ष्यांविषयी आपल्यात खूपच प्रेमभाव निर्माण झालेला असतो. त्यांच्याशी नकळतपणे आपले नाते निर्माण होते. शेतात राबणाऱ्या बैलांविषयी शेतकऱ्याचे दृढ नाते तयार होते. ह्या नात्याला कुठलेच नाव नसते. त्यांना काही दुखापत, इजा झाली की आपला जीव कासावीस होतो. आपण त्या प्राण्यांना पोटच्या
मुलाप्रमाणे जपतो.
     आपल्याला ठाऊकच आहे की, निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर कवी मन जागृत होते. त्यांना निरनिराळ्या कविता, रचना स्फुरतात, लिहिण्याची प्रेरणा मिळते. ही सारी किमया घडते कारण माणसाचे निसर्गाशी असलेल्या
अनामिक नात्यामुळे.
                         शोधता अशी अनामिक नाती
                          तोषविती मनास किती !
                         अलवार जतन करा ती.....

सौ. राजश्री सुहास जाधव.
                          
                      
         


घे भरारी

उदासीन ते मन,
घेई पुन्हा उभारी.....🌠🌠

                                 
                                   जाळून टाकी,
                                   भावना त्या विखारी.....

होऊनी प्रभा ती न्यारी
क्षण सुखाचे ती विखुरी.....🌠🌠🌠
                                   
                                     धुके दुःखाचे ते जहरी
                                     न येई परतुनी माघारी.....

जीवन सफल करण्या
घ्यावी उंच भरारी......
                                 
                                   देऊनी परिश्रमाची जोड पुरी
                                   गवसेल यश तेव्हा पदरी 🌠🌠

सौ. राजश्री सुहास जाधव .
                              


Friday, 5 November 2021

मनमीत...



तुझे ते स्मित
करते नेहमीच मला मोहित
असावी का हीच प्रितीची रीत !
हास्य तुझे ते करते मनास प्रफुल्लित
दूर तू जाता , होई मन माझे विचलित
आठवणीने तुझ्या, अश्रुंना नाही मी थोपवित
तूच रे सख्या माझा मनमीत
सोबतीने तुझ्यासवे आळवेळ जीवन गीत ....💞

सौ. राजश्री सुहास जाधव.


नाही मनाला लावून घ्यायचं....

माणसाला कधी कोणत्या गोष्टीचे वाईट वाटेल ते सांगता
येत नाही. दुसऱ्यांची झालेली प्रगती पाहूनही माणसाला रुचत नाही. तो  माणसाचा स्थायी स्वभाव असतो. अगदी थोडी माणसे असतात ,जी दुसऱ्याच्या आनंदात आपला आनंद शोधतात . नाहीतर हिणवायला, टीका करायला माणूस सदैव पुढेच असतो. पण एका अर्थाने ते चांगलेच असते . ते म्हणतात ना ' निंदकाचे घर असावे शेजारी '
कारण एक तर निंदा केल्याने आपल्याला आपल्यातील
कमतरता लक्षात येते , कोणी कितीही काही बोलले तरी
आपण आपल्या मताशी ठाम राहण्यास ह्या टीका च
कामी येतात.  लोकांनी केलेल्या टीका आपल्याला जीवनाकडे सखोल दृष्टीने पाहण्यास प्रोत्साहनच देत असतात.
        आता हेच पाहा ना  क्रिकेटची आपली टीम खेळात
जिंकली की सर्व खेळाडूंचे तोंडभरून कौतुक होते,  त्यांना
वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. पण हीच टीम हरली की
मात्र लोक त्यांना शिव्या घालतात, कधी कधी अगदी
त्यांचे नुकसान होईल असेही वागतात. पण म्हणून जर
ते खेळाडू खेळलेच नाही तर मग पुढे त्यांचं भवितव्य
कसे होईल, देशाचे नाव कसे पुढे नेता येईल?
म्हणून लोकांचे बोलणे कधीच मनाला लावून घ्यायचे
नाही. लोक काय, दोन्ही बाजूने बोलणारे असतात. जे झालं ते तिथेच सोडायचं आणि पुढील वाटचालीस आरंभ
करायचा.  त्याकडे दुर्लक्ष करायचे. पुन्हा नव्या जोमाने
आपण  कशाप्रकारे आणखी चांगले काम करू शकतो हाच विचार मनात ठेऊन पुढे पाऊल टाकायचे.
    हा काय म्हणेल?, त्याला काय वाटेल, लोक नावं ठेवतील, असे सारे विचार दूर सारायचे कारण शेवटी
जे काही करायचे, भोगायचे असते ते आपल्यालाच असते.
मग इतरांसाठी एवढा विचार का करायचा?
     कुढत राहण्यापेक्षा लढत राहा , मार्ग आपोआप सापडेल.

     सौ. राजश्री सुहास जाधव.
      
  
         


बोनस

        बोनस :         आजकाल  माणसाचं आयुष्य हे इतके बेभरवशी झाले आहे की कधी काय होईल ते सांगता येणार नाही. त्याला जबाबदार म्हणजे आपली बदलत ...